शनिवार, ७ जुलै, २०१८

लिटील रेड स्पॉट.




ज्ञानेश्वर गटकर,
अमरावती.(महा.)
मोबाईल:९०११७७१८११
-मेल: dggatkar@gmail.com
(तुमच्या सूचना आणि अभिप्राय कळवण्यासाठी सबस्क्राईब करा.)




अंकित,माधवी,मनोज आणि प्रसेनजीत... विमानतळाच्या बाहेर आले. त्यांना घ्यायला विशेष सरकारी वाहन वाट बघत होते.मागील सहा महिन्यांपासून चौघेही सोबतच होते. त्यांची आयुष्य एकमेकात एवढी गुंतल्या गेलीत कि त्याचं जगणे एकच झाले होते...आणि... आणि कदाचित मरणेही....
माधवी’... नावासारखीच गोड छोकरी. करिअरच्या अनेक वाटा खुल्या असतानांही तिने मानसोपचारतज्ञ होण्याचे जेंव्हा ठरवले, तेंव्हा तिच्या परिचितांनी तिला मुर्खातच काढले होते. मात्र आई-वडील तिच्या या निर्णयात नेहमीप्रमाणे सोबत होते. तिच्या आयुष्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य फक्त तिलाच आहे या मताचे ते होते. स्वताच्या इच्छा त्यांनी कधीही तिच्या निर्णयाच्या आड येवू दिल्या नाहीत. म्हणूनच माधवी स्वतंत्र विचाराची मुलगी होवू शकली.
मानोपचारतज्ञ म्हणून जेंव्हा तिची जागतिक कीर्तीच्या आणि प्रतिष्ठीत अशा भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो)मध्ये  निवड झाली तेंव्हा तिला पूर्वी मुर्खात काढणारे आता तिच्या यशाने भारावून गेले. इस्रो मध्ये तिला अंतराळवीरांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करायचे होते. अवकाशयानातील प्रवास तसा खडतर. शारीरिक आणि मानसिक थकवा आणणारा. त्यामुळे शरीरासोबतच मानसिकरीत्या अंतराळवीराला तयार राहणे गरजेचे असते.  अंतराळवीरांचे  आप-आपसातील  भावनिक बंध खूप महत्वाचे असतात. अंतराळ प्रवासातमाणूस म्हणून भावनांची अनेक आंदोलने कशी असतात? आणि त्यावर नियंत्रण कसे  मिळवायचे? या आणि अशा अनेक गोष्टी तिच्या अभ्यासाचा भाग होत्या. एवढेच नाही तर इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांना मानसिकरीत्या सक्षम ठेवण्याची व यात्रेदरम्यान सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी काय करयाचे, सोबतच्या अंतराळविरासोबत मतभेद झाल्यास स्वत:ला कसे सांभाळायचे? इत्यादीसारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यासाठी एक तज्ञ म्हणून तिच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. लवकरच हि मोहीम सुरु होणार होती. त्यासाठीच आवश्यक नवीन गोष्टी शिकायलानासासंस्थेमार्फत सहा महिन्याचे प्रशिक्षणासाठी तिला पाठवण्यात आले होते.  तिच्यासोबत आणखी  दोन अंतराळवीर आणि एक खगोलशास्त्रज्ञसुद्धा प्रशिक्षणासाठी गेले होते. हि चौघे ईस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमेचा महत्वाचा हिस्सा होती. आज तेच प्रशिक्षण संपवून ते मायदेशी परत आले. ‘नासातील या सहा महिन्याच्या पूर्वीची माधवी आणि प्रशिक्षण संपवून आलेली माधवी... किती बदल झाला होता तिच्यात... त्या बदलाचे कारणही तेवढेच मधुर होते म्हणा!!!... ‘प्रसेनजीत’.
प्रसेनजीत..नासातील प्रशिक्षणासाठी माधवीसोबत गेलेला एक अंतराळवीर...अतिशय देखणा आणि महात्वाकांक्षी तरुण आणि तेवढाच कर्तुत्ववानसुद्धा !!... चैतन्याने काठोकाठ भरलेला. माधवीचे आरस्पानी सौंदर्य  आणि प्रसेनजीतचे देखणे व्यक्तिमत्व एकमेकाकडे आकर्षित न होतील तरच नवल... प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसातच दोघांची मैत्री झाली आणि पुढे अगदी नैसर्गिकपणे प्रेमात बदलली. प्रशिक्षणासाठी गेलेले अंकित आणि मनोज हे सुद्धा तिचे चांगले मित्र झाले होतेच. पण तिचा जीव जडला प्रसेनजीतवर... इतरांशी मात्र ती निखळ मैत्री ठेवून होती..पण त्या मैत्रीत एक छुपी खोच होती... ती म्हणजे अंकित’.....

अंकित.... अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा खगोलशास्त्रज्ञ... उत्कृष्ट निरीक्षण क्षमता आणि चाणाक्ष बुद्दीमत्ता लाभलेला. मनातील कुणाकडे जास्त बोलणार नाही. सतत विचारात असलेला. लहानपणापासून एकलकोंडाच म्हणून राहिलेला. न कुणाशी जास्त मिसळत होता न बोलत होता. स्वतावर नियंत्रण ठेवू शकायचा पण यदाकदाचित भावनांचा स्पोट झालाच तर स्वतःला आवरू शकत नसे.......असा अंकित माधवीवर एकतर्फी प्रेम करायला लागला होता. त्याने हि गोष्ट आपल्याच मनात लपवून ठेवली. तरी माधवीला त्याच्या वागण्या,बोलण्यातून ते जाणवत होत... जाणवणार का नाही? ती मानसशास्त्राची अभ्यासक. तिला त्याच्या मनातील भावना समजायला जास्त वेळ लागला नाही पण तिला सगळ समजल हे तिने कधीच दाखवले नाही. तिला तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही. त्याच्या मनात येणाऱ्या भावना या नैसर्गिक तर आहेतच शिवाय तिला किंवा आणखी कोणाला त्याच्या वैयक्तिक भावनांचा त्रासहि नव्हता. उगाच अंकितशी या विषयावर बोलून आपण प्रकरण चिघळवू असे तिला वाटले... आणि नेमक इथेच ती चुकली.







इस्रोचे मिशन बृहस्पती-०१...... मनोज आणि प्रसेनजीत यांची या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून निवड झाली. ‘मनोज तसा अंतराळ प्रवासात अनुभवी होता. यापूर्वी सुद्धा त्याने चांद्रयान-०३आणि मंगळ यान -०२मोहिमांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मनोजसोबत या मोहिमेसाठी प्रसेनजीतची निवड झाली आणि प्रसेनजीतला आकाश ठेंगणे झाले. मनोज आणि प्रसेनजीत या दोघांच्या भावनिक बंधाची काळजी माधवी घेत होती. ती त्यांना मानसिकरीत्या सक्षम बनवत होती. त्यांचे प्रशिक्षण वर्ग घ्यायची त्यामुळे या तिघांचे मैत्रीचे धागे घट्ट विणल्या जात होते. तिकडे मात्र  अंकितला आपण एकटे पडल्यासारखे वाटत होते. त्याच्या कामाचे स्वरूपच वेगळे असल्याने तो त्यांच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नव्हता. तो आणखी एकलकोंडा झाला आणि या सगळ्यांपासून दुरावत गेला. तो एकटा असले कि त्याच्या नजरेसमोर लगट करणारे प्रसेनजीत आणि माधीवीची छबी त्याला दिसायची. त्याचा जळफळाट व्हायचा. ते सोबत दिसले कि याच्या छातीत उबदार सुरी खुपसल्यासारख्या वेदना व्हायच्या... तसे तो स्वत:ला भावनिकरित्या सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. त्याने स्वताला कामात गुंतवून घेतले. गुरु ग्रहावरच्या या मोहिमेसाठी आवश्यक सर्व खगोलशास्त्रीय माहितीची जबाबदारी अंकितवर आली होती. अंकित सतत आपल्या कामातच असायचा. याचा अर्थ त्याला काम खूप आवडायचं अस नाही तर ते त्याला माधवीच्या विचारातून सुटका मिळवण्यासाठी मदत करायचे... 
...पण जेंव्हा केंव्हा तो निवांत असायचा तेंव्हा फक्त माधवीच्या विचारांनी वेडापिसा व्हायचा... माधवी आपल्याला का मिळाली नाही? आपण कुठे कमी पडतो...? तिला मिळवण्यासाठी काय करावे लागेल?... या प्रश्नांची उत्तर शोधत असतांना त्याच्या मनात फक्त असूया आणि नैराश्य घर करुन असायचे. काहीतरी गमावल्याची भावना त्याला सतत डाचत राहायची. यावर उतारा काय? खूप कामात व्यग्र करून घ्यायचे..!!! पण तो तात्पुरता मार्ग होता. या सगळ्यांचा शेवट केला पाहिजे असे त्याने मनोमन ठरवले.










असाच एका शांत रात्री दुर्बीणतून निरीक्षण करून झाल्यावर तो माधवीचा विचार करत वेधशाळेत बसला होता. त्याच्या कार्यालयातील भिंतीवर सजावट म्हणून चितारलेले  सूर्यमालेचे भलेमोठे चित्र होते. त्याची नजर त्या चित्रावर गेली. त्याला आठवले बृहस्पती-.. गुरु ग्रहावरील मोहीम..सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरुजणू इतर ग्रहांचा राजा शोभावा असा दिमाखात चमकत होता... त्या चित्रातील गुरु ग्रहाभोवती अंकित एकटक बघत विचारात गढून गेला... त्याची नजर इतकी खोल आणि शून्य होत गेली कि थोड्याच वेळात गुरु च्या गोल आकारात त्याला प्रसेनजीतचा प्रसन्न चेहरा दिसायला लागला. त्याच्या मनाने आपोआप तुलना करायला सुरुवात केली..... गुरु, सगळ्यां ग्रहांचा राजा म्हणजे प्रसेनजीत...तर तो तिकडे सतेज शुक्र म्हणजे विनस सौंदर्याच्या देवीच्या गळ्यातील तेजस्वी माणिक इतकी तेजस्वी फक्त माधवीच आहे.... या शुक्रताऱ्याला आपलस करणारा.. आपल्या प्रचंड व्यक्तिमत्वाने सगळ्यांना जिंकून घेणारा गुरु’...नाही प्रसेनजीत... किती सहज त्याला जग जिंकता येते... जर प्रसेनजीत गुरुअसेल आणि माधवी शुक्रतर या सूर्यमालेत आपल स्थान कुठल...?... तो स्वतःला शोधत शोधत सूर्यमालेच्या पार कोपर्यापर्यंत पोहचला... तिथे त्याला तो गवसला...’हो तोच मीअसे त्याला वाटले...प्लुटो, अंधारात अस्तित्व हरवलेला, सगळ्यांपासून तुटलेला...दुर्लक्षित असा...मृत्यूचा देव....तो म्हणजे...तो म्हणजे आपण स्वतः अंकित.

प्लुटोशी आपण साधर्म्य ठेवून आहोत आणि प्रसेनजीत गुरु ग्रहाशी..... त्याच्या मनाला असह्य कळ आली आणि शुक्र ते गुरु यातील अंतरावर त्याची नजर खिळून बसली. पाणावल्या डोळ्यांनी तो गुरु ग्रहाला रोखून बघत होता. तेंव्हाच त्याच्या मनातील खलनायक जागा होवून त्याला उकसवत होता कि तू काही केले नाहीस तर तुझ अस्तित्व शून्यवत राहील... काय करावे म्हणून अंकित विचार करतच.. मंद आणि उष्ण पाझरणाऱ्या डोळ्यावर तरलता पसरली आणि गुरु ग्रह या पाण्यात विरघळून का जात नाही असे त्याला वाटले तितक्यात त्याला गुरु ग्रहावरील एक  लालसर ठिपका दिसला... त्या ठीपक्याकडे बघत असतनाच त्याचा चेहर्यावरील सुर्कुत्यांमध्ये बदल होत होता... डोळ्यातील ओलावा जणू कोणत्यातरी प्रखरतेमुळे बाष्प होत होता.. त्याचे डोळे लगेच कोरडे झाले.. अश्रू थांबले..ते लाल झाले गुरु ग्रहावरील त्या ठिपक्यापेक्षाही लाल... शेवटी त्या ठिपक्याजवळ जात.. त्या ठिपक्यावरून  हात फिरवत अंकित खुश होवून आसुरी हसायला लागला....

तो भला मोठा लाल ठिपका... तो ठिपका गुरु ग्रहावर न जाणो कित्येक वर्षापासून आहे. ३०० वर्षाआधी तो मानवाला दिसला. तो ठिपका म्हणजे दुसर-तिसर काहीच नसून गुरु ग्रहावरील एक महाप्रचंड वादळ आहे. तब्बल  तीन पृथ्वी सामावतील एवढे प्रचंड मोठे. गुरु ग्रहावरील  मोहिमेत हा रेड स्पॉट एक डोखेदुखी ठरणार होता. गुरु ग्रह एक gas जाएंट असल्याने त्याच्यावर यान उतरवणे अशक्य होते म्हणून  बृहस्पती-०१ मोहिमेतील यान गुरु ग्रहाच्या भोवती घिरट्या घालून शक्य तितकी माहिती पृथ्वीवर पाठवणार होती. यान गुरु ग्रहाच्या खूप जवळ जाणार असल्याने या महावादळाचा धोका होताच. तो टाळण्यासाठीच अंकितने दिलेली खगोलशास्त्रीय माहिती खूप गरजेची होती. जेंव्हा यान गुरु ग्रहाच्या भोवती फिरेल तेंव्हा या वादळाचे स्थान टाळावे लागणार होते. हे वादळ ताशी ३६० किलोमीटरच्या वेगाने वाहत असल्याने त्याला टाळणे खूप जिकरीचे काम होते. मात्र  अंकित सारख्या हुशार खगोलशास्त्रज्ञाने अनेक क्लिष्ट गणिते करून त्यातून मार्ग काढला होता... त्यासाठीच अंकित सतत गुरु ग्रहाचे निरीक्षण करत असायचा. आज जरा उसंत मिळाली म्हणून तो निवांत माधवीचा विचार करत होता तर भावनिक झाला. माधवीला मिळवण्यासाठी तो कोणत्याही स्तराला जायला तयार होता.. सूर्यमालेतील चित्राकडे बघितल्यावर तर त्याला तो मार्गच मिळाला....
दोन रात्रीपूर्वी गुरु ग्रहाचे निरीक्षण करत असतांना अंकितला या मोठ्या ठीपक्यासोबतच एक नवीन ठिपका दिसला होता. नवीन ठिपका खूप काही मोठा नव्हता. मोठ्या ठीपक्याच्या मानाने तो क्षुल्लकच. नवीन ठिपकासुद्धा मोठ्या ठिपक्यासारखेच वादळ असण्याची शक्यता अंकीतला वाटत होती. त्याची पूर्ण शहनिशा केल्यावरच हि नवीन ठिपक्याची बातमी जाहीर करण्याचे त्याने ठरवले होते.
सूर्यमालेच्या चित्रापासून दूर होत तो झटकन आपल्या संगणकाच्या जवळ गेला. भरभर.. झपाटल्यासारखी आतापर्यंतच्या निरीक्षणाची आणि रेडीओ दुर्बिणीद्वारे मिळालेली माहिती चाळायला लागला. जसजशी त्याची माहिती वाचून होत होती तसतशी त्याच्या चेहऱ्यावरील भावदर्शक लकेरी बहरत होत्या. शेवटी त्याला त्याच्या प्रेमातील अडसर दूर करण्याचा मार्ग मिळाला होता...!!तो खुश होता...अगदी मनापासून हसत त्याने टेबलावरील पेपरवेट उचलून पूर्ण ताकतीनिशी सूर्यमालेच्या चित्रातील गुरु ग्रहाकडे भिरकावला. त्यामुळे चित्रातील गुरुग्रहावर असलेल्या मोठ्या ठिपक्या शेजारी  एक छोटीशी खोच पडली... एक छोटासा ठिपका उमटला...द लिटील रेड स्पॉट!!!!.. अगदी त्याला नव्याने सापडलेल्या वादळा इतकाच तो नवीन ठिपका... हो ते एक वादळच होते... उध्वस्त करणारे वादळ... खूप काही उध्वस्त करणारे वादळ!!!!
नवीन,कुणाचेही लक्ष जाणार नाही इतके छोटेसे वादळ गुरु ग्रहावर घोंगावत होते. त्याचे ठिकाण,त्याचा वेग, त्याची विध्वंसकता अंकितलाच फक्त ठावूक होती आणि मोहिमेसाठी हे वादळ घातक होते हे सुद्धा तो जाणून होता. त्याच्या वेगाचा विचार करता हे वादळ नेमके यान जिथे घिरट्या घालणार आहे तिथेच पोहचणार याची त्याला खात्री होती त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या यानात दुर्दैवी मनोजसोबत  दुष्ट,गर्विष्ठ प्रसेनजीत असणार होता...नवीन वादळाचे गुपित अंकित  कुणालाच सांगणार नव्हता... त्याच्या काचेसारख्या नाजूक प्रेमावर चढलेली काजळी पुसण्यासाठी तो वादळाचा वापर करणार होता... इतका निग्रही अंकित...



------------------------------------                    -------------------------------            --                             ---------------------------

इस्रोचे यान आकाशात झेपावले आणि ठरल्यावेळी गुरुग्रहाच्या कक्षेत पोचले सुद्धा. ते गुरुग्रहाच्या भोवती फिरून गुरुग्रहाभोवती घिरट्या घालायला लागले. गुरु आपले काम चांगल्या प्रकारे बजावत आहे असा संदेश मिळाला. सगळ ठीक सुरु होते. मोहिमेला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळत होते. तिथून पाठवण्यात येणाऱ्या माहितीचा खजिना अभ्यासण्यात इस्रोतील सर्व शास्त्रज्ञ मग्न होते.. पण दुर्दैव!!! अचानक गुरुग्रहावरील यानातून येणारे संदेश एकाएकी बंद पडले.
----------------                -----------------------              -------------------------------
मागच्या आठ दिवसापासून बृहस्पती यानाकडून कुठलाच संदेश मिळत नव्हता. अचानक सगळे संपर्क तुटले होते... कुणालाच कारण कळत नव्हत.... सगळे अनभिज्ञ होते... मात्र एकाला सगळ माहित होत... चेहऱ्यावर खोटा दुखवटा आणून आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्या फक्त एकाच व्यक्तीच्या मनात...अंकित......
इस्रोचे सगळे लोक चिंतेत दिसत होते. खूप मोठ्या संकटाला ते सामोरे जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रो ची खूपच नालस्ती झाली होती. अद्यावत तंत्रज्ञान, हुशार शास्त्रज्ञ, उत्कृष्ट यान, सक्षम अंतराळवीर आणि खोगोलशास्त्राचे इतम्भूत ज्ञान  असल्यावरही बृहस्पती मोहीम अपयशी झाल्यासारखी वाटत होती. अचानक संपर्क तुटल्यामुळे तिथे नेमके काय घडले हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता.
माधवी सगळ्यात जास्त चिंतातूर दिसत होती. तिचा प्रसेनजीत...कसा असेल तो? परग्रहावर... ??? काय झाल असेल...? जिवंत तरी असेल न...? आठ दिवसापासून काहीच पत्ता लागत नसल्याने सगळ्यांनी ते जिवंत असण्याची आशा जवळपास सोडलीच होती. अंतराळविरांच्याच चुकीमुळे अपघात झाला असेल आणि त्यात यानासहित त्यांचाही अंत झाला असेल असा तर्क काढण्यात आला. प्रसेनजीत आणि मनोज दोन्हीही अंतराळवीर आता परत येणार नव्हते.
अंकितसाठी तर अवघी आकाशगंगाच उजळून निघाली होती. त्याने चेहऱ्यावरील आनंदाचे भाव लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यात तो यशस्वीही झाला होता. आता बस काही दिवसानंतर तो माधवीला लग्नासाठी मागणी घालणार आणि माधवी नेहमीसाठी त्याला मिळणार हि भावना त्याला दुखी आणि स्वथ बसूच देत नव्हती. तो पूर्वीपेक्षा जास्तच चैतन्याने वावरत होता.... तशी त्याच्यावर कुणालाही शंका आली नाही, फक्त माधवीला त्याच्या वागण्यातील बदल खटकत होता.





माधवी... मनातील गोष्टी चेहऱ्यावरून वाचणारी मानसोपचारतज्ञ.. तिच्या नजरेतून अंकितमधील बदल सुटला नाही. एका-एकी  झालेला हा बदल तिच्या विचारी मनाला खटकत होता. कारण व्यक्तीच्या स्वभावात बदल पडायला खूप वेळ लागतो आणि तो लवकर पडलाच तर त्याला तसे कारणही असते हे तिला माणसशास्त्राने शिकवले होते. अंकितमधील  बदलाच एक कारण ती समजू शकत होती ते म्हणजे प्रसेनजीत नसल्याने आता तो तिच्यासोबत बिनधास्त बोलू शकायचा, भेटू शकायचा म्हणून कदाचित तो पूर्वीपेक्षा आनंदाने राहू शकत असेल. पण तरीही एवढ्यात त्याच्या बोलण्यातून एक श्रेष्ठत्वाची मिजास दिसत होती. कुठल्यातरी नकारात्मक गंडातून बाहेर पडल्यानंतर किंवा स्वताला सिध्द केल्यानंतर जो वागण्या बोल्यात एकप्रकारचा अहंयेतो दिसत होता. ती विचार करायला लागली कि त्याने अस कुठल कृत्य केल कि ज्याचा त्याला गर्व वाटत आहे. उलट बृहस्पती मोहीम अपयशी झाली त्यात तोही असल्याने त्यानेही इतरांसारखं खजील व्हायला पाहिजे.

सहा महिने निघून गेले. माधवी प्रसेनजीतच्या धक्क्यातून थोडी सावरली. इस्रोचे काम पूर्ववत चालू झाले. अंकितहि वाट बघून कंटाळला होता. त्याने शेवटी माधवीजवळ प्रेम व्यक्त करायचे ठरवले. सायंकाळी जेवायला जायचे  निमित्त करून तिची भेट घेतली.... त्याच्या मनातील प्रेम बोलून दाखवले.. पण प्रसेनजीतच्या आठवणी अजून पुसल्या न गेल्यामुळे माधवीने त्याला स्पष्ट नकार दिला. अंकितने हजार तऱ्हेने तिला आपले प्रेम व्यक्त केले तरी माधवी निश्चल होती. अंकित हताश होवून परतला.

अंकितला जिंकूनही हरल्यासारखे वाटायला लागले. त्याने तिच्या आई-वडिलांजवळ सुद्धा विषय काढून बघितला. त्यांनी माधवीच्या इच्छेशिवाय आम्ही तिच्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेत नाही असे स्पष्टपणे त्याला सांगितले. शेवटी त्याने पूर्ण माघार घेतली.... परंतु आता त्याच्या माघार घेण्याने गोष्ट थांबणार नव्हती...गुरुग्रहावरील तो छोटासा ठिपका त्याच्या नशिबाच्या रेषेवर तीळ म्हणून उतरत होता...












माधवीला जिंकायचं असेल तर आपण काहीतरी भरीव काम कराव. प्रसिद्ध व्हाव, मान-सन्मान मिळवावा अस त्याला वाटायचं. या गोष्टीने थोड तरी तीच प्रेम मिळेल म्हणून गुरुमोहिमेच्यावेळी सापडलेल्या त्या छोट्याश्या ठिपक्याची आता त्याला मदत घ्यायची होती. तो ठिपका त्याला आताच सापडला अस भासवायचं होत आणि गुरुयान याच ठिपक्यामुळे नष्ट झाले हे सिध्द करून नाव कमवायचं होत. पण त्यासाठी त्या ठिपक्याबद्दल साठवून ठेवलेली पूर्वीची माहिती त्याला नष्ट करणे गरजेचे होते. तो चोरून आपल्या कार्यालयतील कागदपत्रे नष्ट करायच्या कामी लागला. आणि त्याचवेळी आपण गुरुयानाच्या संबंधी संशोधन करतोय असे सांगायला लागला.




माधवीला प्रसेनजीतचे असे निघून जाणे असह्य वाटत होते. तिला अजूनही वाटायचे कि तो परत येईल. सत्य मात्र तिच्या या कल्पनेला दुजोरा देत नव्हते. तिला वाटायचं अस अधांतरी राहिल्यापेक्षा  प्रसेनजीत नक्कीच जिवंत नाही याचा पुरावा मिळाला तर.. तिच्या मनाची घालमेल जरा कमी होईल. अंकित गुरुयानासंबधी संशोधन करतोय असे माहित पडल्यावर ती त्याला भेटायला गेली. त्याच्या संशोधनात मदत करून नेमके प्रसेनजीतसोबत काय घडले हे तिला जाणून घ्यायचे होते.

माधवी संशोधनात मदत करायच्या कारणाने का  होईना पण आपल्या सोबत असेल आणि त्यामुळे तिच प्रेम जिंकण्याची एक संधी आपल्याला मिळेल म्हणून त्यानेही तिच्या मदतीला आनंदाने होकार दिला. दोघे मिळून संशोधन करायला लागले. अंकित तर फक्त संशोधन कार्याचा दिखावा करत होता. त्याचा बहुतेक वेळ तिची स्तुती करण्यात, तिला निरखण्यात आणि तीच प्रेम जिंकण्याच्या प्रयत्नातच  जात होता.

असेच एक दिवस अंकीतला वेधशाळेत यायला वेळ लागल्याने माधवी एकटीच गुरु ग्रहाचे निरीक्षण करत होती. जरी ती मानसशास्त्राची असली तरी सतत अनेक खगोलशास्त्रज्ञांसोबत तिने काम केले असल्याने तिला ग्रहांचे निरीक्षण कसे करायचे, मिळणार्या माहितीचा लेखा-जोखा कसा करायचा हे समजत होते. वेधशाळेतील आपल्या याच कामात ती गुंतली होती आणि मिळालेल्या माहितीचे पृत्थकरण करता-करता तिला जाणवल कि गुरुग्रहावरील मोठ्या रेड स्पॉट शेजारी एक छोटासा आणखी ठिपका दिसतोय. ती त्या ठिपक्याचे निरीक्षण करायला लागली आणि तिला आपल्या ज्ञानाने प्रभावित करण्यासाठी म्हणून अंकितनेच शिकवलेले काही गणिते मांडून बघू लागली.  जशी जशी ती गणिते सोडवायला लागली, आपल्या निरीक्षणाशी पडताळून बघायला लागली तासतसे तिला सत्य सापडत गेले. तरीही तिचा अजून विश्वास बसत नव्हता. अंकित अस काही करेल असे वाटत नव्हते.. तिने अंकितच्या कार्यालयात जावून झडती घेतली तर तिला सत्य सांगणारे काही कागदपतत्रे मिळाली. परत वेधशाळेत येवून सर्व घटनाक्रमावर सुरुवातीपासून विचार करायला लागली. तिचे डोके सुन्न पडायला लागली. खुर्चीवर मान टेकवून शून्य नजरेने बघायला लागली. प्रसेनजीतची प्रचंड आठवण आली... कसा होता माझा प्रसेनजीत अगदी या भिंतीवरील चित्रातील गुरुग्रहासारखा... भारदस्त... तिचे डोळे पाणावले... डोळ्यांवर हळूच उष्ण अश्रू तरळला.. त्या अश्रूत गुरुग्रह वितळत जातो कि काय असे तिला जाणवले... आणि जाणवले गुरुग्रहावरील मोठ्या वाढलाजवळ आपोआप उमटलेले छोटेशे वादळ... ज्याने तिच्या प्रसेनजीतला हिरावून घेतले... पण ते तिथे आले कसे..झपाट्याने उठली...सूर्यमालेच्या चित्राजवळ गेली..तिने निरखून बघितले कि ते कुणी चितारलेले नाहीय तर गुरुग्रहाला एक खोल खोच लागली आहे. ती खोच नक्कीच काहीतरी फेकून मारल्याने लागली असेल. पण इतक्या उंचावर आणि नेमक्या गुरु ग्रहालाच कोण काही फेकून मारेल....? या सगळ्यांचे उत्तर तिला हवे होते...तिला अंकितला जाब विचारायचा होता.. पण तो इतक्या सहज कबूल करणार नाही हे तिला ठावूक होते...शेवटी तिचे मानसशास्त्राचे ज्ञान ती वापरणार होती.. तिने त्या लाल ठिपक्या पेक्षाही भडक झालेल्या डोळ्यांना पुसले.. आणि अंकितची वाट बघायला लागली...



ती वाट बघतच होती कि थोड्यावेळातच अंकित तिथे आला. तो आल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरील भाव तिने मुद्दाम बदलले..माधवीने त्याला खूप आपलेपणाने चौकशी केली. तिच्या आवाजातील आपलेपणा आणि तो गोडवा अंकितला खूप छान वाटला. हि अचानक अशी का वागत आहे अशी शंका त्याला क्षणभर आली पण माधवीच्या आवाजातील मार्दव इतके भुरळ पाडणारे होते कि त्या शंकेला जागच्या जागीच त्याने पुरून टाकले. हि जर खरच इतकी आपलेपणाने वागत असेल तर आपण हिला जिंकू शकतो, आपली करू शकतो असे त्याला वाटायला लागले. तो आपल्या खुर्चीत  जावून बसला, मात्र माधवीच्या चेहर्यावरून त्याची नजर हटत नव्हती. माधवीसुद्धा अगदी त्याच्या खुर्चीच्या हातावर बसली. मुद्दाम त्याला नजरेत पकडत बोलू लागली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते सगळ अंकितसाठी नवीन होते. तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या प्रत्येक गोष्टीत होकार भरत होता. त्याला स्वर्गात असल्यासारखे वाटत होते. तो जणू हवेवर तरंगत होता. तो हलका-हलका झाला होता. आकाशाच्या निर्वात पोकळीत वाटते तसे त्याला वाटत होते...शून्य गुरुत्वाकर्षण... भान हरपून तिचे बोलणे ऐकत राहावे.. तिच्या डोळ्यात असेच बघत राहावे...एकटक... तिच्याशी ती म्हणते त्याप्रमाणे प्रामाणिक प्रेम करावे..सगळे खरे-खरे तिला सांगावे...ती विचारते त्याचे उत्तर द्यावीत... बस तिचा फक्त हुकुम ऐकत मनापासून तिच्यासाठी काहीही करावे.. त्याला आता माधवी शिवाय कसलाही आवाज ऐकू येत नव्हता... स्वतःच्या श्वासांची लय सुद्धा ऐकू येत नव्हती... तो पूर्ण तिचा झाला



होता... माधवी-माधवी.... माधवी जे विचारेल त्याची खर-खर उत्तरे देत होता...तो फक्त तिचा झाला होता... आणि अचानक!!!!.... सगळ बोलून झाल्यावर... माधवीने त्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिल्यावर... त्याच्या उजव्या छातीच्या फसलीजवळ खूप अनुकुचीदार काही टोचल्यासारख जाणवले...  खूप रुतले त्याला... खोल-खोल रुतले... दुखत होते पण ते दुखणे जाणवत नव्हते...स्वप्नातल्या सारखे.... खरच पडलेल्या स्वप्नातल्यासारखे...  ती टोचलेली वस्तू माधवीच्या हातात होती...तिच्या हातात काहीतरी होते... काय ते माहित नाही..पण अनुकुचीदार असे.. आणि त्याला जाणवले कि आपल्या छातीजवळ ओलसर काहीतरी वाहतय... थंडगार काहीतरी... माधवीच्या डोळ्यातील थंडगार अश्रूतर नाही...? पण जस-जसा क्षण जात होता तसतसा अंकितच्या शर्टावर एक लालसर ठिपका उमटत होता.....एक छोटासा लाल ठिपका... गुरुग्रहावर होता तसा एक लिटील रेड स्पॉट....’


------------------------------समाप्त---------------------------------
      



रविवार, १४ मे, २०१७

बटरफ्लाय... आणि १९८३ ...




वर्ष:१९८३ स्थळ: लॉर्डस क्रिकेटचे मैदान  

लॉर्डस चे मैदान..... सामना सुरु होता.... प्रतिक आपल्या आसनावरून विवियन रिचर्डस कडे बघत होता.. विवियन क्षेत्र-रक्षण करतांना त्याला दिसत होता... विवयन रिचर्डस आपल्या स्वभावाला साजेसा मनमौजी आणि बिंनधास्त वाटत होता... खरतर प्रतीकला याच बिनधास्तपणाची काळजी वाटत होती...! विवियनने या क्षणाला तरी थोड गंभीर व्हाव... निदान फलंदाजीला यायच्या आधी प्रतीकने दिलेला चिटोरा तरी बघावा बस..!! त्या चीटोऱ्यावर त्याची आणि डॉक्टरांची मोहिमेची यशस्विता अवलंबून होती... पण जर का तो चिटोरा विवियन ने बघितला नाही तर..!!!??? प्रतिक चिंताक्रांत होवून सामना बघत होता...प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं लॉर्डस चे मैदान... भारताची फलंदाजी.......आणि..

वर्ष: २०१८  स्थळ:भारतीय विज्ञान केंद्र 

 डॉक्टर चहा घ्यायला कॅन्टीनमध्ये आले. आपल्या नेहमीच्या खुर्चीवर बसले. तिथे प्रयोगशाळेतील इतर सहकारी होते परंतु सगळे दूरदर्शनवरती भारताचा क्रिकेटचा सामना बघण्यात मश्गुल होते. डॉक्टरांना क्रिकेट अजिबात आवडत नव्हते. त्यांच्यामते क्रिकेटमुळे भारतातील अनेक लोक आपला वेळ आणि शक्ती खर्च करतात. सामना सुरु नसला तर इतरवेळी क्रिकेटच्या गोष्टी, खेळाडू आणि त्यांची लफडी असल्या फालतू गोष्टीत रमतात. त्यातल्या त्यात डॉक्टरांना तो इंग्रजांचा खेळ म्हणून त्याबद्दल तिटकाराच....त्यापेक्षा हॉकी खूप सुंदर खेळ अस त्यांना वाटायचं.. ते हॉकीच्या आकंठ प्रेमात होते.. कर्नल ध्यानचंद त्यांचे दैवत..परंतु भारताचा राष्ट्रीय खेळ असल्यावरही हॉकी उपेक्षित राहिला याची खंत त्यांना वाटायची पण त्यासाठी ते काही करुही शकत नव्हते.. हॉकीसाठी त्यांचा जीव तुटायचा..उधम सिंग,लेस्ली क्लोडीअस,धनराज पिल्ले, बलबीर सिंग सिनिअर यांचे कित्येक किस्से त्यांच्या जीवनाच्या आनंदाचे एक कारण होते.. धनराज पिल्लेचा खेळ बघायला त्यांना खुप आवडे. तेंडूलकर एवजी पिल्ले हा भारताचा स्पोर्ट आयकॉन व्हावा अस त्यांना वाटे.... त्यांची खूप इच्छा होती कि आपल्या जिवंतपणी भारताने एकदा तरी हॉकीचा विश्वचषक जिंकावा जेणेकरून भारतातील लोक परत हॉकी बघायला सुरुवात करतील आणि हॉकीला चांगले दिवस येतील... जसे १९८३ चा क्रिकेट-विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात फक्त  क्रिकेट आणि क्रिकेटचाच बोलबाला झाला आणि आज क्रिकेटने अक्षरशा लोकानां वेड लावलंय...
ते आपल्याच तंद्रीत असताना तिथे  त्यांचा विद्यार्थी प्रतिक पोचला. त्यांच्या शेजारी बसत प्रतीकने चहा मागवला व डॉक्टरांशी बोलायला लागला,

 “सर, कसला विचार करताय?’

“क्रिकेट!! हा खेळ वाटोळ करेल आपल्या देशाच. त्यात ते स्पोट फिक्सिंग, म्याच फिक्सिंग... सारी नैतीकताच घालवलिय... भांडवलशाही खेळ आहे...पूर्वी पाच दिवस, मग एक दिवस आत ते २०-२० ... वर्षभर फक्त क्रिकेट, क्रिकेट क्रिकेटच... अरे बाकीचेही खेळ आहेत...  ज्यात कस लागते.. जास्त शारीरिक तंदुरस्ती लागते... !!!”
त्यांना मधेच थांबवत प्रतिक म्हणाला, “जाऊ द्या हो सर, आपल्या काळजी केल्यामुळे काही होणार आहे का?”
“हं....!!! होईल...!! नक्की होईल..! माझ्या डोक्यात एक कल्पना आलीय... सायंकाळी निवांत बोलूयात... तू ये माझ्या बंगल्यावर.. आणि आज कार्यालयातील कामे तूच सांभाळ.. कुणीही आल तरी मला फोन करू नकोस... चल येतो मी... पण तू सायंकाळी न चुकता ये.. आपल्याला हे क्रिकेटच भूत उतरवावंच लागेल.”
डॉक्टर खूपच गडबडीत निघून गेले... नेहमी सारखे.. पण आज थोडी वेगळीच झाक होती त्याच्या डोळ्यात असे प्रतीकला वाटले. संध्याकाळी भेटून नेमक डॉक्टरांच्या मनात काय सुरु आहे ते कळेल म्हणून तोही चहाचे पैसे देवून निघून गेला.....

वर्ष:१९८३ स्थळ: लॉर्डस क्रिकेटचे मैदान

प्रतिक विवियन कडे टक लावून बघत होता. जेनेकरुन त्याला तो इशारा करू शकेल कि तुझ्या खिशातील चिटोरा नक्की बघ... परंतु भारताची फलंदाजी संपली तरी विवियनची नजर त्याला पकडता आली नाही. शेवटी भारताने ५५ व्या षटकात सर्वबाद १८३ धावा काढल्या आणि सगळे खेळाडू पव्हेलीयनकडे जायला निघाले. नेमका तेंव्हाच विवियनला प्रतिक दिसला. प्रतीकने त्याला चिटोरा वाच असा इशारा केला. विवियन खिशात हात घालून चिटोरा बघायला लागला आणि एकाएक जागीच थांबला.....
विवियनने  तिथल्याच एका सुरक्षा कर्मचाऱ्याला बोलावले व प्रतिककडे बोट दाखवत  काहीतरी सांगितले. विवियन पुढे निघून गेला आणि सुरक्षा कर्मचारी प्रतिककडे आला. प्रतीकला विवियनने ड्रेसिंग रूम मध्ये भेटायला बोलावले असे सांगितले. प्रतिकच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. दुसर्यांदा तो ड्रेसिंगरूकडे जात होता...

प्रतिक पव्हेलीयन जवळ पोहचला. त्याचीच वाट बघत थांबलेला विवियन त्याचे बखोटे पकडून त्याला आपल्या खोलीत जवळ जवळ ओढतच घेवून गेला. दार बंद करुन त्याला विचारले,

“सामना सुरु व्हायच्या आधी तू विनवणी करून दिलेला चिटोरा मी आता बघितला. कोण आहेस तू? आणि हि काय  भानगड आहे? या चीटोऱ्यावरील लिहिलेल्या  गोष्टी  तुला आधीच कशा ठावूक? .. भारतीय दिसतोस म्हणजे जादू टोना, भविष्य, काळे  जादू तुला येतच असेल?” वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती...
त्याला शांतपणे प्रतिक उत्तर  देत म्हणाला,

‘विव, आधी शांत हो आणि माझ काय म्हणन आहे ते ऐकून घे.” विवियन शांत झाला. प्रतिक बोलायला लागला,

“हा जो चिटोरा मी तुला सामना सुरु व्हायच्या आधी दिला होता. तो कागद एक कम्प्युटरच्या माध्यमातून काढलेली प्रिंट आहे.”

“प्रिंट? म्हणजे कसं?”

“या सगळ्या गोष्टी १९८३ मध्ये लोकांना कळणार नाहीत पण तरी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. भविष्यातील २०१७ साली मानवाने विज्ञानात खूप प्रगती केली आहे. आणि मी त्या प्रगत काळातून प्रवास करून आजच्या दिवशी इथे फक्त तुला भेटायला आलो आहे.”

“म्हणजे तू काळाचा प्रवास करून आला आहेस”

“हो. एच.जी.वेल्स ने आपल्या कादंबरीत सांगितल्या प्रमाणे २०१७ तील मानव टाईम ट्रावेल करू शकतो.”
विवियन आश्चर्याने त्याचे म्हणणे ऐकत होता, 

“...परंतु त्याचा वापर बेकायदा ठरवल्यामुळे आणि सोबतच खर्चिक असल्यामुळे फक्त अति-महत्वाच्या संशोधनासाठीच शाशनाकडून असल्या प्रवासाची परवानगी दिल्या जाते... पण ते जावू दे, महत्वाच हे कि, आता मी तुला भेटायला आलोय खरा परंतु मी शासनाची परवानगी काढलेली नाही कारण... “

“पण तु भूतकाळात कशासाठी आला आहेस?”

“तुला भेटायला.”

“...म्हणजे?!”, विवियन दचकुनच म्हणाला.

“हा चिटोरा बघ. १९८३ चा हा विश्वचषक भारत जिंकणार आहे. तुला आधीच दिलेलं भारताच्या फलांदाजीचे स्कोर कार्ड..
विवियन याच गोष्टीमुळे तर अचंबित झाला होता. सामना सुरु व्हायच्या आधी प्रतीकने विवियनची भेट घेतली आणि त्याची इच्छा नसताना खूप विनवणी करून हा चिटोरा त्याला दिला होता. परंतु सामना सुरु होण्याच्या गडबडीत त्याने तो तसाच आपल्या खिशात कोंबला होता. आता बघतो तर काय त्यातील प्रत्येक गोष्ट तंतोतंत खरी होती.

“विव,हे मी तुला आधीच दिल असल्याने तुला विश्वास तर बसलाच असेल कि मी जे बोलतो ते सत्य आहे. आणि आता हे बघ वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची आकडेवारी जी मी २०१७ मधून आणली आहे... तू ३३ धावांवर बाद होणार आहेस... आणि पूर्ण वेस्ट इंडीज संघ १४० धावांवर...

या सामन्यात तू ३३ धावांवर बाद होणार आहेस..आणि तू बाद झाला म्हणजे भारत विश्वचषक जिंकला....तुझा बळी या सामन्यात खूप मोलाचा ठरणार आहे..”

“.......!!!???” रिचर्डसची वाचाच बंद झाली.

“आता तुझ्या फायद्याची गोष्ट ऐक...मला तू हा सामना जिंकावा अस वाटत... म्हणूनच मी भूतकाळात येवून तुला भेटतोय. मला तेवढा तुझ्या बाद होण्याचा क्षण बदलावायचा आहे... तुला फक्त मदनलाल च्या १४ व्या षटकातील—चेंडूवर स्वताला बाद होण्यापासून वाचवायचं आहे... कारण मदनलालच्या गोलंदाजीवर तुझा झेल उडेल आणि कपिल देव त्याला झेलेल हे ठरल आहे.. पण जर का तिथे तू बचावलास तर तू एकहाती सामना वेस्ट इंडीजला जिंकून देशील.....”

विव रिचर्ड सगळ ऐकून अचंबित झाला. त्याला आपण विज्ञान कथेतील एखादे पात्र असल्या सारखेच वाटले किंवा स्वप्नात असल्यासारखे....  त्याच्या हातातील भारताच्या फलंदाजीची आकडेवारी तंतोतंत खरी होती... आणि करेबियन फलंदाजीचीही आकडेवारी खूप काही सांगत होती.. त्यातील फलंदाजाची उतरंड आधीच ठरवल्यासारखी होती.. विवियनला आठवले कि त्यांनी कालच्या बैठकीत नेमका हाच फलंदाजी क्रम ठरवला होता आणि तो क्रम वेस्ट इंडीज संघ वगळता इतरांना माहिती असण्याची शक्यात नव्हतीच... म्हणजे प्रतीकच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारख खूप काही होत.
तरी विवियन साशंक होता, “ पण तू भारतीय असून हा सामना भारताने जिंकू नये अस तुला का वाटत...?
“सांगतो, तेही सांगतो.......” आणि प्रतिक विवियनला सांगायला लागला...

वर्ष:२०१८ स्थळ: डॉक्टरांच्या बंगल्यावर   

ठरल्यावेळी प्रतिक डॉक्टरांच्या बंगल्यावर पोहचला. त्याचीच वाट बघत असलेले डॉक्टर तो येताच त्याला घेवून आपल्या अभ्यासिकेत गेले. आतुन दार बंद केले. आणि अगदी लहान बाळासारखे उत्साहित होवून बोलायला लागले.

“प्रतिक, तू कधी काळ-प्रवास केलाय?”

“नाही सर, का?”

“मी केलाय एकदा, पण तेंव्हा मी तरुण होतो. असला प्रवास खडतर असतो. या प्रवासात तुमच्या शरीराची चांगलीच झीज होते. काही दिवसांनी ती भरून निघते परंतु प्रवास करयच्या आधी तुमच आरोग्य उत्तम असल तर कधीही चांगलच.. नाहीतर हा प्रवास जीवघेणा होवू शकतो.”

“सर, हे मला माहिती आहे पण आज हा विषय माझ्यासोबत बोलताय त्याच कारण...?”

“कारण ... कारण म्हणजे तू तरुण आहेस आणि तुला चांगल आरोग्य मिळालंय... त्यामुळे तू हा प्रवास करू शकतोस... मी करू शकत नाही.” नेमक डॉक्टरांच्या मनात काय चाललय याचा थांग प्रतीकला लागत नव्हता. तो निमुटपणे ऐकत उभा होता. डॉक्टर पुढे बोलू लागले,

“प्रतिक, आज कॅन्टीनमध्ये आपल बोलन झाल तेंव्हा पासुन माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. ती वरकरणी असंभव वाटत असली तरी ती प्रत्यक्षात आणणे तितकेसे कठीण जाणार नाही.”

“कुठली कल्पना,सर?”

“बघ, बटरफ्लाय इफेक्ट  तुला ठावूक आहे...”

“हो... पण त्याच काय?”

“या थेअरीनुसार, भौतिक जगात घडणारी लहानातील लहान घटना, हालचाल हि महत्वाचि असते म्हणजे ती छोटीशी घटना जगातील भौतिक गोष्टीवर परिणाम पाडू शकते... आणि मग त्या छोट्याश्या घटनेमुळे बदलांची एक शृंखला निर्माण होते पुढे हीच शृंखला, छोटे-छोटे बदल भौतिक जगाच रूप पालटतात. उदाहरणार्थ, समजा, एक मुलगा आहे. त्याला नोकरीच्या मुलाखतीला जायचं आहे. तो रस्त्याने निघालाय आणि मधेच त्याच्या बुटाची लेस सुटली. आता ती लेस बांधण्यासाठी त्याला वीस सेकंद वेळ लागला अस समजू. ती कृती करण्यासाठी लागलेले वीस सेकंद त्याच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे ठरू शकतात. म्हणजे बघ तो लेस बांधून पुढे जातो .. लेस बांधल्यामुळे जो वेळ गेला त्यामुळे त्याला पुढे ट्रफिक सिग्नल वर थांबाव लागल. तो सिग्नल पार करून जातो तर त्याला रेल्वे स्टेशन साठी जाणारे वाहन उशिरा मिळते आणि कसाबसा स्टेशनला पोहचतो तर रेल्वे अवघ्या काही क्षण आधी निघून गेली असते. तो आता मुलाखतीला वेळेवर पोहचू शकत नाही. त्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही. ती न मिळाल्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जाव लागत. तिथे त्याला नवीन लोक मिळतात...वगैरे वगैरे.....एकंदरीत काय तर त्या वीस सेकांन्दातील त्या छोट्याश्या कृतीमुळे त्याच्या जीवनाचा प्रवाह बदलला. आता असा विचार केला कि समजा ती बुटाची लेस सुटली नसती तर....”

““तर... तर  कदाचित त्या मुलाच्या आयुष्यात अनेक गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या. जस कि तो वेळेवर सिग्नल पार करून गेला आणि त्यामुळे त्याला रेल्वे स्टेशनसाठी वाहन मिळाले.. तो वेळेवर रेल्वेमध्ये चढू शकला आणि मुलाखतीच्या वेळी हजर झाला. त्याला ती नोकरी मिळाली आणि तो त्याच शहरात स्थायिक झाला.... ”

“बरोबर, कदाचित तिथून पुढे त्याच्या आयुष्यात वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या... जर का आपण थोड मागे गेलो आणि ती लेस सुटण्याची वेळ गाठली आणि तिला सुटू दिले नाही तर....? जगत असतांना अशा खूप गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या असतात कि आपण फक्त त्या एका क्षणाला जबाबदार धरत असतो. खुपदा असा विचार करतो कि तो एक क्षण मी बदलू शकलो तर... एका क्षणाच एवढ महत्व असते.!!!!”

“सर हे खूप अफाट आहे...”

“हं!!! मग या गोष्टीवर मी दुपारपासून विचार केला आणि आपण दोघे असा प्रयोग करायचा हे ठरवलं... म्हणजे तू सोबत आहेसच अस ग्राह्य धरलय मी... त्यासाठीच दुपारी घरी येवून संपूर्ण प्लान आखलाय.”

“आणि हा प्रयोग यशस्वी झालेला मला बघायचा आहे सर! मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे.”

“ऐक तर मग, आजपासून बरोबर ३ महिन्यांनी म्हणजे २५ जून २०१८ ला भारताला  १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून ३५ वर्ष पूर्ण होतील. आपल्याला हीच वेळ साधायची आहे. विज्ञान भवनातील टाईम मशीनचा उपयोग करून आपण ३५ वर्ष मागे सहज जावू शकतो. परंतु ती मशीन वापरायची असेल तर शाशानाला सर्व कारणे आणि डीटेल्स द्यावी लागतील. आपण मशीन कशासाठी वापरणार आहे हे कळल्यावर शाशन आपल्याला मशीन वापरण्याची परवानगी देणार नाहीच म्हणून आपल्याला ती चोरून वापरावी लागणार आहे....”

“पण आपल्याला ती नेमकी कशासाठी वापरायची आहे?”

“अरे हो ते सांगायचं राहिलच.... भारताला या क्रिकेटने वेड लावलय. मला हे बदलायचं आहे. भारतात क्रिकेटचा प्रसार का झाला? यावर जेंव्हा मी विचार केला तेंव्हा लक्षात आल कि १९८३ चा विश्वचषक भारताने जिंकला आणि त्यानंतर भारतात क्रिकेट झपाट्याने वाढले. समजा भारत तो विश्वचषक जिंकला नसता तर... तर आज जिकडे-तिकडे  हॉकीसारखा खेळ खेळल्या गेला असता. मला क्रिकेट पासुन सुटका हवीय. मला हॉकी एक महान खेळ झालेला बघायचं आहे. त्यासाठी भारताला १९८३ चा विश्वचषकात हारावे लागेल.”

“पण ते कस करायचं...”

“जस कि आपण मघाशी बोललो कि एक छोटीशी घटना सुद्धा खूप मोठे बदल घडवू शकते आपल्यालाही तेच करायचं. भारताला विश्वचषक जिंकता आला कारण त्यादिवशी वेस्ट इंडीज चा ख्यातनाम फलंदाज रिचर्डस लवकर बाद झाला. त्याचा कपिल देवने घेतलेला झेल खूप महत्वाचा होता. आता जर का तो क्षण आपण बदलला तर. म्हणजे तू भूतकाळात जावून तशी तजवीज केली कि रिचर्डसला तेवढा चेंडू बचावात्मक खेळायला लावला तर तो झेलबाद होणार नाही आणि एकहाती सामना वेस्ट इंडिजला जिंकुन देईल.”

“पण सर हे त्याला कस सांगायचं?”

“त्याची काळजी करू नकोस. तुझी आणि त्याची भेट कशी होईल याची व्यवस्था आपल्याला लावता येईल.”

वर्ष:१९८३ वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरु व्हायच्या आधी

“...... आणि अशाप्रकारे मी ३५ वर्ष भूतकाळात येवून तुझ्यापुढे उभा आहे. नशीब २०१७ सारखी सुरक्षा व्यवस्था १९८३ मध्ये नाहीय.. असती तर तुला एवढ्या सहज भेटता आल नसते.”

प्रतीकने विवियनला सारा वृतांत सांगितला. विवियन ने आपल्या  हातातील चीटोऱ्यावर नजर टाकली. त्याच्या नावापुढे २८ चेंडूत ३३ धावा लिहिलेल्या त्याला दिसल्या आणि सगळ्यात खाली भारत ४३ धावांनी विजयी असे लिहिलेले दिसले. त्याने एकदा प्रतिकच्या चेहऱ्याकडे बघितले आणि मंदसे स्मित देत प्रतिकची रजा घेतली.

प्रतिक सामना बघायला आपल्या जाग्यावर येवून बसला. तिकडे विवियन फलंदाजीसाठी तयार व्हायला निघून गेला.
विवियन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. तो अधून मधून हातातील कागदावर बघत होता आणि तेवढ्यात वेस्ट इंडिजचा पहिला गडी ५ धावांवर बाद झाला.. ग्रीनीज... त्याने बारा चेंडूत फक्त एक धाव काढली होती. विवियनने तेंव्हाच आपल्या हातातील कागदाकडे बघितले आणि.... त्याला आता सगळे कळून चुकले. त्याने दुरूनच प्रतिकला अंगठा दाखवला. त्याचा अंगठा बघून प्रतीकही समाधानी झाला....

वर्ष:  २६ जून २०१८
प्रतिक झोपेतुन उठला. कितीतरी वर्षाची झोप घेवून आल्यासारखे त्याला वाटत होते. तो कामावर जायला निघाला. डॉक्टरांचा त्याला लवकर कामावर ये असा संदेश आला होताच. त्याने लवकरच तयारी केली. आपल्या चारचाकीत बसला. तेवढ्यात त्याच्या बुटाची लेस सुटलेली दिसली.. ती परत बांधून झाली आणि गाडी सुरु केली. लेस बांधण्यात वेळ गेल्यामुळे पुढल्या चौकात सिग्नलवर त्याला गाडी थांबवावी लागली. तो गाडीच्या काचेतून बघत होता, आपल्या उजवीकडे बघितले तर तिथे त्याला धनराज पिल्ले याचे मोठे पोस्टर लागलेले दिसले. डावीकडे वानखेडे हॉकी स्टेडीयम सजवल्या जात होते. आज भारत आणि पाकिस्तानचा हॉकी सामना होता. त्याला कळले कि डॉक्टर आज कामाला दांडी मारून हॉकी सामना बघायला जातील. या हॉकीमुळे साऱ्या देशाच वाटोळ होईल एक दिवस असेही त्याला वाटले. तिकीट घेण्यासाठी मैदानाबाहेर लांबलचक रांग दिसत होती त्यामुळे पुढे कदाचित ट्रफिक जाम झालाही असेल अस त्याला वाटल. तेवढ्यात सिग्नल सुटला... आज सिग्नलमुळे कामावर पोहचायला त्याला वीस सेकंद उशीर होणार होता...




रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

मनी प्लांट भाग:१ (कथा)


मी आळसावालो  होतो. शेरलोक्स होल्म्सच्या घराच्या बाबतीत हे नेहमीचच . जर तुम्ही काही करत नसाल तर तुम्हाला येथे हमखास आळस आल्याशिवाय राहत नाही  म्हणूनच कदाचित शेरलोक्स सतत काहीतरी करत असतो. आताही तो कुठल्यातरी त्यानेच शोधलेल्या वात्रट आणि त्याच्याच नुसार गुणकारी असलेल्या यंत्रासोबत कसलेतरी निष्फळ चाळे करत होता. मला एक कळत नाही या माणसाला एवढा वेळ मिळतो कसा? मी आपल्या विचारांच्या धुंदीत होतो. बेकर्स स्ट्रीट वरील या शेरलोक्सच्या घरच्या खिडकीतून बाहेर मला एव्हढ्यात  शहरात दिसणारे  नेहमीचे दृश्य दिसत होते. ‘वृक्षारोपण’ असल्या गोंडस नावाने चालणारा आणिसरकारी खर्च करून, पैसेखाऊ राजकारण्यासाठी हमखास राखीव कुरण म्हणून ओळखल्या जाणारा प्रकार सुरु होता. तीन सरकारी कर्मचारी त्या इवल्याश्या रोपट्याला खूपच नजाकतीने पकडून त्याचे रोपण करत होते. तेवढ्यात स्टडी रूम मधील फोन खणाणला. शेरलोक्स यंत्राच्या गुंतावाळ्यात असल्याने नाईलाजाने मलाच फोन घ्यावा लागला. तिकडून स्कॉटलंडयार्ड पोलिसचे इन्स्पेक्टर लीस्तार्द बोलत होते.
“मि. होल्म्स् आहेत?”
“हो आहेत,... पण ते अतिशय महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने तुम्ही मला निरोप सांगू शकता, मी त्यांना आपला निरोप त्वरित कळवू शकतो.” मी शेरलॉक कडे बघून डोळा मिचकावला.
“त्यांना सांगा सर आयझक यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांची इथे नितांत गरज आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना इकडे निघून यायला सांगा.” मी त्याला हो म्हणून फोन ठेवला तोच शेरलॉक प्रश्नांकित नजरेने माझ्याकडे बघत होता. माझ्या चेहऱ्यावरील फरक त्याच्या तीक्ष्ण नजरेने अचूक टिपला असेलच याची मला खात्री होती.
मी जेंव्हा त्याला आत्महत्येची वार्ता दिली तेंव्हा तो गूढ हसत म्हणाला,
“मला असल काही होईल याची कल्पना होतीच”.
 मी त्याच्या बोलण्यामुळे भांबावलो. माझी जिज्ञासा चाळवली गेली. मी त्याला म्हणालो,
“तू भविष्यवेत्ता झालास कि काय? मान्य सर आयझक एक प्रसिद्ध आणि समाजशील राजकारणी आहे त्यांच्या जीवनातील बहुतेक गोष्टी सार्वजनिक होतात . पण त्यांची बायको आत्महत्या करेल हे तुला आधीच कसे ठावूक?”
“वाटसन, काही गोष्टींचे भाकीत करण्यासाठी भविष्यवेत्ता होण्याची गरज नाही. तुम्ही थोडे चौकस असाल आणि विचार करू शकत असाल तर तुम्ही शंभर टक्के खरे ठरणारे अंदाज वर्तवू शकता…”
मी त्याचे तत्वज्ञान ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो.मूळ मुद्द्याला धरून त्याला प्रश्न विचारला:
“ते जावू दे, तू सांग कि तुला कसे कळले की सर आयझकची  बायको आत्महत्या करेल म्हणून?”
“अगदी त्यांची बायको आत्महत्या करेल असे काही नव्हते, पण सर आयझकच्या  बाबतीत कुठली तरी घटना घडेल आणि ती खूप विचित्र असेल म्हणजे लोकांना धक्कादायक वगैरे...”
“हो पण तुला असे का वाटले?”
“मागच्या महिन्यातले काही वर्तमान पत्र चाळशील आणि मी जसा विचार करतो तसा तुही करशील तर तुलाहि कळेल!”
मी वर्तमान पत्रातील आयझक यांच्या बाबतीतील बातम्यांची कात्रणे भर-भर काढायला लागलो. त्यातील तीन कात्रणे दखल घेण्याजोगे होती. पहिली बातमी मार्च महिन्यातील अकरा  तारखेची,

संसदेतील सर आयझक यांच्या विज्ञान विरोधी भाषणाने राष्ट्रीय विज्ञान संशोधन केंद्राला मिळणाऱ्या अनुदानावर तात्पुरती स्थगीती: सर आयझक यांचा विज्ञान विरोध आज पुन्हा संसदेत दिसून आला... आपल्या दीड तासांच्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी विज्ञान संशोधनावर होणाऱ्या अवास्तव खर्चाला कात्री लावण्याची मागणी रेटून धरली... देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आणि मुलभूत सेवा व  सुविधेसाठी निधी अपूर्ण पडत असताना देशाच्या होवू घातलेल्या अर्थ संकल्पात विज्ञान केंद्राला संमत झालेला निधी हा अवाढव्य असून निरोपयोगी संशोधनावर खर्च होणारा आहे... फुटकळ विषयावरील संशोधनावर एवढा खर्च करण्यापेक्षा तो निधी आवश्यक सोयी सुविधांसाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन त्यांनी केले... त्यांच्या पक्षाने त्यांच्या मागणीला पाठींबा दिला... त्यांच्या या बिनतोड तर्कापुढे सरकारला नमते घ्यावे लागले... विज्ञान अनुदानावर सरकारने तात्पुरती स्थगिती आणली...’

 दुसरी बातमी मार्च महिन्यातील अठरा तारखेची,

            “सर आयझक यांचा विज्ञान विरोध मावळला: या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर आयझक यांच्या विज्ञान विरोध कळीचा मुद्दा होऊन बसला होता... परंतु सरकार आणि विरोधी पक्षातील झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून... सर आयझक यांनी आपला विरोध मागे घेतला...  विज्ञान केंद्राला मिळणाऱ्या अनुदानाला आपला पाठींबा जाहीर केला...’

तिसरी बातमी दोन दिवसा आधीची म्हणजे बारा एप्रिल ची होती,
राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याच्या अध्यक्षांनी घेतली विरोधी पक्षनेते सर आयझक यांची भेट: सर आयझक आणि रिचर्ड निकोल यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. कॉलेजपासूनचे मित्र असलेले रिचर्ड निकोल आणि आयझक यांची मैत्री विख्यात आहे. येत्या निवडणूकीचा विचार करता या दोघातील मैत्री आणि वरचे वर होनाऱ्या भेटीगाठी महत्वाच्या समजल्या जातात.”

“ शेरलोक्स, या बातम्यांच्या तुकड्यातून मला तर काहीच उलगडा होत नाही. कुठलीच बातमी नोंद घ्यावी एवढी महत्वाची अर्थातच मिसेस आयझक यांच्या आत्म्हत्तेसंबंधी वाटत नाही.”
“ वाटसन, तुला पहिल्या आणि दुसऱ्या बातम्यामधील विरोधाभास दिसत नाही का?”
“हो, पण या दोन बातम्यांचा आणि मिसेस आयझक च्या आत्महत्येचा काय संबंध?”
“तोच तर आपल्याला शोधायचा आहे. सगळ्या घटना एकापाठोपाठ घडल्यात आणि त्याही एकाच व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे त्यात नेमका कुठेतरी एक दुवा असणार...ती कळी आपल्याला सापडली कि आत्महत्येचे खरे कारण कळेल...”
                              ---
काहिवेळातच आम्ही घटनास्थळी पोहचलो. लीस्तार्द आमची वाट बघत होता. त्याने आम्हाला मिसेस आयझकच्या मृतदेहाजवळ नेले आणि तो तिथली परिस्थिती सांगू लागला“शेर्लोकस, आज सकाळी मिसेस आय्झाक आपल्या बेडरूमचे दार उघडत नव्हत्या म्हणून नोकराने सर आय्झाक यांना टेलीफोन करून आपल्या ऑफिसमधून बोलावून घेतले. सर आय्झाक काल रात्रभर ऑफिसलाच मुक्कामी होते आणि ते खरोखरच तिथे होते. मी शहानिशा केली आहे. त्यानंतर सर आय्झाक्नी आपल्या जवळील किल्ली ने मिसेस च्या बेडरूमचे लॉक उघडले बघतो तर काय मिसेस मरून पडलेल्या. आणि त्यांच्या हातात एक पत्र होते.” लीस्तार्दने ते पत्र शेरलोक्स ला दीले. त्या पत्रातील मजकूर तो वाचू लागला. “मी स्वखुशीने माझ्या जीवनाला संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जब्बाबदार नाही.” पत्र वाचुन झाल्यावर शेरलोक्स ने मिसेस आयझक च्या हस्ताक्षराची शहनिशा केली. ते मिसेस आयझक चेच हस्ताक्षर होते याची खात्री पटली. शेरलोक्स ने लीस्तार्डला विचारले घटनास्थळावरील मिसेस च्या मृत शरीराव्यतिरिक आणखी काही पुरावा सापडला का? लीस्तार्द म्हणाला कि मिसेसचे मृत शरीर सोडले तर कुठल्याही वस्तूला हात लावण्यात आला नाही. ती खोली जशीच्या तसीच आहे. मग शेर्लोक्स आपल्या चौकस नजरेने सगळीकडे निरीक्षण करत होता... तेवढ्यात त्याला दरातील फटीमध्ये मातीचे छोटेशे ढेकूळ दिसले. त्याने ते अलगद काळजीपूर्वक उचलले. आपल्या बोटाच्या चिमटीत पकडून त्या मातीचा रंग तो बघत होता. त्याचा वास घेत होता. त्या ढेकळाला जणू तो प्रश्न करत होता कि रहस्य तुझ्यात तर दडलेलं नसेल?
            त्याने सहज मिसेसच्या बेडरूममध्ये नजर मारली. त्याला उजव्या कोपऱ्यात  खिडकीजवळ काहीतरी आढळले. तो तीथे गेला. आपल्या खिशातील त्याचा आवडता स्पायग्लास काढून तो खिडकीखालील जागा न्याहाळू लागला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याने स्पाय ग्लास माझ्याकडे दिला. मला तिथे मातीचे बरीकशे कण दिसले. मला त्याचा अर्थ कळला नाही पण मला खात्री होती कि माझ्या विचित्र आणि वेडपट मित्राला महाभारत का घडले याच्या खणा खुणा सापडल्या..त्याचा अर्थ फक्त तोच लावू शकतो. शेर्लोक्सने लीस्तार्द कडे मृत शरीराच्या पंचनाम्यावळी काढलेल्या फोटोग्राफ्स ची मागणी केली. लीस्तार्द्ने आपल्या खिशातील पाकीट त्याच्या हाती दिले. शेर्लोक्स पाकिटातील फोटो बघत होता. एक फोटो बघताना त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमधील बदल मला जाणवला. त्या बदलाचा अर्थ मी त्याचा जवळचा मित्र असल्याने मला कळला . फोटो बघून झाल्यानंतर लीस्तार्द चा निरोप घेताना तो शांतपणे फक्त एवढेच म्हणाला कि,
“ इन्स्पेक्टर लीस्तार्द, उद्या सायंकाळपर्यंत आपली भेट होणार नाही, आणि जेंव्हा होईल तेंव्हा तुम्हाला एक धाडसी काम कराव लागेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. उद्या भेटू.”
तिथून बाहेर जात असताना तो म्हनला “आजचा दिवस आपल्याला दमवणारा असेल असे वाटते. चल, आपल्याला मिसेस  आयझकच्या  वडिलांकडे जाव लागेल. ”
“ मिसेस आयझक च्या वडिलांकडे!... पण ते का? तिने तर आत्महत्या आयझक यांच्या घरी केली!”
“ हो पण कधी कधी वर्तमान भूतकाळात गेल्यावरच जास्त चांगला कळतो.”
                        ----
मी आणि शेरलोक्स मिसेस आयझकच्या वडिलांकडे बसलो होतो. ते आम्हाला मिसेस आयझक बद्दल सांगत होते कि ती खरतर खूपच मनमिळावू आणि सहनशील स्त्री होती. ती एक उच्च नैतीक मूल्यांना महत्त्व देत असे व त्या मूल्यांशी प्रामाणिक होती. जीवन जगण्याच्या तिच्या आपल्या काही संकल्पना होत्या. आदर्शवाद आणि सच्चे देशप्रेम या गोष्टी तिच्या आत्मा होत्या. त्यासाठी ती वाट्टेल ते करू शकत होती.
जेंव्हा शेरलोक्सने मिस्टर आणि मिसेस आयझकच्या वैवाहिक जीवनाबद्दल त्यांना विचारले तेंव्हा त्यांचा चेहरा थोडा फिका पडला आणि ते म्हणाले “खरतर आमच्यासारख्या घरंदाज कुटुंबातील गोष्टीची वाच्यता मी कुठे करायला नको पण जे घडल त्याचा विचार करता मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटतय कि माझ्या मुलीचे आणि सर आयझकचे काही तात्त्विक वाद होते. दोघांचेही विचार टोकाचे त्यामुळे दोघांमध्ये कधी मतैक्य व्हायचे नाही. सर आयझक एक संधिसाधू माणूस म्हणून नावाजलेले आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या हिताचे काय एवढाच त्यांचा विचार असतो. उलट माझी मुलगी आदर्शवादी तिला आपल्या नवऱ्याचा संधिसाधुपणा अजिबात आवडत नसे. हि एक गोष्टच त्यांच्या नात्यातील दुखती नस होती. पण या सगळ्यांचा माझ्या मुलीच्या आत्महत्येशी काही संबध असेल असे मला वाटत नाही.”
“संबंध आहे किंवा नाही हे कळण्यासाठी तुम्ही दिलेली माहिती मात्र फार उपयोगाची पडेल हे नक्की.” शेरलोक्सने त्यांचे धन्यवाद मानले आणि आम्ही तिथून निघालो.
मिसेस आयझक बाबतीत बहुपयोगी माहिती आमच्या हाती आली होती असे शेरलोक्सला वाटत होते. आम्ही आता सरळ सर आयझकच्या घरी जाणार होतो. शेरलोक्सची काम करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. आधी जिथे घटना घडली तिथे न जाता हा भलतीकडेच आपले डोके लावतो. परंतु सुरुवातीला त्याची काम करण्याची पद्धत कितीही अतार्किक वाटत असली तरी शेवटी तोच बरोबर असतो. त्याचा सरळ साधा तर्क आहे कि चार लोक जो विचार करतात आणि त्या विचारातून मार्ग निघत नसेल तर पाचव्याने केलेला विचार कितीही मुर्खासारखा वाटत असला तरी तो बरोबरच असतो. या वाक्यात नेमका त्याला कुठला विचार सांगायचा आहे तो मूर्ख शेर्लोक्सच जाणे.
                        ----
दुसरया दिवसी मी सकाळपासून शेर्लोक्स्च्या घरी एकटाच होतो. आता संध्याकाळ होत आली होती. तो भल्या पहाटे, मी झोपेतच असताना बाहेर निघून गेला. रात्री सुद्धा तो उशिरापर्यंत जागा होता. त्याच्या त्या विचित्र ओबड-धोबड वाटणाऱ्या माशिनशी चाळा करीत... मी सकाळी उठलो तर माझ्यासाठी टी टेबल वर एक चिट्ठी होती... त्याने नोरोप लिहून ठेवला किसायंकाळी ठीक ६ वाजता सर आयझक च्या घरी पोहोच. मला कळले कि याला सर्व प्रकार समजला आहे. त्या चिट्ठीत पुढे लिहिलेलेला मजकूर तर अनपेक्षित होता. त्याने लिहिले “ तुला हे कळल्यावर हसू येईल कि तू ज्या मशीनला नेहमी शिव्या घालायचास तेच मशीन आपल्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. माझी मागील सहा महिन्याची मेहनत माझ्या कामात आली... कशी ते माहिती करून घ्यायचे असेल तर सांगितल्याप्रमाणे वेळेवर पोच.” मला कुठलीतरी रहस्यकथा वाचल्यासारखे वाटयला लागले. मी अजूनही माझ्या तर्काशी झगडत होतो तर शेर्लोक्स निष्कर्शापर्यंत पोचला होता.
      मशीन... जी मला आतापर्यंत वायफळ वाटत होती ती एकदम शेर्लोक्स च्या सृजनात्मक उपलब्धी वाटायला लागली. मी उत्सुकतेने तिच्या जवळ गेलो. त्या माशिनला न्याहाळू  लागलो. तिच्यात काय दडलाय ते बघत होतो... अचानक माझा पाय एका छोट्याश्या रोपट्याला लागला. माझ्या मित्राचे हे नेहमीचेच ..सगळे घर असेच वस्तूंनी पसरलेले असते. कुठलीही वस्तू आपल्या योग्य जागेवर नसते. आता हे रोपटं इथे काय करतंय म्हणून मी त्याला उचलले व ते दुसरीकडे ठेवण्यासाठी निघालो तेवढ्यात ... माशिनवरील हिरवा दिवा लुकलुकताना मला दिसला. मी रोपटे पोर्चमध्ये आणून ठेवले व त्वरेने माशिनिकडे परत गेलो. तर तोपर्यंत हिरवा दिवा बंद झाला. हा काय प्रकार मला कळत नव्हते. मला थोडी घेरी आल्यासारखे सुद्धा वाटले. रोपट्याला थोडीशी ठोकर लागल्याने घेरी येऊ शकते... कि या मशीनची हि काही करामत आहे.. पण मला आपल्याच विचारावर हसू आले. मी परत माशिनमध्ये गुंतून गेलो. ती एक साधीशीच मशीन होती. तिच्या आत एक चुंबक होते. त्यावर वर्तुळाकार चकती बसवली होती. तिला वीज पूरवठा करण्यासाठी एक बटन सुद्धा होते. ते बटन  सुरूच असल्याने मघाशी हिरवा दिवा लागला असेल असे मला वाटले. शेवटी मला त्यातील काही कळत नव्हते म्हणून कंटाळून त्या मशिनचा नाद मी सोडून दिला.. उत्सुकतेने ६ वाजण्याची वाट बघण्याशिवाय मी काही करूही शकत नव्तो.
                              ----
उर्वरित पुढील भागात....

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

'उपर जाते जा, नीचे आते जा!"



आजोबांच्या गोष्टी......

तशा काही फार दीर्घ आणि तत्त्वज्ञान नाहीय त्यांच्या गोष्टीत... अगदी साध्या-सुध्या आणि मनोरंजक आहेत... त्यांचा हा खजिना मी विसरत चाललो होतो पण आता इथे काही आठवणार्या आणि काही न आठवणार्या गोष्टी सुद्धा पोस्टणार आहे... त्या गोष्टींचे अनेक वर्जन असू शकतात... तुम्हालाही आठवत असतील तर तुम्ही त्या पोस्ट ला मला tag करा....आज पहिली गोष्ट सांगतोय....(आबा वऱ्हाडीत गोष्ट सांगायचे...म्हणून थोडी वऱ्हाडी बोली वापरतोय...)

'उपर जाते जा, नीचे आते जा!"

पोट्ट्या... तुले एक गोष्ट सांगतो  आईक...

एका गावात एक कास्तकार होता . पयले बरा शिरमंत होता पण तिगस्ता त्याच्या भावांन त्याची जिमीन हडपली अन त्याले मजुरीले लावल... दोन-दोन बायका त्याले आन पाच-सहा लेकरयीच लेंढार... मजुरी करून असा कितीक कमवे ...? बायका -पोराहीचे पोट बी भरत नोता..... पोरायचे शिक्शान तर दूरच रायल...

त्याले वाटे जगूच नही....जीव द्याव... मग येका राती गेला न तो आखारातल्या हिरीवर(विहिरीवर) जीव द्याले... हिरीच्या काठावर रायला उभा.... म्हणे आता उडी मारतो हिरीत अन देतो जीव.... तेवढ्यात हिरीतून आवज आला....

त्या  हिरीत येका भूताच बिर्हाड होत... तो भूत त्या हिरीतल्या पाण्याच्या अंदर  येक मोठ पेव करून आपल्या बायको अन पोरासंग रायत जाय...

त्या भूताले पाण्यातून दिसल न कि कोणीतरी जीव द्याले आल आणि आता उडी टाकते... तेवढ्यात भूतान आवाज लगावला....

"थांब रे बावा... काय झाल तुले ... काऊन मरत राजा... तुई अडचण त सांग मले!१"

कास्तकार घबरावला.... त्यान भेत-भेतच सांगितल भूताले कि , 'मायाकडे आता जमीन नाही, मले बरोबर मजुरी भेटत नाही...लेकरा -पोरायले खाऊ घालाचे वांदे होऊन रायले बावा! म्हणून त जीव द्याले आलो...."

भूत त्याची कायनी आयकून लयच दया करत होता...भूतान त्याले म्हणलं , "हे पाय दादा... तू काई जीव देऊ नको... मी तुयासाठी एक काम करू शकतो...पण त्या आंदी मले एक वचन दे...!"

कास्तकार म्हणे "सांगा ब्वा ! काय म्हणन आहे तुम्ह"
भूतान म्हटल मंग त्याले, " पहिली त गोष्ट तू कोणाले सांगू नको कि मी तुयासाठी  काम करतो... आन दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणशील ते काम मी करायले तयार आहो पण मले रोज काम सांगत जाय एकाही दिवसाचा खाडा चालणार नाही... ज्या दिवशी तुया मले काम सांगितल नाही त्या दिवशी मी तुया अन तुया लेकरा-बायकोचा जीव घेऊन घेईल.... कबुल अशीन त बोल"

कास्तकार लयच हरकला त्यान भूताच्या अटी कबुल केल्या....मंग काय  विचारता काय झाल.....

रोज भूत रामपायरी कास्ताकाराच्या दारात उभा काम करायले तयार....
कास्तकारण त्याले कोणतहि काम सांगितल  कि भूत  नीरा मिनटातच काम करून चाल्ला जाय....

पाटलाच्या धा एकर वावरातली पर्हाटी येच्याले सांगितली त भूत सकौन गेला अन दुपारी पुरी पर्हाटी येचून आला... पाटलाने कास्तकारले मजुरी देली... मंग त्यावर्षी कास्त्काराने भुताच्या जीवावर वावरातले काम उधळयान घ्याले सुरुवात केली...

रोज काही न काही काम भूताले तो सांगत जाय... आणि भूत काम करून निघून जाय... मजुरीचा सगळा पैसा कास्त्कारले भेटे... तो लय शिरमंत झाला... एका वर्षातच त्यान १० एकर जिमीन विकत घेतली... आता त्याले सुखाचे दिवस भोगायले भेटून रायले होते...

त्याचे पोर शाळेत जात...अभ्यास करत...बायकोच्या अंगावर सोन आल...नवीन घर बांधल....सगळ यवस्थित सुरु होत... पण त्याच्या जिवाले येग्ळाच घोर लागला...

भूताले रोज काम द्या लागे...ज्या दिवशी नाही देल त्या दिवशी भूत त्याले अन त्याच्या घारले मारून टाकणार होता... आता एखांद्यान रोज-रोज कामही कुठून आणावं?????

मोठ्या विवंचनेत होता कास्तकार.....पण  भूत  तर रोज पायटी  त्याच्या उरावर हजर असे.....काम सांग  म्हणे?

मंग कास्त्कारण एका जाणकार म्हतार्याले पकडल... अन त्याले सगळी हकीकत सांगितली.....जाणकार म्हातारा म्हणे मी सांगतो तस कर.....
पहिले तर  बैलगाडीन बाजारातून खंडीभर मवरी (मोहरी) ईकत घे अन येता-येता गावाच्या आंदी जे नदी लागते तिच्यात रेती आहे त्या रेतीत ते मवरी सांडून दे...पसरून टाक...अन  त्याले म्हणा आन येचून?????

कास्तकारन तसचं केलं.... पायटी भूत आला अन त्याले मवरी येच्याले पाठवल.... पण सायचा संध्याकैच भूत हाजीर ...म्हणे, "मालक काम झाल...उद्या येतो सकाऊन...काम तयार ठिवा!!"

कास्तकार डबल जाणकार म्ह्तार्याले भेटायले जाते....म्हतारा त्याले नवीन कलाकारी सांगते कि तुया वावरातल्या हिरीत टन भर मीठ टाक.... रातभरात ते ईरुन जाईन... मंग त्याले ते मीठ काढायले सांग....

पण दोन दिवसातच भूत मीठ पाण्यातून काढून आणते...अन कास्त्कारच्या उरावर  हजर ... म्हणे काम सांग....

भूताले लय येगयेगळ्या परकारचे काम सांगातल्या जातात... पण सगळे काम तो भर-भर करते..... त्याले त आकाशातले तारे मोजायले लावते पण तीन राती जागरण करून एवढे मोठे तारे भूत मोजून काढते.... अजून काय काय करायले लावते पण भूत त जुमानतच नाही न... मंग

कास्त्काराची  उडते घाबरगुंडी... आता काय कराव... गावातल्या शाळेतल्या मास्तरले भेटायाले जाते... त्यालेबी सारी हकीकत सांगते.....

मास्तर थोडस डोक लाऊन कास्त्काराच्या कानात सांगते.....

दुसऱ्या दिवशी भूत पायटी आल्या बरोबर कास्तकार त्याले काम सांगते... कि  हिमालयात जाऊन ततच सगळ्यात मोठ अन उंच झाड तोडून आन पण झाड सरकतीर पायजे... सरळसोट...

संध्याकाई भूत झाड घेऊन हजर.... हे अभायाले टेकिन येवढ उंच झाड आणते तो!

मंग त्याचा छाट काढ्याले सांगते....

मंग त्याच्यावरून रंदा मारून चोपड करायले सांगते....

मंग  म्हणते कि भूता आता या झाडाच्या खोडाले एवढ तेल लाव कि हे चोपड झाल पाहिजे...

भूत त्याले हजार पीप तेल लाऊन चोपड करते....

मंग त्याले त्या खोडाले गावाच्या येशिवर घेऊन जाय आणि तती रोऊन टाक... सरळ सोट.... उंच च्या उंच...

भूत हे काम बातच करते......

आता भूताले कास्तकार शेवटच म्हणते.... कि तुले मी आजपासून एकच काम देतो तेच करत जाय.....कोणत?

या खोडावर रोज वर चढत जाय अन खाली उतरत जाय....चढत जाय अन उतरत जाय...."उपर जाते जा...नीचे आते जा"

भूताले आता रोज एकच काम...

भूत लय दिवस हे करते.... शेवटी भूतही थकून जाते... खंगून जाते..... भुताची बायको कास्त्कारले विनंती करते कि माया नवर्याले सोडून द्या...
कास्त्कारले मंग दया येते अन तो भूताले सोडून देते...
सोडून देल्यावर भूताले विचारते...."कारे बाबू...पायजे का काम! पायजे अशीन तर ये....उपर जाते जा...नीचे आते जा!"

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...