शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

जेलीफिश


जेलीफिश


मी माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी पाहिले आहे ते दृश्य,
की सिबिल एका अरुंद गुफेत जावून अडकली आहे,
 आणि जेव्हा लहान मुलांनी तिला विचारले
की, "तुला काय हवे आहे?"
 तेव्हा ती असे म्हणाली
 "मला मृत्यू हवाय."
“मृत्यू”.
                                                            -पेट्रोनियस, सायरिकॉन

      “मी अमृता.... वय वाढत चाललय त्यामुळे कित्येक गोष्टी आठवतील कि नाही ठावूक नाही.... ३०० वर्षाच्या स्त्रीला अस कितीस आठवेल...पण तरीही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.. विज्ञान युगात राहतानाही दैव आणि नशीब या गोष्टी कधीकधी माणसाला इतक अतर्क्य भोगायला लावतात  कि... असो..
       मला दिवस,वर्ष,महिने असल वेळेच विभाजन आठवत नाही किंवा तीनशे वर्ष जगल्याचा परिणाम असेल कदाचित कि सर्व रटाळ आणि तेच ते असल्याने त्यातील फरक जाणवत नाही. त्यामुळे सगळ कस संगतवार तुम्हाला सांगता येणार नाही... तुम्हीच माझ्या कहाणीतील तुटलेल्या कळ्या जोडायच्या आणि अर्थ लावत जायचा...
      खरतर माझ खर नाव अमृता नाहीच... या नावाआधी मला लोक कांचन म्हणून ओळखायचे...त्याच्याही आधी दिती कि अदिती अस काहीस नाव दिल होत त्यांनी मला.. तिकडे काही लोक सिबल म्हणून तर काही लेडी टायरेशिअस म्हणून ओळखायचे... माझी अनेक नाव ठेवल्या गेल्या होती.. माझी नाव सतत बदलली पण मला ओळख बदलता आली नाही... कशी बदलता येईल...माझ्या हातात नव्हतेच ते... आणि जेंव्हा होते तेंव्हा..????
      जवळपास ३०० वर्षा आधी..अंधुकसे आठवते... कि मी तरुण होते...तशी अजूनही आहे... माझे जन्मदाते राहायचे भारतातील एका राज्यात...आता ते राज्य नाही... जगाचा नकाशा पार बदलला... माझ्या नजरेसमोर अनेक गोष्टीची माती होताना बघितली...इमारती कोसळल्या, साम्राज्य नष्ट झालीत, माणसे मेली आणि अनेक प्रकारच्या वनस्पस्ती लयाला गेल्यात.... हि अशी नशिबात मरण लाभलेली प्रत्येक गोष्ट मला खटकते आता... माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहेत इथल्या निर्जीव वस्तू... दगड सुद्धा ... त्यांनाही रेती होता येते... त्यानाही मरता येते....बघा! झालच शेवटी विषयांतर....मला सांगायचं काय असत आणि मी सांगते काय. कृपा करून मला दोष देवू नका. एखाद्या  पोतडीमध्ये  अनेक गोष्टी कोंबल्या आहेत आणि तुम्हाला त्यातून हवी ती वस्तू काढायची आहे तर ती सापडेपर्यंत आधी इतर अनेक वस्तूच बाहेर येतात... तीनशे वर्षाचे अनुभव कोंबलेले आहेत माझ्या या शरीराच्या पोतडीने.... तर मी सांगत होते...
      मी आतासारखीच तेंव्हाही तरुण होते...माझे बाबा खूप जीव लावायचे मला.. ते खूप मोठे वैज्ञानिक होते...मरीन बायोलोजी त्यांच्या संशोधनाचा विषय...माझी आई मला जन्म देतानाच देवाघरी गेली. ते खचले होते खूप तेंव्हा. आईचा विरह ते फक्त माझ्यामुळे  सहन करू शकले अशे ते सांगायचे... खरय...माझ्यापेक्षा विरहाचे दुख, आपल्या माणसाला गमावण्याचे दुख कोण जाणू शकत... तीनशे वर्षात मी अगणित लोकांना गमावलं आहे... माझ्या तेरा नवर्यांना गमावलं आहे आणि माझी आठ लेकरे मी स्वत: दफन केली किंवा जाळून टाकली आहेत...प्रत्येकवेळी गेलेल्या माणसाचे दुख विसरायला व्हायचं तर नवीन कोणीतरी जवळचा परत या जगातून निघून जायचा... अशावेळी माझ दुख दुप्पट व्हायचं... मेलेल्या माणसाबद्दल मला दया वाटायची आणि त्याचवेळी त्याच्या नशिबावर जळायची सुद्धा.... त्यांना मरताना बघून मी अगतिक व्हायचे... नेमक सांगता येणार नाही मला... तुम्हाला समजेल अस वाटते आणि पुढील गोष्ट सांगते.....

आई गेली आणि मग मीच बाबांच्या काळजीच कारण ठरली.. त्यांना सतत मला काही होईल का याची भीती वाटायची. माझी खूप खूप खूपच जास्त काळजी घ्यायचे. इतकी कि त्यांनी माझ्यासाठी विशिष्ट्य खोली बनवली घरात. तिथली स्वच्छता ते स्वत: बघायचे. मला साधी शिंक जरी आली तरी त्याना झोप येत नसे. माझ्या आईसारखे ते मलाही गमवून बसतील अशी भीती सतत त्यांना वाटायची. माझ लहानपण खूप जपलं त्यांनी. त्यांच्या अतिकाळजीच ओझ वाटायचं तेंव्हा... पण त्यांच्यासाठी मी ते सहन केल.. त्यांच प्रेम मला कळत होत. मीही त्यांच्या वागण्यावर जास्त आक्षेप कधी घेतलाच नाही. मला कळलच नाही कि त्यांच प्रेम तेंव्हा प्रेमाच्या पलीकडे गेल होत. त्यात वेडसरपणा यायला लागला होता... त्याना माझ्या काळजीचा मेनिया झाला होता. माझ्या मरणाची भीती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इतकेच काय तर त्यांच्या संशोधनासाठी त्यांना जगभर फिरावं लागायचं तेंव्हाही ते मला त्यांच्या सोबतच नेत असत. त्यांनी मला भूमध्य समुद्र दाखवला.. प्रशांत महासागर दाखवला इतकच काय पार तिकडे जपानचा समुद्रसुद्धा फिरून आलो आम्ही. मलासुद्धा समुद्र, लाटा, किनाऱ्यावरची वाळू,शंख-शिंपले गोळा करायला आवडायचे. मी असल्या गोष्टी गोळा करायची तर बाबा वेगवेगळ्या जातीची मासे,समुद्री कीटक आणि जेलीफिश गोळा करायचे मग ते आपल्या प्रयोगशाळेत त्यांच्यावर अभ्यास करायचे. त्यांना फक्त मी आणि त्यांच्या अभ्यास याशिवाय काहीही सुचत नसायचे...
 मी मोठी झाले.... वयात आले.. आणि मला ऋतुस्त्राव सुरु झाला. जेंव्हा हि गोष्ट माझ्या वडीलांना कळली तेंव्हा तर त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. त्यानंतर ते जास्त वेळ आपल्या प्रयोगशाळेत घालवायला लागले. पण इतक काम करूनही थकवा त्यांना अजिबात जाणवत नव्हता. घरी यायचे तेंव्हा कालच्यापेक्षा प्रत्येकवेळी प्रफुल्लीत दिसायचे... मला वयात येवून तीन-चार महिने झाले असतील.. आणि मी पोट दुखतेय म्हणून बिछान्यावरच जावून पडली होती... तेंव्हा बाबा जवळ आले आणि त्यांनी मला मंदसे स्मित देवून डोक्यावर हात ठेवत शांत झोपायला सांगितले... त्यांच्या त्या काळजीच्या स्पर्शाने मला बर वाटले आणि मी झोपले.... मग सतत तीन दिवस मी झोपूनच राहिले... चौथ्या दिवशी झोपेतून  उठले तर.....
मी एकटीच होते माझ्या खोलीत ... पिवळसर रंगाचा प्रकाश होता... आणि बिछान्यावर मातीचे बारीकशे कण पडलेले होते.. इतके बारीक कि ते मुंग्यांनी आपल्या वारुळासाठी न्यावेत... मला काही कळेचना.. खोली तर माझीच होती.. वस्तू माझ्याच होत्या... मी मीच होते... मी स्वतःला आरशापुढे नेले व निरखून बघायला लागले. हि मीच होते पण... माझी कांती, माझा रंग, माझ्या चेहऱ्यावरील तजेला इतका जास्त होता कि मी हळदीसारखी पिवळीधम्म दिसत होते... मला खोलीतील पिवळ्या रंगाच्या प्रकाशामुळे अशी दिसतेय अस वाटल म्हणून लगेच पिवळसर दिवा बंद केला आणि पटकन आरशापुढे परत आले... मघाशी जितकी पिवळी चमकत होती तितकी जरी आता वाटत नसली तरी टवटवीतपणा जराही कमी झाला नव्हता. मला आतून फुलल्या सारख वाटत होत. माझ्यात एक नवीनच चैतन्य बहरल्यासारख वाटत होत. कदाचित झोप जास्त  चांगली झाल्यामुळे अस वाटत असेल, म्हणून मी तो विचार तिथेच सोडून दिला... दार उघडून बाबांना शोधायला गेली...
बाबा पोर्चमध्ये कॉफी घेत वर्तमानपत्र चाळत होते. मी त्यांच्या जवळ गेले. ते माझ्याकडे एकटक बघायला लागले. त्यांचे डोळे मला बघताना पाण्याने तरळले... ते खूप समाधानी वाटत होते. त्यांनी मला बसायला सांगितले. आणि माझा हात आपल्या हातात घेतला. माझ्या बोटावरील नखांना बघायला लागले. त्यांनी माझ्या डोक्यावरील केस बघितले..आणि समाधानाचा सुस्कारा सोडला......
माझ्या नखात, केसांत असे काय बघतायेत म्हणून मीसुद्धा माझी नख, केस बगितली तर.... माझी नखे जरा जास्तच लांब झाली होती... म्हणजे एक-दोन दिवसात जेव्हढी वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच ती वाढली... आणि केसांचीही कहाणी जास्त वेगळी नव्हती... ती सुद्धा एक-दोन दिवसात वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच लांब वाढल्यासारखे मला वाटायला लागले. बाबांना मी म्हटले कि आज उठली तेंव्हापासून मला सगळ कस विचित्र वाटतय.. माझ्या बिछान्यावरील तो बारीक मातीचा भुगा कि बारीक रेती, माझ्या कांतीतील फरक, मला आतून वाटणार चैतन्य आणि आता हे नखे आणि केस.... त्यावर ते फक्त हसले... आणि सांगेल तुला नंतर म्हणून आपल्या कामाला लागले....
तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे.... मी तशीच दिसते....मला शारीरिक थकवा आजही जाणवत नाही... माझी बुद्धी बर्यापैकी तल्लख आहे. पण आठवणी इतक्या जास्त गोळा झाल्यात डोक्यात कि गोंधळ होतो कधी-कधी... मला स्पष्ट दिसते,ऐकायला येते, सर्व दात अक्कल दाढेसह शाबूत आहेत...पण त्तरी मला जगावस वाटत नाही...कंटाळा, कंटाळा आणि फक्त कंटाळा आलाय जगण्याचा.... म्हणजे कंटाळ्याचासुद्धा कंटाळा आलाय आता...
तेंव्हाची गोष्ट अशीच एक-दिवस मी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असताना मला खरचटलं... माझ्या मनगटाच्या खाली... कुणी चाकूने रेष ओढावी अशी रक्ताची लकेर उमटली होती..लालचुटूक.... मला वाटल कि आता खूप रक्त निघेल पण नाही.... तर ती लकेर अशी मोठी होता-होता थांबली...आणि मग आकुंचन पावल्यासारखी कमी होत गेली व नाहीशीसुद्धा झाली... मी भांबावलेच.. बाबांना जाऊन सांगितले तर ते ऐकून खुश झाले... मला अजब वाटल... त्यानंतर तर माझ्या शरीरासोबत असे विचित्र प्रकार होतच गेले...मलाही त्याची सवय होत गेली... मला काही लागल तरी ते लवकर बर व्हायचं... आजारी तर पडतच नव्हते... माझ्या हात-पायांना थकवा असा ठावूक नव्हताच.. खरतर मला झोपही नको असायची..पण  रात्री दुसर करण्यासारख नसल्याने मी पडून राहायचे... तेंव्हा कळत गेल कि आपण वेगळे आहोत.. प्रश्नसुद्धा पडायचा आपण का वेगळे आहोत त्याचा... बाबांना खुपदा विचारल तर त्यांनी स्पष्ट सांगितल कि हे  कुणाजवळ बोलायचं नाही.. वेळ आली कि सगळ कळेल.
बाबा आता पूर्वीसारखे माझी काळजी करेनात.. मी मोठी होत गेली आणि आता लग्नाला तयार होते.. बाबांचाच एक विद्यार्थी जो मलाही आवडायचा त्याच्याशी लग्न ठरले.. काही दिवसांनी लग्न झाले... मुल झाली...संसार सुरु झाला..सगळ सुरळीत होत..आता  बाबा म्हातारे होत होते...तोपर्यंत माझ्या नवऱ्याला कळून चुकले होते कि माझ्यातील जे वेगळेपण आहे ते विशेष आहे. तो सतत त्याच्याबद्दल मला विचारयाचा.... आणि हे सांगायचा कि तू कुणालाच कळू देवू नकोस... बाबांचा विद्यार्थी असल्याने तो बाबासारखाच बोलायचा.. खरतर तो बाबांची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचा... त्याला खूप मोठे वैज्ञानिक व्हायचे होते... बाबांच्या हाताखालीच तो डॉक्टर झाला होता. .. त्याचा एकंदरीत स्वभाव आणि हुशारी बघून बाबांनी माझ लग्न त्याच्याशी लावून दिले... माझ्याशी तो चांगला वागायचा... म्हणून मलाही आवडायचा...
मात्र नंतर नंतर त्याच्यात आणि बाबांत खटके उडायला लागले.. त्यांच्यात वाद सुरु होता पण वादाचा मुद्दा मला कळू देत नव्हते.. मी जवळ येतांना दिसले कि ते वाद थांबवायचे आणि विषयांतर करायचे. पण मला थोड-थोड जाणवायला लागल होत कि माझा नवरा बाबांकडे काहीतरी मागतोय आणि बाबा त्याला नकार देत आहेत. माझ्या नवऱ्याचा हट्ट दिवसेंदिवस वाढतच जात होता आणि बाबा त्याला निक्षून नकार देत होते. पण अस काय मागतोय माझा नवरा. मी खरे काय ते शोधायचा निश्चय केला. मी माझ्या बाबाला आणि नवऱ्याला पुरती ओळखून होती. लग्नानंतर मला नवरा कळत गेला. अधाशी, हावरट आणि लोभी होता तो. पण त्याच्या या दुर्गुणाचा मला तसा त्रास म्हणून कधी झालाच नाही. राहून राहून शंका मात्र यायची कि हा इतका लोभी आहे हे आपल्याला लग्नानंतर कळल ..पण लग्न करतांना याने नेमका कोणता फायदा बघितला. कारण लोभी माणसे प्रयेत्क गोष्ट त्यांची फायद्याची आहे का हे आधी बघतात आणि  नंतरच तशी कृती करतात. माझ्या नवर्याला नेमका कोणता फायदा होणार होता माझ्याशी लग्न करून...
बघा, तुम्हाला सांगितल होत न कि माझ्या बोलण्यात सुसूत्रता कि काय म्हणतात ते तुम्हाला दिसणार नाही. खंडीभर गोष्टी फिरत असतात एक बोलायला गेली तर. नुसते भुंगे हो नुसते आठवणींचे भुंगे. तर तुम्हाला सांगत होती कि माझ्या लोभी नवर्याने माझ्याशी लग्न का केले. तसे बोलून चालून सगळे माणस स्वार्थीच असतात पण  त्याला काही मर्यादा असते. स्वार्थासाठी दुसऱ्याला मारून टाकणे योग्य असते का? माझ्या नवर्याने तेच केले त्याने माझ्या बाबांना मारून टाकले.. खून  केला त्यांचा. म्हणजे त्याला खून म्हणावा कि नाही हाही प्रश्न आहे. दोघांमध्ये खूप भांडण झाले त्यादिवशी. आणि त्या भांडणात माझ्या नवऱ्याने बाबांना काहीतरी फेकून मारले. माझे म्हातारे बाबा जाग्यावरच कोसळले. स्वयंपाक करता-करता मी धावत आले तर सगळ मला दिसल. मलासुद्धा खूप राग आला नवऱ्याचा आणि कांदा चिरत होते तोच चाकू खुपसून टाकला नवऱ्याच्या पोटात.... मग  काय... पोलीस आले.. मला पकडल.. माझ्यावर खटला चालला.. आणि देहदंडाची शिक्षा झाली. विषारी इंजेक्शन देवून मृत्यूदंड देण्याची पद्धत होती तेंव्हा. मला खुर्चीवर बसवले आणि माझ्या मानेच्या खाली, मणक्यात इंजेक्शनवाटे विष टोचले. त्या विषाने मला मरणाच्या यातना होत होत्या. नेमक मला शब्दात सांगता येणार नाही.. ते विष जस-जसे चढत होते तस तसे माझ्या शरीरातील कण अन कण ठिसूळ होवून फुटल्यासारखा जाणवत होता. मी बेशुद्ध झाली असेल... काही वेळाने मी जागी झाली तेंव्हा तिथेच होती. सगळे पोलीस,तिथे हजर असलेले डॉक्टर तोंडात बोट घालून माझ्याकडे बघत होते. मलासुद्धा कळत नव्हते कि हे अस काय झाल.
आज मला सगळ समजल, मी विशेष का आहे. बघा, ते विष सुद्धा मला मारू शकले नाही... आणि मृत्यूदंड मिळाल्यावर आणि मी ती शिक्षा भोगल्यावरहि जर मेली नाही तर कायद्याने परत मला शिक्षा होत नाही. अशाप्रकारे कायद्याने मला सोडले. मी माझी शिक्षा भोगली. या बाबतीत मी नशीबवान ठरली... खरतर माझ नशीब लिहिणारा कुठला देव नव्हता, आणि ज्याने मला असे बनवले त्यालाच जर देव म्हणायचे असेल तर मग माझे बाबाच माझे देव.
माझा पहिला नवरा इतका हावरट होता कि त्याने त्याच्या स्वार्थासाठी माझ्या वडिलांचा जीव घेतला. त्याला माझ्या वडिलांकडून काय हव होत माहिती आहे. ..? मला माझ्या वडिलांनी दिलेली भेट... ती काय होती माहितीय...?
सांगते... पण मला जिवंत राहण्याचा कंटाळा आलाय हो. ३०० वर्ष झालीत... आणि आणखी किती वर्ष मी जिवंत राहणार ठावूक नाही. खुपदा मरण्याचा प्रयत्न केलाय पण जमलं नाही. तुम्ही विचार करू शकाल का कि ३००  वर्ष आयुष्य लाभलेल्या व्यक्तीला किंवा मरणाची भीती नसणाऱ्याला काय वाटत असेल...  आयुष्य शाप आहे माझ्यासाठी... अश्वत्थामा डोक्यावर भळभळती जखम घेवून जगतोय आणि मी डोक्यात दुखाचे झरे.. आम्ही दोघेही शापित... अमरत्व शाप आहे...मृत्यू या दुखातून मोक्ष देतो....खरय ते... नशीबवान आहेत जे मरू शकतात... पण मी मात्र तशी नाही... मी आहे एक जेलीफिश....
            जेंव्हा मी माझ्या पहिल्या नवऱ्याला ठार केले आणि धावत बाबंकडे गेले तेंव्हा बाबांनी मला एक शेवटी का होईना ते रहस्य सांगितल होत.. तेच आज तुम्हाला सांगतीय..


 माझे बाबा मरीन बायोलोजीतील तज्ञ.. तेंव्हा आम्ही जपान वरून नुकतेच आलो होतो..बाबांनी खूप वेगवेगळ्या जातीची मासे आणि जेलीफिश आपल्या प्रयोगशाळेसाठी आणल्या होत्या.. त्यातील एक जेलीफिशची जात खूप विशिष्ट होती. ती म्हणजे ‘टरीट्रोपसीस डोह्र्नीय.. सोप्या शब्दात ‘अमर जेलीफिश म्हणा हव तर... तिचा अभ्यास करतांना बाबाना लक्षात आले की हिच्या पेशीमध्ये अशी रचना आहे कि जिच्यामुळे हि जेलीफिश सतत नवीन पेशिना निर्माण करत असते. त्यांना प्रयोगांती लक्षात आले कि हिला वातावरणातील बदल,उपासमार झाली तर हि स्वत:मध्ये बदल करते . इतकेच नाही हिला काही लागले किंवा कापल्या गेली तर हि भरभर नवीन पेशींची निर्मिती करून पूर्ववत होते. याला माझे बाबा ‘ट्रान्स-डीफरेनशीएशन’ म्हणायचे. तेंव्हाच्या अनेक वैद्न्यानिकानी या ज्ञानाचा  उपयोग करून मानवी ‘स्टेम पेशी’ बनवण्याचा प्रयत्न केला होता. माझे बाबासुद्धा तेच करत होते. .. पण ते करत असतांना त्यांनी माझा विचार करून एक पाउल आणखी पुढे टाकले. त्यांनी त्या जेलीफिश मधून मुळातला डी.एन.ए. वेगळा काढला जो नवीन पेशींना निर्माण करत होता... आणि त्या रात्री जेंव्हा माझा ऋतूस्त्राव संपला त्यांनी इंजेक्शनवाटे मला दिला... अजूनही तो माझ्या पेशीत मिसळला आहे... त्याने मला कितीदा तरी मरणातून वाचवले आहे... ते  विषारी इंजेक्शनसुद्धा काही करू शकले नाही.. साध्या खरचटण्याचा व्रण नाही कुठेही.. अजूनही तशीच आहे... सतेज..कांतिमान... तरून...हो...तरुण... पण...पण....
            मी मनाने थकली आहे...जगण्याने थकली आहे... शरीर भोगायला तयार असले तरी इच्छा होत नाही... असे आणखी किती वर्ष जगणार...अरे कि मरणारच नाहीय मी..! अस कस होईल... काय करू मी अनंत दुखे कवटाळून..आणखी किती सहन करू... म्हणून, मी मृत्यू मागतेय... मृत्यू... मृत्यू जो सगळ्यांचा अधिकार आहे... मृत्यू जो दुखाचा अंत आहे... मृत्यू जो खरोखरच मोक्ष आहे... मला मृत्यू हवाय...मृत्यू!

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

शब्दांच्या गोष्टी (४ व ५ )

४) Echo...choo!!!...cho!!..cho!

Panic शब्दाने मौन सोडले आणि आपला अर्थ सांगितला. परंतु मागोमाग Echo शब्दाचे प्रतिध्वनी पिच्छा काही सोडत नव्हते. Echo शब्दाची सुद्धा एक मस्त कहाणी आहे. ती कहाणीच सांगेलकि  Echo शब्दाला कसा अर्थ मिळाला.
ज्युपिटर(झेवूस म्हणून सुद्धा याला ओळखतात) म्हणजे आपल्याकडील इंद्र.. दोघेही सारखेच लंपट मला वाटतात.
 तर या ज्युपिटर ची बायको म्हणजे ज्युनो किंवा हेरा हिला आपल्या नवर्याच्या बाहेरख्यालीपणा अजिबात आवडत नव्हता... कोणत्या बायकोला आवडेल म्हणा... पण तो मात्र जुमानतच नव्हता...
ती सतत त्याच्यावर लक्ष ठेवून असायची....पण शेवटी देव जरी असला तरी पुरुषच तो. त्यात त्याला दिव्य-बिव्य शक्ती मिळालेल्या... शक्तींचा पूर्ण इस्ते'माल' कारायचा तो इतर बायकांवर भुरळ पाडण्यासाठी... किंवा एखादीने  त्याला नकार दिलाच तर तिच्यावर 'अतिप्रसंग' करायलासुद्धा मागे-पुढे बघत नव्हता...
 तो आपल्या बायकोची नजर चुकवून प्रेयसिला (अनेक होत्या, त्याबद्दल नंतर कधीतरी) भेटायला जायचाच. त्याच्या अनेक प्रेयसीपैकी एक होती Echo नावाची जलपरी....

ज्युपिटर तिला एकदा बायकोच्या नकळत भेटायला गेला. त्यांचे प्रेम रंगात आले तेंव्हाच त्यांना कळले कि ज्युपिटरची बायको ज्युनोला माहिती पोचलीय कि त्या दोघांची रासलीला सुरु आहे ते... मग  ती आपल्या नवऱ्याला रंगे-हात पकडायला येत आहे. .. ती येणार हे त्याला दिव्य शक्तीमुळे कळते आणि तो तो कावरा-बावरा होतो... देव असला तरी बायकोला घाबरतो बर हापण... तिच्या हाती पकडल्या जाऊ नये म्हणून कदाचित!? मागच्या दाराने जायला निघाला..... जाण्याआधी Echo ला सांगून ठेवतो कि मी बाहेर पडेपर्यंत तू ज्युनोला पुढल्या दारावर गोष्टीत गुंतवून ठेव... 
इकडे Echo ने ज्युनोला गोष्टी करण्यात गुंतवून ठेवले जेणेकरून ज्युपिटरला तिथून निसटण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.ज्युनोच्या सगळ लक्षात येत होते शेवटी ज्युपिटरसारख्याची बायको ती... तिने Echo ला वाट सोडायला सांगितली... दम दिला... पण Echo ने काही तिला तिथून जावू दिले नाही.. 
या सगळ्याप्रकारामुळे ज्युनो जाम भडकली आणि तिने Echo ला शाप दिला कि, तू मला शब्दांमध्ये गुंतवून ठेवलेस, जा यापुढे तू बोलूच शकणार नाहीस आणि तुझ्या समोर जी व्यक्ती बोलत असेल त्याचे फक्त शेवटचे शब्दच तू उच्चारू शकशील.... तेंव्हापासून echo हि समोरच्याचे शेवटचे शब्दच उच्चारू शकते. म्हणून प्रतीध्वनी साठी तिचेच नाव आपण वापरतो... Echo...Echo...Echo....
विशेष बाब म्हणजे हि echo नंतर नार्सिससच्या प्रेमात पडली पण ती कधी त्याला प्रेम व्यक्त करू शकली नाही. नार्सिसीसने स्वप्रेमात प्राण सोडल्यनंतर echo चे सुद्धा दगडामध्ये रुपांतर झाले... म्हणून दगडाला आदळून जो प्रतीध्वनी उमटतो तो म्हणजे आपल्या बोलण्याला Echo ने दिलेला echo आहे....गंमतच आहे...!!!!


५) alma mater

संकृतवर प्रेम असणार्यांना इंग्रजीतील हा शब्द आवडेल. कारण यातील mater म्हणजे आजचा इंग्रजीतील mother. mater हा मातृ/माता या संस्कृत शब्दातून इंडो-युरोपिअन भाषेत गेला....
alma mater या संयुक्त शब्दाचा अर्थ जेंव्हा मला पहिल्यादा माहिती झाला तेंव्हा मला आठवली 'धाराऊ'.. 
हो तीच माय माउली धाराऊ जिने सईबाईच्या आजारपणात राजे संभाजीना आपला पान्हा दिला. 
नंतर आठवली 'यशोदा' जिन्हे कृष्णाचे संगोपन केले आणि .....आठवली हि वसुंधरा जी आपले संगोपन करते.

एकंदरीत alma mater चा अर्थ आता थोडा आपल्यासाठी खुलला असेल. दुधमाय, संगोपन करणारी आई, लहानाचे मोठे करतांना संस्कारित, शिक्षित करणारी आई... अशा विविध छटा आहेत या शब्दाला.
पण आज हा शब्द जरा अडगळीत पडलाय. सहसा कुणी वापरत नाही. एका गोष्टीसाठी मात्र या शब्दाचा योग्य वापर केला जातोय ते म्हणजे 'ज्या शाळेत किंवा कॉलेजात आपले मुळ शिक्षण झाले त्या शाळा/कॉलेज/विद्यापीठाला आपण आपले alma mater म्हणू शकतो. कारण तिने आपले बौद्धिक संगोपन केलेलं असते...
माझी alma mater आहे विदर्भ महाविद्यालय, अमरावती....


मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

Panic आणि मेंढपाळ... व '&' जणू इंग्लिश मधील झपूर्झा...

(०१) Panic आणि मेंढपाळ

"Words, words, words" शेक्सपिअरलिखित Hamlet नाटकाच्या मुख्य-पात्राच्या तोंडी आलेला हा एक डायलॉग आहे. त्याला विचारले जाते कि तू काय वाचतोय तर तो म्हणतो मी वाचतोय 'शब्द, शब्द,शब्द'
Pan: अर्धाशेळी-अर्धामाणूस.
शब्दांची दुनिया वेगळीच आहे. एक मात्र मला कळले कि, आपण या शब्दांशी खेळायला लागलो कि यांच्यासारखे मनोरंजन करणार दुसरे काहीही नाही हे जाणवते...
हा खेळ करतांना सुरुवातीला आपले तर्क लावत जातो.. मग त्या तर्कातून अनेक प्रश्न सापडतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी मन आतुर होते... शब्द कोणत्याही भाषेतील असो पण प्रत्येक शब्दाची एक कहाणी असते. कधी-कधी शब्दांच्या कहाण्या इतक्या मस्त असतात कि माणसाच्या गोष्टी फिक्या वाटाव्या..
आज असाच एक ‘शब्द’ शब्दशा डोक्यात गेला... इंग्रजीतील Panic हा शब्द... आणि याने एवढ भंजाळून सोडल कि नेमका हा शब्द तयार कसा झाला याचा शोध घ्यायचे ठरवले...
शब्दांशी खेळतांना पहिली गोष्ट मी कुठली करत असे तर त्या शब्दाला तुकड्यात तोडतो आणि त्यातील सगळ्यात महत्वपूर्ण तुकडा(निदान काहीतरी अर्थ असेल असा तुकडा) हाताशी घेतो. Panic ला तोडले तर pan हा तुकडा महत्वाचा वाटला. मग यावर सुरु झाली तर्काची शृंखला...
pan हा शब्द मला माहित असलेले किती अर्थ सांगून जातो. frying pan मधील pan, चुका काढणे या अर्थाने pan वापरल्या जातो.....असा विचार करत गेले कि अचानक काहीतरी धागा सापडल्यासारखा वाटतो तेंव्हा pain-panic असा सहसंबंध आठवतो. मला व्यक्तिशा pain व panic हे दोन्ही शब्द एकाच कुटुंबातील सावत्र भावू वाटतात... दिसायला सारखे बापामुळे पण आई वेगवेगळी असे दोन सावत्र भावंड....बस इतकाच संदर्भ हाताशी येतो पण तर्क पुढे काही जात नाही... झालेच तर Andrew Marvell च्या 'Garden' नावाच्या कवितेतील Pan नावाच्या देवाचा विचार डोक्यात येतो. त्याच्याशी याचा काही संबध असेल असे वाटत नाही पण खरेतर इथेच मी चुकतो. हे चुकनेही आनंद देणारे आहे. शब्दांशी खेळण्यात एक मजा आहे, आपला तर्क बरोबर आला याचा आनंद तर होतोच पण तो तर्क चुकून काहीतरी दुसरे कळले कि त्याचाही आनंद होतो. Panic या शब्दाचा सर्व संबंध त्या ग्रीक दंतकथेतील Pan नावाचा मेंढपाळाच्या देवाशीच आहे हे संदर्भ चाळल्यावर मला कळते... आणि मग शब्दच्या कहाणीत शिरायला मन आतुर होत गेले....
Panic शब्दाचा मागोवा घेत Pan या ग्रीक देवतेच्या गोष्टीत शिरलो. Pan हा ग्रीक-पुराणकथेनुसार मेंढपाळांचा देव. त्याचे वडील हर्मस आणि आजोबा झेवूस(आपल्याकडील इंद्रासारखा). Pan हा सुपिकतेचा देव म्हणून सुद्धा ओळखला जातो. Pan च्याबाबतीत आणखी एक विशेषतः सांगावीशी वाटते. त्याने आपल्या वडिलांकडून हस्तमैथुन कसे करावे हे शिकून घेतले आणि ती कला इतर मेंढपाळांना तो शिकवत असतो. (हा संदर्भ लक्षात येताच ‘ख्वाडा’ या मराठी सिनेमातील प्रसंग सहज आठवेल.)

तर हा असा Pan नावाचा मेंढपाळांचा देव. एकदा काय झाले कि Gods आणि Titan (आपल्याकडील सूर व असुर युद्धासारखे) यांच्यात युद्ध सुरु होते तेंव्हा Pan वामकुक्षी घेत होता. नेमके तेंव्हाच Titans देवलोकावर हल्ला चढवतात. त्यांच्या आवाजाने Pan खडबडून झोपेतून उठतो... झोपेतून अचानक उठल्यामुळे व Titans च्या आवाजाने स्वतः खूप घाबरतो व जोर-जोराने ओरडायला लागतो. त्याचे ते भीतीने गांगरून मोठमोठ्याने ओरडल्यामुले देवांवर आक्रमण करायला आलेले Titans बिथरतात, त्यांची घाबरगुंडी उडते. त्यांच्या त्या भांबावल्या अवस्थेचा देव फायदा घेतात व Titans वर कुरघोडी करत विजय मिळवतात. नंतर Pan स्वतः सगळ्यांना सांगत फिरतो कि त्याच्या आवाज केल्यामुळेच देवांना विजय मिळवता येवू लागला. एकंदरीत भीतीने सगळ्यात पहिले घाबरगुंडी कुणाची उडाली असेल तर ती Pan या देवाची म्हणून तशा प्रकारच्या मानसिक स्थितीला Panic होणे असे म्हणायला लागले... असा सगळा मामला आहे. आणखी एक तर्क लक्षात येतो कि, Pan जसा कि मेंढपाळचा देव आणि मेंढी,बकऱ्या असले प्राणी भित्रे असतात. यांचा खुपदा शिकार करण्यासाठी 'चारा' (bait) म्हणून वापर केल्या जातो. तेंव्हा त्या भीतीने, मृत्यू भयाने Panic होतात आणि ओरडायला लागतात. सुरुवात शब्दाचा अर्थ शोधण्यापासून जरी झाली असली तरी तो शब्द अनेक कहाण्या,दंतकथा, किस्से उजागर करत असतो आणि सगळ कस सुसूत्रीत वाटायला लागते....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०२)Cataract....धबधबा ते मोतीबिंदु एक प्रवास....

'...the sounding cataract hunted me like a passion..." वर्डसवर्थ च्या एका बोजड कवितेतील हीच एक ओळ मला आवडली... एक मस्त मिजास आहे आणि मनमौजीपणा आहे या ओळीत... असो..
या ओळीतील cataract शब्द म्हणजे धबधबा या अर्थाने वापरलेला आणि तोच त्याचा मुल अर्थ आहे.. आणि तो उच्चारते वेळी जिभेची होणारी टोकदार हालचाल त्या शब्दाला आठवणीत ठेवून गेली... गंमत म्हणजे या शब्दाचा आणखी एका अर्थाने उपयोग करतो तो म्हणजे ‘मोतीबिंदू' ... विचार केला तर असे वाटते कि त्यांचा एकमेकांशी अर्था-अर्थी काहीही संबंध नाही..!! पण शंका येतेच कि, जर तसा संबंध नसेल तर एकाच शब्दाला इतके भिन्न अर्थ कसे काय मिळाले...?
काही संदर्भ चाळले तर cataract शब्दाची गोष्ट उमगत गेली आणि त्याला भिन्न अर्थ का मिळाले हे कळले...
बेन जोन्सन नावाचा शेक्सपिअरच्याच काळातील एक मोठा नाटककार होवून गेला. त्याची काही नाटक वाचली(सायलेंट वूमन, अल्केमिस्ट इत्यादी. ती वाचल्यावर तो शेक्सपिअरइतकाच कर्तुत्ववान मला वाटला. पण शेक्सपिअरच्या यशामुळे तेंव्हा आणि आताही तो झाकोळल्या गेल्या. नेहमी त्याला दुय्यम दर्जा मिळाला... हे म्हणजे राहुल द्रविड सारखा प्लेअर सचिनसारख्या प्लेअरमुळे उपेक्षित राहिला तसेच झाले...
त्या बेन जॉन्सन ने 'कॉमेडी ऑफ ह्युमर' हा नाटकातील प्रकार आपल्याला दिला आहे. त्याची नाटके त्याच नावाने ओळखल्या जायची. आता यातील 'humour' हा शब्द आपल्या Cataract शब्दाला दोन अर्थ का आहेत याची किल्ली असेल असे मला कधीही वाटले नाही.
पूर्वी असा समज होता कि माणसाच्या शरीरात चार प्रकारची humours असतात. १. Black bile याला choler असेही म्हणतात. २. Yellow bile ३. Blood ४. pelgham
(आपल्याकडील वात,पित्त,कफ वगैर प्रकार असतात तसे.)
आता या ह्युमर्सच्या कमी- जास्त प्रमाणामुळे व्यक्तीच्या स्वभावात/प्रकृतीत फरक पडतो. बेन जॉन्सन च्या नाटकातील पात्र याच थेअरीवर त्याने उभी केली होती. म्हणून त्याच्या सुखांतीकेला Comedy of humours म्हणायचे ....
वरील माहिती लक्षात ठेवून Cataract शब्दाला बघितले तरी काही सापडणार नाही. पण तिथेच सगळे लपून आहे.
Cataract या शब्दाचा खरा अर्थ हा 'धबधबा' असाच होतो पण नंतर तो डोळ्यांच्या एका रोगाशी कसा जोडण्यात आला हेच कोड सोडवायचं आहे... तर..
मोतीबिंदू हा रोग जेंव्हा जुन्या लोकांना कळला तेंव्हा त्यांना वाटले कि त्या चार humours पैकी जो जास्त होतो तो humour डोळ्यावाटे बाहेर येतो/बाहेर पडतो. किंवा ओघळतो.... इतकेच नाही तर अशा रोगाला सुरुवातीला पर्शिअन लोक 'पाणी येणे/ओघळने' या अर्थाचा एक पर्शिअन शब्द वापरायचे.. त्या शब्दाचा प्रभाव आणि humour थेअरी यांचा एकत्रित परिणाम म्हणून डोळ्यातून धबधबनारे पाणी असा एक सुलभ अर्थ घेतल्या जात असेल आणि अशा या डोळ्याच्या रोगाला Cataract म्हणजे धबधबा हाच शब्द रूढला असेल....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०३) '&' इंग्लिश मधील झपूर्झा...

Beowulf हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य... या महाकाव्यात and या शब्दासाठी & हे चिन्ह किंवा 7 हा आकडा वापरल्या गेला होता. त्या महाकाव्याच्या हस्तलिखीतात तो तसा वापरल्या गेल्याचा पुरावा आहे. आता & या चिन्हाला and हा अर्थ का आहे....? तशी असण्याची कारणे काय...? त्याची कुठली कहाणी आहे का..? अस डोक खाजवत थोडी शोधा-शोध केली... ती करण्याआधी चार जाणकार लोकांना विचारले... थोडी माहिती मिळाली... आणि हळूहळू गोष्ट समजत गेली...
& याला इंग्रजीतील २७ वे अक्षर म्हणून पूर्वी ओळखायचे. याचा अर्थ 'and' असा घेतात आणि याला Ampersand म्हणून ओळखतात. Ampersand हा शब्द 'and per say and' याचेच लघु-रूप आहे. मराठीत्तील जसा झपूर्झा शब्द 'जा पुढे जा पोरी जा पुढे जा' याला खूप वेगाने वाचले कि तयार होतो.(वाचून बघा) तसाच 'and per say and' याला वाचले कि Ampersand हा शब्द तयार होतो.. मराठीत त्याला '...आणि आणखी पुढे.." असा अर्थ आपण घेवू शकतो.
जसे कि वर म्हटले आहे, पूर्वी याला २७ वे इंग्रजी अक्षर म्हणून ओळखायचे म्हणून यालाही a,b,c,d... सारखे चिन्ह देण्यात आले. हे ‘&’ चिन्ह इतर अक्षरांच्या चीन्हापेक्षा थोडे गुंतागुंन्तीचे होते. असायलाही हवे कारण हे चिन्ह एकाचवेळी अक्षर व शब्द म्हणून वापरल्या जाते. Beowulf या महाकाव्यात याचा सढळ वापर केलेला दिसून येतो फरक फक्त इतकाच आहे तेंव्हाच्या लिपीत या चिन्हाचे स्ट्रोक्स थोडे वेगळे होते. खुपदा तर and या अर्थासाठी & या चिन्हाएवजी इंग्रजीतील '7' हा आकडा सुद्धा वापरलेला दिसून येतो. आता तो '7' चा आकडा आणि & हे चिन्ह यांच्यात काय संबंध असा प्रश्न पडणे साहजिक आहे....
& आणि 7 या आकड्याचा काय संबंध म्हणून सरळ गणिताचे प्राध्यापकानां गाठले. आपली. त्यांच्या बोलण्यातून सहज कळले कि गणितात '/\' अशा स्वरूपाचे चिन्ह 'and' या अर्थाने वापरतात. हाच प्रकार logic मध्ये आहे. कदाचित पूर्वी '/\' याच चिन्हाला '7' असे लिहित असतील असा तर्क काढला. आणि माझ्यापुरता शांत झालो.
(*टाईपतानां आणखी एक जाणवल आणि खूप आनंद झाला. laptop च्या किबोर्डवर & चिन्ह आणि 7 चा आकडा एकाच ठिकाणी आहे... आता हा नक्कीच योगायोग नसेल आणि असलाच तर खूप मजेशीर योगायोग आहे....)
#शब्दांच्या_गोष्टी
#Words_words_words



Top of Form



शनिवार, ७ जुलै, २०१८

लिटील रेड स्पॉट.




ज्ञानेश्वर गटकर,
अमरावती.(महा.)
मोबाईल:९०११७७१८११
-मेल: dggatkar@gmail.com
(तुमच्या सूचना आणि अभिप्राय कळवण्यासाठी सबस्क्राईब करा.)




अंकित,माधवी,मनोज आणि प्रसेनजीत... विमानतळाच्या बाहेर आले. त्यांना घ्यायला विशेष सरकारी वाहन वाट बघत होते.मागील सहा महिन्यांपासून चौघेही सोबतच होते. त्यांची आयुष्य एकमेकात एवढी गुंतल्या गेलीत कि त्याचं जगणे एकच झाले होते...आणि... आणि कदाचित मरणेही....
माधवी’... नावासारखीच गोड छोकरी. करिअरच्या अनेक वाटा खुल्या असतानांही तिने मानसोपचारतज्ञ होण्याचे जेंव्हा ठरवले, तेंव्हा तिच्या परिचितांनी तिला मुर्खातच काढले होते. मात्र आई-वडील तिच्या या निर्णयात नेहमीप्रमाणे सोबत होते. तिच्या आयुष्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य फक्त तिलाच आहे या मताचे ते होते. स्वताच्या इच्छा त्यांनी कधीही तिच्या निर्णयाच्या आड येवू दिल्या नाहीत. म्हणूनच माधवी स्वतंत्र विचाराची मुलगी होवू शकली.
मानोपचारतज्ञ म्हणून जेंव्हा तिची जागतिक कीर्तीच्या आणि प्रतिष्ठीत अशा भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो)मध्ये  निवड झाली तेंव्हा तिला पूर्वी मुर्खात काढणारे आता तिच्या यशाने भारावून गेले. इस्रो मध्ये तिला अंतराळवीरांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करायचे होते. अवकाशयानातील प्रवास तसा खडतर. शारीरिक आणि मानसिक थकवा आणणारा. त्यामुळे शरीरासोबतच मानसिकरीत्या अंतराळवीराला तयार राहणे गरजेचे असते.  अंतराळवीरांचे  आप-आपसातील  भावनिक बंध खूप महत्वाचे असतात. अंतराळ प्रवासातमाणूस म्हणून भावनांची अनेक आंदोलने कशी असतात? आणि त्यावर नियंत्रण कसे  मिळवायचे? या आणि अशा अनेक गोष्टी तिच्या अभ्यासाचा भाग होत्या. एवढेच नाही तर इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांना मानसिकरीत्या सक्षम ठेवण्याची व यात्रेदरम्यान सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी काय करयाचे, सोबतच्या अंतराळविरासोबत मतभेद झाल्यास स्वत:ला कसे सांभाळायचे? इत्यादीसारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यासाठी एक तज्ञ म्हणून तिच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. लवकरच हि मोहीम सुरु होणार होती. त्यासाठीच आवश्यक नवीन गोष्टी शिकायलानासासंस्थेमार्फत सहा महिन्याचे प्रशिक्षणासाठी तिला पाठवण्यात आले होते.  तिच्यासोबत आणखी  दोन अंतराळवीर आणि एक खगोलशास्त्रज्ञसुद्धा प्रशिक्षणासाठी गेले होते. हि चौघे ईस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमेचा महत्वाचा हिस्सा होती. आज तेच प्रशिक्षण संपवून ते मायदेशी परत आले. ‘नासातील या सहा महिन्याच्या पूर्वीची माधवी आणि प्रशिक्षण संपवून आलेली माधवी... किती बदल झाला होता तिच्यात... त्या बदलाचे कारणही तेवढेच मधुर होते म्हणा!!!... ‘प्रसेनजीत’.
प्रसेनजीत..नासातील प्रशिक्षणासाठी माधवीसोबत गेलेला एक अंतराळवीर...अतिशय देखणा आणि महात्वाकांक्षी तरुण आणि तेवढाच कर्तुत्ववानसुद्धा !!... चैतन्याने काठोकाठ भरलेला. माधवीचे आरस्पानी सौंदर्य  आणि प्रसेनजीतचे देखणे व्यक्तिमत्व एकमेकाकडे आकर्षित न होतील तरच नवल... प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसातच दोघांची मैत्री झाली आणि पुढे अगदी नैसर्गिकपणे प्रेमात बदलली. प्रशिक्षणासाठी गेलेले अंकित आणि मनोज हे सुद्धा तिचे चांगले मित्र झाले होतेच. पण तिचा जीव जडला प्रसेनजीतवर... इतरांशी मात्र ती निखळ मैत्री ठेवून होती..पण त्या मैत्रीत एक छुपी खोच होती... ती म्हणजे अंकित’.....

अंकित.... अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा खगोलशास्त्रज्ञ... उत्कृष्ट निरीक्षण क्षमता आणि चाणाक्ष बुद्दीमत्ता लाभलेला. मनातील कुणाकडे जास्त बोलणार नाही. सतत विचारात असलेला. लहानपणापासून एकलकोंडाच म्हणून राहिलेला. न कुणाशी जास्त मिसळत होता न बोलत होता. स्वतावर नियंत्रण ठेवू शकायचा पण यदाकदाचित भावनांचा स्पोट झालाच तर स्वतःला आवरू शकत नसे.......असा अंकित माधवीवर एकतर्फी प्रेम करायला लागला होता. त्याने हि गोष्ट आपल्याच मनात लपवून ठेवली. तरी माधवीला त्याच्या वागण्या,बोलण्यातून ते जाणवत होत... जाणवणार का नाही? ती मानसशास्त्राची अभ्यासक. तिला त्याच्या मनातील भावना समजायला जास्त वेळ लागला नाही पण तिला सगळ समजल हे तिने कधीच दाखवले नाही. तिला तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही. त्याच्या मनात येणाऱ्या भावना या नैसर्गिक तर आहेतच शिवाय तिला किंवा आणखी कोणाला त्याच्या वैयक्तिक भावनांचा त्रासहि नव्हता. उगाच अंकितशी या विषयावर बोलून आपण प्रकरण चिघळवू असे तिला वाटले... आणि नेमक इथेच ती चुकली.







इस्रोचे मिशन बृहस्पती-०१...... मनोज आणि प्रसेनजीत यांची या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून निवड झाली. ‘मनोज तसा अंतराळ प्रवासात अनुभवी होता. यापूर्वी सुद्धा त्याने चांद्रयान-०३आणि मंगळ यान -०२मोहिमांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मनोजसोबत या मोहिमेसाठी प्रसेनजीतची निवड झाली आणि प्रसेनजीतला आकाश ठेंगणे झाले. मनोज आणि प्रसेनजीत या दोघांच्या भावनिक बंधाची काळजी माधवी घेत होती. ती त्यांना मानसिकरीत्या सक्षम बनवत होती. त्यांचे प्रशिक्षण वर्ग घ्यायची त्यामुळे या तिघांचे मैत्रीचे धागे घट्ट विणल्या जात होते. तिकडे मात्र  अंकितला आपण एकटे पडल्यासारखे वाटत होते. त्याच्या कामाचे स्वरूपच वेगळे असल्याने तो त्यांच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नव्हता. तो आणखी एकलकोंडा झाला आणि या सगळ्यांपासून दुरावत गेला. तो एकटा असले कि त्याच्या नजरेसमोर लगट करणारे प्रसेनजीत आणि माधीवीची छबी त्याला दिसायची. त्याचा जळफळाट व्हायचा. ते सोबत दिसले कि याच्या छातीत उबदार सुरी खुपसल्यासारख्या वेदना व्हायच्या... तसे तो स्वत:ला भावनिकरित्या सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. त्याने स्वताला कामात गुंतवून घेतले. गुरु ग्रहावरच्या या मोहिमेसाठी आवश्यक सर्व खगोलशास्त्रीय माहितीची जबाबदारी अंकितवर आली होती. अंकित सतत आपल्या कामातच असायचा. याचा अर्थ त्याला काम खूप आवडायचं अस नाही तर ते त्याला माधवीच्या विचारातून सुटका मिळवण्यासाठी मदत करायचे... 
...पण जेंव्हा केंव्हा तो निवांत असायचा तेंव्हा फक्त माधवीच्या विचारांनी वेडापिसा व्हायचा... माधवी आपल्याला का मिळाली नाही? आपण कुठे कमी पडतो...? तिला मिळवण्यासाठी काय करावे लागेल?... या प्रश्नांची उत्तर शोधत असतांना त्याच्या मनात फक्त असूया आणि नैराश्य घर करुन असायचे. काहीतरी गमावल्याची भावना त्याला सतत डाचत राहायची. यावर उतारा काय? खूप कामात व्यग्र करून घ्यायचे..!!! पण तो तात्पुरता मार्ग होता. या सगळ्यांचा शेवट केला पाहिजे असे त्याने मनोमन ठरवले.










असाच एका शांत रात्री दुर्बीणतून निरीक्षण करून झाल्यावर तो माधवीचा विचार करत वेधशाळेत बसला होता. त्याच्या कार्यालयातील भिंतीवर सजावट म्हणून चितारलेले  सूर्यमालेचे भलेमोठे चित्र होते. त्याची नजर त्या चित्रावर गेली. त्याला आठवले बृहस्पती-.. गुरु ग्रहावरील मोहीम..सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरुजणू इतर ग्रहांचा राजा शोभावा असा दिमाखात चमकत होता... त्या चित्रातील गुरु ग्रहाभोवती अंकित एकटक बघत विचारात गढून गेला... त्याची नजर इतकी खोल आणि शून्य होत गेली कि थोड्याच वेळात गुरु च्या गोल आकारात त्याला प्रसेनजीतचा प्रसन्न चेहरा दिसायला लागला. त्याच्या मनाने आपोआप तुलना करायला सुरुवात केली..... गुरु, सगळ्यां ग्रहांचा राजा म्हणजे प्रसेनजीत...तर तो तिकडे सतेज शुक्र म्हणजे विनस सौंदर्याच्या देवीच्या गळ्यातील तेजस्वी माणिक इतकी तेजस्वी फक्त माधवीच आहे.... या शुक्रताऱ्याला आपलस करणारा.. आपल्या प्रचंड व्यक्तिमत्वाने सगळ्यांना जिंकून घेणारा गुरु’...नाही प्रसेनजीत... किती सहज त्याला जग जिंकता येते... जर प्रसेनजीत गुरुअसेल आणि माधवी शुक्रतर या सूर्यमालेत आपल स्थान कुठल...?... तो स्वतःला शोधत शोधत सूर्यमालेच्या पार कोपर्यापर्यंत पोहचला... तिथे त्याला तो गवसला...’हो तोच मीअसे त्याला वाटले...प्लुटो, अंधारात अस्तित्व हरवलेला, सगळ्यांपासून तुटलेला...दुर्लक्षित असा...मृत्यूचा देव....तो म्हणजे...तो म्हणजे आपण स्वतः अंकित.

प्लुटोशी आपण साधर्म्य ठेवून आहोत आणि प्रसेनजीत गुरु ग्रहाशी..... त्याच्या मनाला असह्य कळ आली आणि शुक्र ते गुरु यातील अंतरावर त्याची नजर खिळून बसली. पाणावल्या डोळ्यांनी तो गुरु ग्रहाला रोखून बघत होता. तेंव्हाच त्याच्या मनातील खलनायक जागा होवून त्याला उकसवत होता कि तू काही केले नाहीस तर तुझ अस्तित्व शून्यवत राहील... काय करावे म्हणून अंकित विचार करतच.. मंद आणि उष्ण पाझरणाऱ्या डोळ्यावर तरलता पसरली आणि गुरु ग्रह या पाण्यात विरघळून का जात नाही असे त्याला वाटले तितक्यात त्याला गुरु ग्रहावरील एक  लालसर ठिपका दिसला... त्या ठीपक्याकडे बघत असतनाच त्याचा चेहर्यावरील सुर्कुत्यांमध्ये बदल होत होता... डोळ्यातील ओलावा जणू कोणत्यातरी प्रखरतेमुळे बाष्प होत होता.. त्याचे डोळे लगेच कोरडे झाले.. अश्रू थांबले..ते लाल झाले गुरु ग्रहावरील त्या ठिपक्यापेक्षाही लाल... शेवटी त्या ठिपक्याजवळ जात.. त्या ठिपक्यावरून  हात फिरवत अंकित खुश होवून आसुरी हसायला लागला....

तो भला मोठा लाल ठिपका... तो ठिपका गुरु ग्रहावर न जाणो कित्येक वर्षापासून आहे. ३०० वर्षाआधी तो मानवाला दिसला. तो ठिपका म्हणजे दुसर-तिसर काहीच नसून गुरु ग्रहावरील एक महाप्रचंड वादळ आहे. तब्बल  तीन पृथ्वी सामावतील एवढे प्रचंड मोठे. गुरु ग्रहावरील  मोहिमेत हा रेड स्पॉट एक डोखेदुखी ठरणार होता. गुरु ग्रह एक gas जाएंट असल्याने त्याच्यावर यान उतरवणे अशक्य होते म्हणून  बृहस्पती-०१ मोहिमेतील यान गुरु ग्रहाच्या भोवती घिरट्या घालून शक्य तितकी माहिती पृथ्वीवर पाठवणार होती. यान गुरु ग्रहाच्या खूप जवळ जाणार असल्याने या महावादळाचा धोका होताच. तो टाळण्यासाठीच अंकितने दिलेली खगोलशास्त्रीय माहिती खूप गरजेची होती. जेंव्हा यान गुरु ग्रहाच्या भोवती फिरेल तेंव्हा या वादळाचे स्थान टाळावे लागणार होते. हे वादळ ताशी ३६० किलोमीटरच्या वेगाने वाहत असल्याने त्याला टाळणे खूप जिकरीचे काम होते. मात्र  अंकित सारख्या हुशार खगोलशास्त्रज्ञाने अनेक क्लिष्ट गणिते करून त्यातून मार्ग काढला होता... त्यासाठीच अंकित सतत गुरु ग्रहाचे निरीक्षण करत असायचा. आज जरा उसंत मिळाली म्हणून तो निवांत माधवीचा विचार करत होता तर भावनिक झाला. माधवीला मिळवण्यासाठी तो कोणत्याही स्तराला जायला तयार होता.. सूर्यमालेतील चित्राकडे बघितल्यावर तर त्याला तो मार्गच मिळाला....
दोन रात्रीपूर्वी गुरु ग्रहाचे निरीक्षण करत असतांना अंकितला या मोठ्या ठीपक्यासोबतच एक नवीन ठिपका दिसला होता. नवीन ठिपका खूप काही मोठा नव्हता. मोठ्या ठीपक्याच्या मानाने तो क्षुल्लकच. नवीन ठिपकासुद्धा मोठ्या ठिपक्यासारखेच वादळ असण्याची शक्यता अंकीतला वाटत होती. त्याची पूर्ण शहनिशा केल्यावरच हि नवीन ठिपक्याची बातमी जाहीर करण्याचे त्याने ठरवले होते.
सूर्यमालेच्या चित्रापासून दूर होत तो झटकन आपल्या संगणकाच्या जवळ गेला. भरभर.. झपाटल्यासारखी आतापर्यंतच्या निरीक्षणाची आणि रेडीओ दुर्बिणीद्वारे मिळालेली माहिती चाळायला लागला. जसजशी त्याची माहिती वाचून होत होती तसतशी त्याच्या चेहऱ्यावरील भावदर्शक लकेरी बहरत होत्या. शेवटी त्याला त्याच्या प्रेमातील अडसर दूर करण्याचा मार्ग मिळाला होता...!!तो खुश होता...अगदी मनापासून हसत त्याने टेबलावरील पेपरवेट उचलून पूर्ण ताकतीनिशी सूर्यमालेच्या चित्रातील गुरु ग्रहाकडे भिरकावला. त्यामुळे चित्रातील गुरुग्रहावर असलेल्या मोठ्या ठिपक्या शेजारी  एक छोटीशी खोच पडली... एक छोटासा ठिपका उमटला...द लिटील रेड स्पॉट!!!!.. अगदी त्याला नव्याने सापडलेल्या वादळा इतकाच तो नवीन ठिपका... हो ते एक वादळच होते... उध्वस्त करणारे वादळ... खूप काही उध्वस्त करणारे वादळ!!!!
नवीन,कुणाचेही लक्ष जाणार नाही इतके छोटेसे वादळ गुरु ग्रहावर घोंगावत होते. त्याचे ठिकाण,त्याचा वेग, त्याची विध्वंसकता अंकितलाच फक्त ठावूक होती आणि मोहिमेसाठी हे वादळ घातक होते हे सुद्धा तो जाणून होता. त्याच्या वेगाचा विचार करता हे वादळ नेमके यान जिथे घिरट्या घालणार आहे तिथेच पोहचणार याची त्याला खात्री होती त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या यानात दुर्दैवी मनोजसोबत  दुष्ट,गर्विष्ठ प्रसेनजीत असणार होता...नवीन वादळाचे गुपित अंकित  कुणालाच सांगणार नव्हता... त्याच्या काचेसारख्या नाजूक प्रेमावर चढलेली काजळी पुसण्यासाठी तो वादळाचा वापर करणार होता... इतका निग्रही अंकित...



------------------------------------                    -------------------------------            --                             ---------------------------

इस्रोचे यान आकाशात झेपावले आणि ठरल्यावेळी गुरुग्रहाच्या कक्षेत पोचले सुद्धा. ते गुरुग्रहाच्या भोवती फिरून गुरुग्रहाभोवती घिरट्या घालायला लागले. गुरु आपले काम चांगल्या प्रकारे बजावत आहे असा संदेश मिळाला. सगळ ठीक सुरु होते. मोहिमेला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळत होते. तिथून पाठवण्यात येणाऱ्या माहितीचा खजिना अभ्यासण्यात इस्रोतील सर्व शास्त्रज्ञ मग्न होते.. पण दुर्दैव!!! अचानक गुरुग्रहावरील यानातून येणारे संदेश एकाएकी बंद पडले.
----------------                -----------------------              -------------------------------
मागच्या आठ दिवसापासून बृहस्पती यानाकडून कुठलाच संदेश मिळत नव्हता. अचानक सगळे संपर्क तुटले होते... कुणालाच कारण कळत नव्हत.... सगळे अनभिज्ञ होते... मात्र एकाला सगळ माहित होत... चेहऱ्यावर खोटा दुखवटा आणून आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्या फक्त एकाच व्यक्तीच्या मनात...अंकित......
इस्रोचे सगळे लोक चिंतेत दिसत होते. खूप मोठ्या संकटाला ते सामोरे जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रो ची खूपच नालस्ती झाली होती. अद्यावत तंत्रज्ञान, हुशार शास्त्रज्ञ, उत्कृष्ट यान, सक्षम अंतराळवीर आणि खोगोलशास्त्राचे इतम्भूत ज्ञान  असल्यावरही बृहस्पती मोहीम अपयशी झाल्यासारखी वाटत होती. अचानक संपर्क तुटल्यामुळे तिथे नेमके काय घडले हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता.
माधवी सगळ्यात जास्त चिंतातूर दिसत होती. तिचा प्रसेनजीत...कसा असेल तो? परग्रहावर... ??? काय झाल असेल...? जिवंत तरी असेल न...? आठ दिवसापासून काहीच पत्ता लागत नसल्याने सगळ्यांनी ते जिवंत असण्याची आशा जवळपास सोडलीच होती. अंतराळविरांच्याच चुकीमुळे अपघात झाला असेल आणि त्यात यानासहित त्यांचाही अंत झाला असेल असा तर्क काढण्यात आला. प्रसेनजीत आणि मनोज दोन्हीही अंतराळवीर आता परत येणार नव्हते.
अंकितसाठी तर अवघी आकाशगंगाच उजळून निघाली होती. त्याने चेहऱ्यावरील आनंदाचे भाव लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यात तो यशस्वीही झाला होता. आता बस काही दिवसानंतर तो माधवीला लग्नासाठी मागणी घालणार आणि माधवी नेहमीसाठी त्याला मिळणार हि भावना त्याला दुखी आणि स्वथ बसूच देत नव्हती. तो पूर्वीपेक्षा जास्तच चैतन्याने वावरत होता.... तशी त्याच्यावर कुणालाही शंका आली नाही, फक्त माधवीला त्याच्या वागण्यातील बदल खटकत होता.





माधवी... मनातील गोष्टी चेहऱ्यावरून वाचणारी मानसोपचारतज्ञ.. तिच्या नजरेतून अंकितमधील बदल सुटला नाही. एका-एकी  झालेला हा बदल तिच्या विचारी मनाला खटकत होता. कारण व्यक्तीच्या स्वभावात बदल पडायला खूप वेळ लागतो आणि तो लवकर पडलाच तर त्याला तसे कारणही असते हे तिला माणसशास्त्राने शिकवले होते. अंकितमधील  बदलाच एक कारण ती समजू शकत होती ते म्हणजे प्रसेनजीत नसल्याने आता तो तिच्यासोबत बिनधास्त बोलू शकायचा, भेटू शकायचा म्हणून कदाचित तो पूर्वीपेक्षा आनंदाने राहू शकत असेल. पण तरीही एवढ्यात त्याच्या बोलण्यातून एक श्रेष्ठत्वाची मिजास दिसत होती. कुठल्यातरी नकारात्मक गंडातून बाहेर पडल्यानंतर किंवा स्वताला सिध्द केल्यानंतर जो वागण्या बोल्यात एकप्रकारचा अहंयेतो दिसत होता. ती विचार करायला लागली कि त्याने अस कुठल कृत्य केल कि ज्याचा त्याला गर्व वाटत आहे. उलट बृहस्पती मोहीम अपयशी झाली त्यात तोही असल्याने त्यानेही इतरांसारखं खजील व्हायला पाहिजे.

सहा महिने निघून गेले. माधवी प्रसेनजीतच्या धक्क्यातून थोडी सावरली. इस्रोचे काम पूर्ववत चालू झाले. अंकितहि वाट बघून कंटाळला होता. त्याने शेवटी माधवीजवळ प्रेम व्यक्त करायचे ठरवले. सायंकाळी जेवायला जायचे  निमित्त करून तिची भेट घेतली.... त्याच्या मनातील प्रेम बोलून दाखवले.. पण प्रसेनजीतच्या आठवणी अजून पुसल्या न गेल्यामुळे माधवीने त्याला स्पष्ट नकार दिला. अंकितने हजार तऱ्हेने तिला आपले प्रेम व्यक्त केले तरी माधवी निश्चल होती. अंकित हताश होवून परतला.

अंकितला जिंकूनही हरल्यासारखे वाटायला लागले. त्याने तिच्या आई-वडिलांजवळ सुद्धा विषय काढून बघितला. त्यांनी माधवीच्या इच्छेशिवाय आम्ही तिच्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेत नाही असे स्पष्टपणे त्याला सांगितले. शेवटी त्याने पूर्ण माघार घेतली.... परंतु आता त्याच्या माघार घेण्याने गोष्ट थांबणार नव्हती...गुरुग्रहावरील तो छोटासा ठिपका त्याच्या नशिबाच्या रेषेवर तीळ म्हणून उतरत होता...












माधवीला जिंकायचं असेल तर आपण काहीतरी भरीव काम कराव. प्रसिद्ध व्हाव, मान-सन्मान मिळवावा अस त्याला वाटायचं. या गोष्टीने थोड तरी तीच प्रेम मिळेल म्हणून गुरुमोहिमेच्यावेळी सापडलेल्या त्या छोट्याश्या ठिपक्याची आता त्याला मदत घ्यायची होती. तो ठिपका त्याला आताच सापडला अस भासवायचं होत आणि गुरुयान याच ठिपक्यामुळे नष्ट झाले हे सिध्द करून नाव कमवायचं होत. पण त्यासाठी त्या ठिपक्याबद्दल साठवून ठेवलेली पूर्वीची माहिती त्याला नष्ट करणे गरजेचे होते. तो चोरून आपल्या कार्यालयतील कागदपत्रे नष्ट करायच्या कामी लागला. आणि त्याचवेळी आपण गुरुयानाच्या संबंधी संशोधन करतोय असे सांगायला लागला.




माधवीला प्रसेनजीतचे असे निघून जाणे असह्य वाटत होते. तिला अजूनही वाटायचे कि तो परत येईल. सत्य मात्र तिच्या या कल्पनेला दुजोरा देत नव्हते. तिला वाटायचं अस अधांतरी राहिल्यापेक्षा  प्रसेनजीत नक्कीच जिवंत नाही याचा पुरावा मिळाला तर.. तिच्या मनाची घालमेल जरा कमी होईल. अंकित गुरुयानासंबधी संशोधन करतोय असे माहित पडल्यावर ती त्याला भेटायला गेली. त्याच्या संशोधनात मदत करून नेमके प्रसेनजीतसोबत काय घडले हे तिला जाणून घ्यायचे होते.

माधवी संशोधनात मदत करायच्या कारणाने का  होईना पण आपल्या सोबत असेल आणि त्यामुळे तिच प्रेम जिंकण्याची एक संधी आपल्याला मिळेल म्हणून त्यानेही तिच्या मदतीला आनंदाने होकार दिला. दोघे मिळून संशोधन करायला लागले. अंकित तर फक्त संशोधन कार्याचा दिखावा करत होता. त्याचा बहुतेक वेळ तिची स्तुती करण्यात, तिला निरखण्यात आणि तीच प्रेम जिंकण्याच्या प्रयत्नातच  जात होता.

असेच एक दिवस अंकीतला वेधशाळेत यायला वेळ लागल्याने माधवी एकटीच गुरु ग्रहाचे निरीक्षण करत होती. जरी ती मानसशास्त्राची असली तरी सतत अनेक खगोलशास्त्रज्ञांसोबत तिने काम केले असल्याने तिला ग्रहांचे निरीक्षण कसे करायचे, मिळणार्या माहितीचा लेखा-जोखा कसा करायचा हे समजत होते. वेधशाळेतील आपल्या याच कामात ती गुंतली होती आणि मिळालेल्या माहितीचे पृत्थकरण करता-करता तिला जाणवल कि गुरुग्रहावरील मोठ्या रेड स्पॉट शेजारी एक छोटासा आणखी ठिपका दिसतोय. ती त्या ठिपक्याचे निरीक्षण करायला लागली आणि तिला आपल्या ज्ञानाने प्रभावित करण्यासाठी म्हणून अंकितनेच शिकवलेले काही गणिते मांडून बघू लागली.  जशी जशी ती गणिते सोडवायला लागली, आपल्या निरीक्षणाशी पडताळून बघायला लागली तासतसे तिला सत्य सापडत गेले. तरीही तिचा अजून विश्वास बसत नव्हता. अंकित अस काही करेल असे वाटत नव्हते.. तिने अंकितच्या कार्यालयात जावून झडती घेतली तर तिला सत्य सांगणारे काही कागदपतत्रे मिळाली. परत वेधशाळेत येवून सर्व घटनाक्रमावर सुरुवातीपासून विचार करायला लागली. तिचे डोके सुन्न पडायला लागली. खुर्चीवर मान टेकवून शून्य नजरेने बघायला लागली. प्रसेनजीतची प्रचंड आठवण आली... कसा होता माझा प्रसेनजीत अगदी या भिंतीवरील चित्रातील गुरुग्रहासारखा... भारदस्त... तिचे डोळे पाणावले... डोळ्यांवर हळूच उष्ण अश्रू तरळला.. त्या अश्रूत गुरुग्रह वितळत जातो कि काय असे तिला जाणवले... आणि जाणवले गुरुग्रहावरील मोठ्या वाढलाजवळ आपोआप उमटलेले छोटेशे वादळ... ज्याने तिच्या प्रसेनजीतला हिरावून घेतले... पण ते तिथे आले कसे..झपाट्याने उठली...सूर्यमालेच्या चित्राजवळ गेली..तिने निरखून बघितले कि ते कुणी चितारलेले नाहीय तर गुरुग्रहाला एक खोल खोच लागली आहे. ती खोच नक्कीच काहीतरी फेकून मारल्याने लागली असेल. पण इतक्या उंचावर आणि नेमक्या गुरु ग्रहालाच कोण काही फेकून मारेल....? या सगळ्यांचे उत्तर तिला हवे होते...तिला अंकितला जाब विचारायचा होता.. पण तो इतक्या सहज कबूल करणार नाही हे तिला ठावूक होते...शेवटी तिचे मानसशास्त्राचे ज्ञान ती वापरणार होती.. तिने त्या लाल ठिपक्या पेक्षाही भडक झालेल्या डोळ्यांना पुसले.. आणि अंकितची वाट बघायला लागली...



ती वाट बघतच होती कि थोड्यावेळातच अंकित तिथे आला. तो आल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरील भाव तिने मुद्दाम बदलले..माधवीने त्याला खूप आपलेपणाने चौकशी केली. तिच्या आवाजातील आपलेपणा आणि तो गोडवा अंकितला खूप छान वाटला. हि अचानक अशी का वागत आहे अशी शंका त्याला क्षणभर आली पण माधवीच्या आवाजातील मार्दव इतके भुरळ पाडणारे होते कि त्या शंकेला जागच्या जागीच त्याने पुरून टाकले. हि जर खरच इतकी आपलेपणाने वागत असेल तर आपण हिला जिंकू शकतो, आपली करू शकतो असे त्याला वाटायला लागले. तो आपल्या खुर्चीत  जावून बसला, मात्र माधवीच्या चेहर्यावरून त्याची नजर हटत नव्हती. माधवीसुद्धा अगदी त्याच्या खुर्चीच्या हातावर बसली. मुद्दाम त्याला नजरेत पकडत बोलू लागली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते सगळ अंकितसाठी नवीन होते. तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या प्रत्येक गोष्टीत होकार भरत होता. त्याला स्वर्गात असल्यासारखे वाटत होते. तो जणू हवेवर तरंगत होता. तो हलका-हलका झाला होता. आकाशाच्या निर्वात पोकळीत वाटते तसे त्याला वाटत होते...शून्य गुरुत्वाकर्षण... भान हरपून तिचे बोलणे ऐकत राहावे.. तिच्या डोळ्यात असेच बघत राहावे...एकटक... तिच्याशी ती म्हणते त्याप्रमाणे प्रामाणिक प्रेम करावे..सगळे खरे-खरे तिला सांगावे...ती विचारते त्याचे उत्तर द्यावीत... बस तिचा फक्त हुकुम ऐकत मनापासून तिच्यासाठी काहीही करावे.. त्याला आता माधवी शिवाय कसलाही आवाज ऐकू येत नव्हता... स्वतःच्या श्वासांची लय सुद्धा ऐकू येत नव्हती... तो पूर्ण तिचा झाला



होता... माधवी-माधवी.... माधवी जे विचारेल त्याची खर-खर उत्तरे देत होता...तो फक्त तिचा झाला होता... आणि अचानक!!!!.... सगळ बोलून झाल्यावर... माधवीने त्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिल्यावर... त्याच्या उजव्या छातीच्या फसलीजवळ खूप अनुकुचीदार काही टोचल्यासारख जाणवले...  खूप रुतले त्याला... खोल-खोल रुतले... दुखत होते पण ते दुखणे जाणवत नव्हते...स्वप्नातल्या सारखे.... खरच पडलेल्या स्वप्नातल्यासारखे...  ती टोचलेली वस्तू माधवीच्या हातात होती...तिच्या हातात काहीतरी होते... काय ते माहित नाही..पण अनुकुचीदार असे.. आणि त्याला जाणवले कि आपल्या छातीजवळ ओलसर काहीतरी वाहतय... थंडगार काहीतरी... माधवीच्या डोळ्यातील थंडगार अश्रूतर नाही...? पण जस-जसा क्षण जात होता तसतसा अंकितच्या शर्टावर एक लालसर ठिपका उमटत होता.....एक छोटासा लाल ठिपका... गुरुग्रहावर होता तसा एक लिटील रेड स्पॉट....’


------------------------------समाप्त---------------------------------
      



अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...