रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

मनी प्लांट भाग:१ (कथा)


मी आळसावालो  होतो. शेरलोक्स होल्म्सच्या घराच्या बाबतीत हे नेहमीचच . जर तुम्ही काही करत नसाल तर तुम्हाला येथे हमखास आळस आल्याशिवाय राहत नाही  म्हणूनच कदाचित शेरलोक्स सतत काहीतरी करत असतो. आताही तो कुठल्यातरी त्यानेच शोधलेल्या वात्रट आणि त्याच्याच नुसार गुणकारी असलेल्या यंत्रासोबत कसलेतरी निष्फळ चाळे करत होता. मला एक कळत नाही या माणसाला एवढा वेळ मिळतो कसा? मी आपल्या विचारांच्या धुंदीत होतो. बेकर्स स्ट्रीट वरील या शेरलोक्सच्या घरच्या खिडकीतून बाहेर मला एव्हढ्यात  शहरात दिसणारे  नेहमीचे दृश्य दिसत होते. ‘वृक्षारोपण’ असल्या गोंडस नावाने चालणारा आणिसरकारी खर्च करून, पैसेखाऊ राजकारण्यासाठी हमखास राखीव कुरण म्हणून ओळखल्या जाणारा प्रकार सुरु होता. तीन सरकारी कर्मचारी त्या इवल्याश्या रोपट्याला खूपच नजाकतीने पकडून त्याचे रोपण करत होते. तेवढ्यात स्टडी रूम मधील फोन खणाणला. शेरलोक्स यंत्राच्या गुंतावाळ्यात असल्याने नाईलाजाने मलाच फोन घ्यावा लागला. तिकडून स्कॉटलंडयार्ड पोलिसचे इन्स्पेक्टर लीस्तार्द बोलत होते.
“मि. होल्म्स् आहेत?”
“हो आहेत,... पण ते अतिशय महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने तुम्ही मला निरोप सांगू शकता, मी त्यांना आपला निरोप त्वरित कळवू शकतो.” मी शेरलॉक कडे बघून डोळा मिचकावला.
“त्यांना सांगा सर आयझक यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांची इथे नितांत गरज आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना इकडे निघून यायला सांगा.” मी त्याला हो म्हणून फोन ठेवला तोच शेरलॉक प्रश्नांकित नजरेने माझ्याकडे बघत होता. माझ्या चेहऱ्यावरील फरक त्याच्या तीक्ष्ण नजरेने अचूक टिपला असेलच याची मला खात्री होती.
मी जेंव्हा त्याला आत्महत्येची वार्ता दिली तेंव्हा तो गूढ हसत म्हणाला,
“मला असल काही होईल याची कल्पना होतीच”.
 मी त्याच्या बोलण्यामुळे भांबावलो. माझी जिज्ञासा चाळवली गेली. मी त्याला म्हणालो,
“तू भविष्यवेत्ता झालास कि काय? मान्य सर आयझक एक प्रसिद्ध आणि समाजशील राजकारणी आहे त्यांच्या जीवनातील बहुतेक गोष्टी सार्वजनिक होतात . पण त्यांची बायको आत्महत्या करेल हे तुला आधीच कसे ठावूक?”
“वाटसन, काही गोष्टींचे भाकीत करण्यासाठी भविष्यवेत्ता होण्याची गरज नाही. तुम्ही थोडे चौकस असाल आणि विचार करू शकत असाल तर तुम्ही शंभर टक्के खरे ठरणारे अंदाज वर्तवू शकता…”
मी त्याचे तत्वज्ञान ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो.मूळ मुद्द्याला धरून त्याला प्रश्न विचारला:
“ते जावू दे, तू सांग कि तुला कसे कळले की सर आयझकची  बायको आत्महत्या करेल म्हणून?”
“अगदी त्यांची बायको आत्महत्या करेल असे काही नव्हते, पण सर आयझकच्या  बाबतीत कुठली तरी घटना घडेल आणि ती खूप विचित्र असेल म्हणजे लोकांना धक्कादायक वगैरे...”
“हो पण तुला असे का वाटले?”
“मागच्या महिन्यातले काही वर्तमान पत्र चाळशील आणि मी जसा विचार करतो तसा तुही करशील तर तुलाहि कळेल!”
मी वर्तमान पत्रातील आयझक यांच्या बाबतीतील बातम्यांची कात्रणे भर-भर काढायला लागलो. त्यातील तीन कात्रणे दखल घेण्याजोगे होती. पहिली बातमी मार्च महिन्यातील अकरा  तारखेची,

संसदेतील सर आयझक यांच्या विज्ञान विरोधी भाषणाने राष्ट्रीय विज्ञान संशोधन केंद्राला मिळणाऱ्या अनुदानावर तात्पुरती स्थगीती: सर आयझक यांचा विज्ञान विरोध आज पुन्हा संसदेत दिसून आला... आपल्या दीड तासांच्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी विज्ञान संशोधनावर होणाऱ्या अवास्तव खर्चाला कात्री लावण्याची मागणी रेटून धरली... देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आणि मुलभूत सेवा व  सुविधेसाठी निधी अपूर्ण पडत असताना देशाच्या होवू घातलेल्या अर्थ संकल्पात विज्ञान केंद्राला संमत झालेला निधी हा अवाढव्य असून निरोपयोगी संशोधनावर खर्च होणारा आहे... फुटकळ विषयावरील संशोधनावर एवढा खर्च करण्यापेक्षा तो निधी आवश्यक सोयी सुविधांसाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन त्यांनी केले... त्यांच्या पक्षाने त्यांच्या मागणीला पाठींबा दिला... त्यांच्या या बिनतोड तर्कापुढे सरकारला नमते घ्यावे लागले... विज्ञान अनुदानावर सरकारने तात्पुरती स्थगिती आणली...’

 दुसरी बातमी मार्च महिन्यातील अठरा तारखेची,

            “सर आयझक यांचा विज्ञान विरोध मावळला: या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर आयझक यांच्या विज्ञान विरोध कळीचा मुद्दा होऊन बसला होता... परंतु सरकार आणि विरोधी पक्षातील झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून... सर आयझक यांनी आपला विरोध मागे घेतला...  विज्ञान केंद्राला मिळणाऱ्या अनुदानाला आपला पाठींबा जाहीर केला...’

तिसरी बातमी दोन दिवसा आधीची म्हणजे बारा एप्रिल ची होती,
राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याच्या अध्यक्षांनी घेतली विरोधी पक्षनेते सर आयझक यांची भेट: सर आयझक आणि रिचर्ड निकोल यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. कॉलेजपासूनचे मित्र असलेले रिचर्ड निकोल आणि आयझक यांची मैत्री विख्यात आहे. येत्या निवडणूकीचा विचार करता या दोघातील मैत्री आणि वरचे वर होनाऱ्या भेटीगाठी महत्वाच्या समजल्या जातात.”

“ शेरलोक्स, या बातम्यांच्या तुकड्यातून मला तर काहीच उलगडा होत नाही. कुठलीच बातमी नोंद घ्यावी एवढी महत्वाची अर्थातच मिसेस आयझक यांच्या आत्म्हत्तेसंबंधी वाटत नाही.”
“ वाटसन, तुला पहिल्या आणि दुसऱ्या बातम्यामधील विरोधाभास दिसत नाही का?”
“हो, पण या दोन बातम्यांचा आणि मिसेस आयझक च्या आत्महत्येचा काय संबंध?”
“तोच तर आपल्याला शोधायचा आहे. सगळ्या घटना एकापाठोपाठ घडल्यात आणि त्याही एकाच व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे त्यात नेमका कुठेतरी एक दुवा असणार...ती कळी आपल्याला सापडली कि आत्महत्येचे खरे कारण कळेल...”
                              ---
काहिवेळातच आम्ही घटनास्थळी पोहचलो. लीस्तार्द आमची वाट बघत होता. त्याने आम्हाला मिसेस आयझकच्या मृतदेहाजवळ नेले आणि तो तिथली परिस्थिती सांगू लागला“शेर्लोकस, आज सकाळी मिसेस आय्झाक आपल्या बेडरूमचे दार उघडत नव्हत्या म्हणून नोकराने सर आय्झाक यांना टेलीफोन करून आपल्या ऑफिसमधून बोलावून घेतले. सर आय्झाक काल रात्रभर ऑफिसलाच मुक्कामी होते आणि ते खरोखरच तिथे होते. मी शहानिशा केली आहे. त्यानंतर सर आय्झाक्नी आपल्या जवळील किल्ली ने मिसेस च्या बेडरूमचे लॉक उघडले बघतो तर काय मिसेस मरून पडलेल्या. आणि त्यांच्या हातात एक पत्र होते.” लीस्तार्दने ते पत्र शेरलोक्स ला दीले. त्या पत्रातील मजकूर तो वाचू लागला. “मी स्वखुशीने माझ्या जीवनाला संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जब्बाबदार नाही.” पत्र वाचुन झाल्यावर शेरलोक्स ने मिसेस आयझक च्या हस्ताक्षराची शहनिशा केली. ते मिसेस आयझक चेच हस्ताक्षर होते याची खात्री पटली. शेरलोक्स ने लीस्तार्डला विचारले घटनास्थळावरील मिसेस च्या मृत शरीराव्यतिरिक आणखी काही पुरावा सापडला का? लीस्तार्द म्हणाला कि मिसेसचे मृत शरीर सोडले तर कुठल्याही वस्तूला हात लावण्यात आला नाही. ती खोली जशीच्या तसीच आहे. मग शेर्लोक्स आपल्या चौकस नजरेने सगळीकडे निरीक्षण करत होता... तेवढ्यात त्याला दरातील फटीमध्ये मातीचे छोटेशे ढेकूळ दिसले. त्याने ते अलगद काळजीपूर्वक उचलले. आपल्या बोटाच्या चिमटीत पकडून त्या मातीचा रंग तो बघत होता. त्याचा वास घेत होता. त्या ढेकळाला जणू तो प्रश्न करत होता कि रहस्य तुझ्यात तर दडलेलं नसेल?
            त्याने सहज मिसेसच्या बेडरूममध्ये नजर मारली. त्याला उजव्या कोपऱ्यात  खिडकीजवळ काहीतरी आढळले. तो तीथे गेला. आपल्या खिशातील त्याचा आवडता स्पायग्लास काढून तो खिडकीखालील जागा न्याहाळू लागला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याने स्पाय ग्लास माझ्याकडे दिला. मला तिथे मातीचे बरीकशे कण दिसले. मला त्याचा अर्थ कळला नाही पण मला खात्री होती कि माझ्या विचित्र आणि वेडपट मित्राला महाभारत का घडले याच्या खणा खुणा सापडल्या..त्याचा अर्थ फक्त तोच लावू शकतो. शेर्लोक्सने लीस्तार्द कडे मृत शरीराच्या पंचनाम्यावळी काढलेल्या फोटोग्राफ्स ची मागणी केली. लीस्तार्द्ने आपल्या खिशातील पाकीट त्याच्या हाती दिले. शेर्लोक्स पाकिटातील फोटो बघत होता. एक फोटो बघताना त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमधील बदल मला जाणवला. त्या बदलाचा अर्थ मी त्याचा जवळचा मित्र असल्याने मला कळला . फोटो बघून झाल्यानंतर लीस्तार्द चा निरोप घेताना तो शांतपणे फक्त एवढेच म्हणाला कि,
“ इन्स्पेक्टर लीस्तार्द, उद्या सायंकाळपर्यंत आपली भेट होणार नाही, आणि जेंव्हा होईल तेंव्हा तुम्हाला एक धाडसी काम कराव लागेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. उद्या भेटू.”
तिथून बाहेर जात असताना तो म्हनला “आजचा दिवस आपल्याला दमवणारा असेल असे वाटते. चल, आपल्याला मिसेस  आयझकच्या  वडिलांकडे जाव लागेल. ”
“ मिसेस आयझक च्या वडिलांकडे!... पण ते का? तिने तर आत्महत्या आयझक यांच्या घरी केली!”
“ हो पण कधी कधी वर्तमान भूतकाळात गेल्यावरच जास्त चांगला कळतो.”
                        ----
मी आणि शेरलोक्स मिसेस आयझकच्या वडिलांकडे बसलो होतो. ते आम्हाला मिसेस आयझक बद्दल सांगत होते कि ती खरतर खूपच मनमिळावू आणि सहनशील स्त्री होती. ती एक उच्च नैतीक मूल्यांना महत्त्व देत असे व त्या मूल्यांशी प्रामाणिक होती. जीवन जगण्याच्या तिच्या आपल्या काही संकल्पना होत्या. आदर्शवाद आणि सच्चे देशप्रेम या गोष्टी तिच्या आत्मा होत्या. त्यासाठी ती वाट्टेल ते करू शकत होती.
जेंव्हा शेरलोक्सने मिस्टर आणि मिसेस आयझकच्या वैवाहिक जीवनाबद्दल त्यांना विचारले तेंव्हा त्यांचा चेहरा थोडा फिका पडला आणि ते म्हणाले “खरतर आमच्यासारख्या घरंदाज कुटुंबातील गोष्टीची वाच्यता मी कुठे करायला नको पण जे घडल त्याचा विचार करता मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटतय कि माझ्या मुलीचे आणि सर आयझकचे काही तात्त्विक वाद होते. दोघांचेही विचार टोकाचे त्यामुळे दोघांमध्ये कधी मतैक्य व्हायचे नाही. सर आयझक एक संधिसाधू माणूस म्हणून नावाजलेले आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या हिताचे काय एवढाच त्यांचा विचार असतो. उलट माझी मुलगी आदर्शवादी तिला आपल्या नवऱ्याचा संधिसाधुपणा अजिबात आवडत नसे. हि एक गोष्टच त्यांच्या नात्यातील दुखती नस होती. पण या सगळ्यांचा माझ्या मुलीच्या आत्महत्येशी काही संबध असेल असे मला वाटत नाही.”
“संबंध आहे किंवा नाही हे कळण्यासाठी तुम्ही दिलेली माहिती मात्र फार उपयोगाची पडेल हे नक्की.” शेरलोक्सने त्यांचे धन्यवाद मानले आणि आम्ही तिथून निघालो.
मिसेस आयझक बाबतीत बहुपयोगी माहिती आमच्या हाती आली होती असे शेरलोक्सला वाटत होते. आम्ही आता सरळ सर आयझकच्या घरी जाणार होतो. शेरलोक्सची काम करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. आधी जिथे घटना घडली तिथे न जाता हा भलतीकडेच आपले डोके लावतो. परंतु सुरुवातीला त्याची काम करण्याची पद्धत कितीही अतार्किक वाटत असली तरी शेवटी तोच बरोबर असतो. त्याचा सरळ साधा तर्क आहे कि चार लोक जो विचार करतात आणि त्या विचारातून मार्ग निघत नसेल तर पाचव्याने केलेला विचार कितीही मुर्खासारखा वाटत असला तरी तो बरोबरच असतो. या वाक्यात नेमका त्याला कुठला विचार सांगायचा आहे तो मूर्ख शेर्लोक्सच जाणे.
                        ----
दुसरया दिवसी मी सकाळपासून शेर्लोक्स्च्या घरी एकटाच होतो. आता संध्याकाळ होत आली होती. तो भल्या पहाटे, मी झोपेतच असताना बाहेर निघून गेला. रात्री सुद्धा तो उशिरापर्यंत जागा होता. त्याच्या त्या विचित्र ओबड-धोबड वाटणाऱ्या माशिनशी चाळा करीत... मी सकाळी उठलो तर माझ्यासाठी टी टेबल वर एक चिट्ठी होती... त्याने नोरोप लिहून ठेवला किसायंकाळी ठीक ६ वाजता सर आयझक च्या घरी पोहोच. मला कळले कि याला सर्व प्रकार समजला आहे. त्या चिट्ठीत पुढे लिहिलेलेला मजकूर तर अनपेक्षित होता. त्याने लिहिले “ तुला हे कळल्यावर हसू येईल कि तू ज्या मशीनला नेहमी शिव्या घालायचास तेच मशीन आपल्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. माझी मागील सहा महिन्याची मेहनत माझ्या कामात आली... कशी ते माहिती करून घ्यायचे असेल तर सांगितल्याप्रमाणे वेळेवर पोच.” मला कुठलीतरी रहस्यकथा वाचल्यासारखे वाटयला लागले. मी अजूनही माझ्या तर्काशी झगडत होतो तर शेर्लोक्स निष्कर्शापर्यंत पोचला होता.
      मशीन... जी मला आतापर्यंत वायफळ वाटत होती ती एकदम शेर्लोक्स च्या सृजनात्मक उपलब्धी वाटायला लागली. मी उत्सुकतेने तिच्या जवळ गेलो. त्या माशिनला न्याहाळू  लागलो. तिच्यात काय दडलाय ते बघत होतो... अचानक माझा पाय एका छोट्याश्या रोपट्याला लागला. माझ्या मित्राचे हे नेहमीचेच ..सगळे घर असेच वस्तूंनी पसरलेले असते. कुठलीही वस्तू आपल्या योग्य जागेवर नसते. आता हे रोपटं इथे काय करतंय म्हणून मी त्याला उचलले व ते दुसरीकडे ठेवण्यासाठी निघालो तेवढ्यात ... माशिनवरील हिरवा दिवा लुकलुकताना मला दिसला. मी रोपटे पोर्चमध्ये आणून ठेवले व त्वरेने माशिनिकडे परत गेलो. तर तोपर्यंत हिरवा दिवा बंद झाला. हा काय प्रकार मला कळत नव्हते. मला थोडी घेरी आल्यासारखे सुद्धा वाटले. रोपट्याला थोडीशी ठोकर लागल्याने घेरी येऊ शकते... कि या मशीनची हि काही करामत आहे.. पण मला आपल्याच विचारावर हसू आले. मी परत माशिनमध्ये गुंतून गेलो. ती एक साधीशीच मशीन होती. तिच्या आत एक चुंबक होते. त्यावर वर्तुळाकार चकती बसवली होती. तिला वीज पूरवठा करण्यासाठी एक बटन सुद्धा होते. ते बटन  सुरूच असल्याने मघाशी हिरवा दिवा लागला असेल असे मला वाटले. शेवटी मला त्यातील काही कळत नव्हते म्हणून कंटाळून त्या मशिनचा नाद मी सोडून दिला.. उत्सुकतेने ६ वाजण्याची वाट बघण्याशिवाय मी काही करूही शकत नव्तो.
                              ----
उर्वरित पुढील भागात....

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

'उपर जाते जा, नीचे आते जा!"



आजोबांच्या गोष्टी......

तशा काही फार दीर्घ आणि तत्त्वज्ञान नाहीय त्यांच्या गोष्टीत... अगदी साध्या-सुध्या आणि मनोरंजक आहेत... त्यांचा हा खजिना मी विसरत चाललो होतो पण आता इथे काही आठवणार्या आणि काही न आठवणार्या गोष्टी सुद्धा पोस्टणार आहे... त्या गोष्टींचे अनेक वर्जन असू शकतात... तुम्हालाही आठवत असतील तर तुम्ही त्या पोस्ट ला मला tag करा....आज पहिली गोष्ट सांगतोय....(आबा वऱ्हाडीत गोष्ट सांगायचे...म्हणून थोडी वऱ्हाडी बोली वापरतोय...)

'उपर जाते जा, नीचे आते जा!"

पोट्ट्या... तुले एक गोष्ट सांगतो  आईक...

एका गावात एक कास्तकार होता . पयले बरा शिरमंत होता पण तिगस्ता त्याच्या भावांन त्याची जिमीन हडपली अन त्याले मजुरीले लावल... दोन-दोन बायका त्याले आन पाच-सहा लेकरयीच लेंढार... मजुरी करून असा कितीक कमवे ...? बायका -पोराहीचे पोट बी भरत नोता..... पोरायचे शिक्शान तर दूरच रायल...

त्याले वाटे जगूच नही....जीव द्याव... मग येका राती गेला न तो आखारातल्या हिरीवर(विहिरीवर) जीव द्याले... हिरीच्या काठावर रायला उभा.... म्हणे आता उडी मारतो हिरीत अन देतो जीव.... तेवढ्यात हिरीतून आवज आला....

त्या  हिरीत येका भूताच बिर्हाड होत... तो भूत त्या हिरीतल्या पाण्याच्या अंदर  येक मोठ पेव करून आपल्या बायको अन पोरासंग रायत जाय...

त्या भूताले पाण्यातून दिसल न कि कोणीतरी जीव द्याले आल आणि आता उडी टाकते... तेवढ्यात भूतान आवाज लगावला....

"थांब रे बावा... काय झाल तुले ... काऊन मरत राजा... तुई अडचण त सांग मले!१"

कास्तकार घबरावला.... त्यान भेत-भेतच सांगितल भूताले कि , 'मायाकडे आता जमीन नाही, मले बरोबर मजुरी भेटत नाही...लेकरा -पोरायले खाऊ घालाचे वांदे होऊन रायले बावा! म्हणून त जीव द्याले आलो...."

भूत त्याची कायनी आयकून लयच दया करत होता...भूतान त्याले म्हणलं , "हे पाय दादा... तू काई जीव देऊ नको... मी तुयासाठी एक काम करू शकतो...पण त्या आंदी मले एक वचन दे...!"

कास्तकार म्हणे "सांगा ब्वा ! काय म्हणन आहे तुम्ह"
भूतान म्हटल मंग त्याले, " पहिली त गोष्ट तू कोणाले सांगू नको कि मी तुयासाठी  काम करतो... आन दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणशील ते काम मी करायले तयार आहो पण मले रोज काम सांगत जाय एकाही दिवसाचा खाडा चालणार नाही... ज्या दिवशी तुया मले काम सांगितल नाही त्या दिवशी मी तुया अन तुया लेकरा-बायकोचा जीव घेऊन घेईल.... कबुल अशीन त बोल"

कास्तकार लयच हरकला त्यान भूताच्या अटी कबुल केल्या....मंग काय  विचारता काय झाल.....

रोज भूत रामपायरी कास्ताकाराच्या दारात उभा काम करायले तयार....
कास्तकारण त्याले कोणतहि काम सांगितल  कि भूत  नीरा मिनटातच काम करून चाल्ला जाय....

पाटलाच्या धा एकर वावरातली पर्हाटी येच्याले सांगितली त भूत सकौन गेला अन दुपारी पुरी पर्हाटी येचून आला... पाटलाने कास्तकारले मजुरी देली... मंग त्यावर्षी कास्त्काराने भुताच्या जीवावर वावरातले काम उधळयान घ्याले सुरुवात केली...

रोज काही न काही काम भूताले तो सांगत जाय... आणि भूत काम करून निघून जाय... मजुरीचा सगळा पैसा कास्त्कारले भेटे... तो लय शिरमंत झाला... एका वर्षातच त्यान १० एकर जिमीन विकत घेतली... आता त्याले सुखाचे दिवस भोगायले भेटून रायले होते...

त्याचे पोर शाळेत जात...अभ्यास करत...बायकोच्या अंगावर सोन आल...नवीन घर बांधल....सगळ यवस्थित सुरु होत... पण त्याच्या जिवाले येग्ळाच घोर लागला...

भूताले रोज काम द्या लागे...ज्या दिवशी नाही देल त्या दिवशी भूत त्याले अन त्याच्या घारले मारून टाकणार होता... आता एखांद्यान रोज-रोज कामही कुठून आणावं?????

मोठ्या विवंचनेत होता कास्तकार.....पण  भूत  तर रोज पायटी  त्याच्या उरावर हजर असे.....काम सांग  म्हणे?

मंग कास्त्कारण एका जाणकार म्हतार्याले पकडल... अन त्याले सगळी हकीकत सांगितली.....जाणकार म्हातारा म्हणे मी सांगतो तस कर.....
पहिले तर  बैलगाडीन बाजारातून खंडीभर मवरी (मोहरी) ईकत घे अन येता-येता गावाच्या आंदी जे नदी लागते तिच्यात रेती आहे त्या रेतीत ते मवरी सांडून दे...पसरून टाक...अन  त्याले म्हणा आन येचून?????

कास्तकारन तसचं केलं.... पायटी भूत आला अन त्याले मवरी येच्याले पाठवल.... पण सायचा संध्याकैच भूत हाजीर ...म्हणे, "मालक काम झाल...उद्या येतो सकाऊन...काम तयार ठिवा!!"

कास्तकार डबल जाणकार म्ह्तार्याले भेटायले जाते....म्हतारा त्याले नवीन कलाकारी सांगते कि तुया वावरातल्या हिरीत टन भर मीठ टाक.... रातभरात ते ईरुन जाईन... मंग त्याले ते मीठ काढायले सांग....

पण दोन दिवसातच भूत मीठ पाण्यातून काढून आणते...अन कास्त्कारच्या उरावर  हजर ... म्हणे काम सांग....

भूताले लय येगयेगळ्या परकारचे काम सांगातल्या जातात... पण सगळे काम तो भर-भर करते..... त्याले त आकाशातले तारे मोजायले लावते पण तीन राती जागरण करून एवढे मोठे तारे भूत मोजून काढते.... अजून काय काय करायले लावते पण भूत त जुमानतच नाही न... मंग

कास्त्काराची  उडते घाबरगुंडी... आता काय कराव... गावातल्या शाळेतल्या मास्तरले भेटायाले जाते... त्यालेबी सारी हकीकत सांगते.....

मास्तर थोडस डोक लाऊन कास्त्काराच्या कानात सांगते.....

दुसऱ्या दिवशी भूत पायटी आल्या बरोबर कास्तकार त्याले काम सांगते... कि  हिमालयात जाऊन ततच सगळ्यात मोठ अन उंच झाड तोडून आन पण झाड सरकतीर पायजे... सरळसोट...

संध्याकाई भूत झाड घेऊन हजर.... हे अभायाले टेकिन येवढ उंच झाड आणते तो!

मंग त्याचा छाट काढ्याले सांगते....

मंग त्याच्यावरून रंदा मारून चोपड करायले सांगते....

मंग  म्हणते कि भूता आता या झाडाच्या खोडाले एवढ तेल लाव कि हे चोपड झाल पाहिजे...

भूत त्याले हजार पीप तेल लाऊन चोपड करते....

मंग त्याले त्या खोडाले गावाच्या येशिवर घेऊन जाय आणि तती रोऊन टाक... सरळ सोट.... उंच च्या उंच...

भूत हे काम बातच करते......

आता भूताले कास्तकार शेवटच म्हणते.... कि तुले मी आजपासून एकच काम देतो तेच करत जाय.....कोणत?

या खोडावर रोज वर चढत जाय अन खाली उतरत जाय....चढत जाय अन उतरत जाय...."उपर जाते जा...नीचे आते जा"

भूताले आता रोज एकच काम...

भूत लय दिवस हे करते.... शेवटी भूतही थकून जाते... खंगून जाते..... भुताची बायको कास्त्कारले विनंती करते कि माया नवर्याले सोडून द्या...
कास्त्कारले मंग दया येते अन तो भूताले सोडून देते...
सोडून देल्यावर भूताले विचारते...."कारे बाबू...पायजे का काम! पायजे अशीन तर ये....उपर जाते जा...नीचे आते जा!"

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

एक मराठा समाजातील तरुण म्हणून...

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती मला तितकीशी माहित नाही. पण विदर्भातील त्यातल्या त्यात अकोला,अमरावती,बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील मराठा समाजात मी वावरत असल्याने त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे जे काही आकलन मला झाले आहे त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने मला जाणवल्या त्या संक्षिप्त इथे मांडाव्या वाटतात....

एक मराठा तरुण म्हणून मराठा समाजा समोरील भविष्य काय आहे?

विदर्भातील बहुतेक मराठा समाज हा कुठल्या तरी फ़ैइल,पुरा किंवा नगरात राहतो उदा. द्यायचे झाले तर अकोट फ़ैइल, कमेटी फ़ैइल, सती फ़ैइल, हमाल पुरा आणि कॉपी राईट मिळवलेले शिवाजी नगर...ई. (मी इथे बहुतेक म्हणतोय) त्यामुळे तसे बघितले तर तो बर्यापैकी एकमेकांच्या संपर्कात असलेला आणि संघटन करून राहिलेला समाज आहे. मग आधीच संघटीत समाजाला प्रचंड मोर्चा काढून आपले संघटन शक्ती दाखवण्याची वेळ का आली?

वरील प्रश्नाचे उत्तर कळण्यासाठी आतापर्यंत काय स्थिती होती हे बघणे गरजेचे होते. मी काही समाज शास्त्रज्ञ नाही का कुठला शास्त्रीय अभ्यास करून निष्कर्ष मांडणारा नाही. या समाजातील एक शिक्षित तरुण म्हणून माझी काही निरीक्षण सांगतोय...

तर या भागातील बहुतेक मराठा तरुण हा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित होता. आजही आमच्या आधीची पिढी जर बघितली तर मोजके सोडल्यास सगळे अंगमेहनितीचे काम करणारे दिसतात. हमाल म्हणून, कुली म्हणून किंवा एकाद्या किराणा दुकानात काम करणारे म्हणून. विदर्भातील मराठा या लोकांवर हि स्थिती का आली तर त्यांनी मराठवाड्यातून जेंव्हा स्थलांतर(त्याची अनेक कारणे आहेत) केले तेंव्हा आपली शेती आणि घरदार सोडून इकडे आले. इकडे अंग मेहेनत केल्या शिवाय पर्याय नव्हता. खाणारे खूप असल्याने घरातील बायका-मुले सुद्धा कामाला जायची. मागच्या दोन पिढ्यांनी कसे बसे इथे दिवस काढले. अस जगत असतानाही त्यांना परत आपल्या मुळ गावी जावेसे वाटले नाही कारण तिथली परिस्थिती त्यापेक्षाही भयंकर होती.

इथे स्थाईक झाल्यावर काहींनी शेती विकत घेतली आणि काहींनी व्यवसाय निवडला. तरीही शिक्षणाच्या बाबतीत आम्ही मराठे मागास राहिलो. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून दूरच होतो. आमच्या आजच्या पिढीच्या आधीच्या पिढीला शिक्षणाचे महत्व पटायला लागले आणि त्यांनी आपल्या मुला बाळांना शाळेत घालायला सुरुवात केली. आता कुठे शिक्षित मराठा तरून दिसायला लागला. हा तरुण जेंव्हा ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आला तेंव्हा त्याला स्वतावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव व्हायला लागली. त्याची आर्थिक स्थिती ठीक नसतानाही शिक्षणाचा भला मोठा खर्च सहन करावा लागला. पुढे उच्च शिक्षणासाठी खूप अडचणी जाणवायला लागल्या. त्यातून तरुणांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली कारण त्यांना आर्थिक मागासलेपण पावलोपावली दिसत आले.

आजही जर प्रामाणिक सर्वेक्षण केले तर पंचाहत्तर टक्के मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. थोडक्या सधन मराठा समुहाचा विचार न करता, तथ्य लक्षात घेतली तर खरोखरच आरक्षणाची किती गरज आहे हे जाणवेल. सध्यस्थितीत जो मोर्चाने जोर धरलाय त्याचा विचार करता मराठी तरुणांनी आरक्षनाच्या मागणीला उचलून धरायला पाहिजे.  

कोपर्डी घटनेच्या आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ती होईलच त्यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अटरॉसिटी कायदा रद्द करणे हि गोष्ट मला थोडी अशक्य वाटते म्हणून त्यात शक्ती खर्च न करता (आणि त्या कायद्याचा सामाजिक संदर्भातील उपयोगिता लक्षात घेता) त्या कायद्यात योग्य त्या बदलाची मागणी करून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या संधीचा उपयोग घेणेही तेवढेच गरजेचे आहे. कुणाला ठाऊक कि परत एवढा जनसमुदाय एकत्र येईल? मराठा बांधव भावनिक आहेत आणि त्यांच्या याच सद्गुणामुळे  आज ते एवढ्या मोठ्या संख्येने एक झालेत. आज त्यांना त्यांची मुले सुरक्षित वाटत नाहीत म्हणून ते पेटून उठलेत. हि आग शांत होण्या आधी हिचा योग्य वापर केल्या गेला पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी त्यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण होई पर्यंत असेच एक राहायला हवे.


आज खेड्यापाड्यातील मराठा तरुण शहरात होणार्या मोर्चात हिरहिरीने सहभागी होताना दिसत आहे कारण खेड्यात राहताना, शेती करताना आर्थिक अडचणी कशा जीवघेण्या ठरत आहेत हे आपण सगळे जाणतोच म्हणूनच खेड्यातील तरुण सुद्धा शेतीकडे तोंड फिरवायला लागलेत. आपल्या शेतीवर अतोनात प्रेम करणारा मराठा तरुण, लग्न ठरवते वेळी नोकरी नसली तरी चालेल पण मुलाकडे शेती आहे म्हटले तरी मुलगी द्यायला तयार असतात, एवढे शेतीचे महत्व ज्यांना वाटते तेच शेतीला दुय्यम समजत आहेत आणि नोकरी-व्यवसायाकडे वळत आहेत. याचा अर्थ याच नाही तर या आधीच्या सरकारांकडून शेतीकडे पार दुर्लक्ष झाले आहे. म्हणून मराठा शेतकऱ्याला शांत आणि संयमी ठेवायचे असेल तर शेती धोरणात आमुलाग्र बदल करावा लागणार आहे. जेणे करून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल आणि हा असंतोष नष्ट होईल. शेतीचा विकास अपेक्षित प्रमाणात झाला असता तर कदाचित मराठा समाज जो बहुंशी शेतीवर जगतो तो एवढा असंतुष्ट वाटला नसता. मध्यम वर्ग म्हणावे किमान एवढी जरी मला शेतीतून आवक मिळायला लागली तर मी आजही नोकरीच्या फंदात न पडता शेतीत गुंतलो असतो परंतु माझ्या बापाचे हाल बघितल्यावर मला त्या शेतीचा तिटकारा यायला लागला. मला इथे काही माझ्या आर्थिक परिस्थितीचे भांडवल करून सहानुभूती मिळवायची नाहीय.. माझे म्हणणे सहज आणि सरळ आहे कि आम्हा मराठा तरुणांसामोरील समस्या मोर्च्यातील बांधवांनी समजायला हव्यात आणि त्यानुसार आपल्या मोर्च्याला योग्य ते स्वरूप द्यायला हवे...   

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

पोलीस आणि प्रार्थना : ओ हेनरी यांची अनुवादित कथा



मूळ लेखक: ओ हेनरी 
मराठी अनुवाद: ज्ञानेश्वर गटकर 


सोपी अस्वस्थ होता. तसाच उदास मनाने तो  मेडिसन चौकातील त्याच्या जागेवरून उठला. वातावरणातील बदल स्पष्टपणे सुचवत होते कि हिवाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. 

पक्षी दक्षिण दिशेला उडून जात आहेत,आपल्या नवर्याकडून हिवाळ्यात घालण्यासाठी  नवीन, सुंदर, उबदार आणि तेवढाच महागडा कोट  मिळावा म्हणून बायका लाडात येत आहेत आणि  आपल्या जागेवरून सोपी उठत आहे हि हिवाळा येण्याचे  संकेतच आहेत हे समजदार व्यक्तीला सांगायची गरज नाही.

एक मलूल झालेलं पान सोपिच्या पायाशी येउन पडले. हिवाळा लवकरच सुरु होणार हे सांगणारा हा एक विशेष संदेश होता. तोच नाही तर त्याच्यासारखे अनेक लोक जे मेडिसन चौकात राहतात, ते या अपशकुनाबरोबरच हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी छत शोधायच्या तयारीला लागत.

त्या गळणार्या पानांबरोबरच सोपिला कळून चुकले  कि आता येणाऱ्या हिवाळ्यातील थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी हालचाल करण्याची वेळ आली आहे. या वास्तवाची जाणीव झाल्याबरोबरच तो कामाला लागतो आणि आपल्या जागेवरून उठतो.

हिवाळ्यातील दिवस कसे घालवायचे याबद्ल सोपीच्या खूप जास्त अपेक्षा नव्हत्या. श्रीमंत लोकांसारखे कुठल्या तरी दूर देशीच्या समुद्र प्रवासाला जायचे  किंवा दक्षिणे कडील उबदार वातावरणात जायचे किंवा नेपल्स या टुमदार बेटांवर हिवाळा घालवायचा असला काही तो विचार करत नव्हता. तर ब्लेकवेल या बेटावरील तुरुंगात हिवाळ्यातील तीन महिने व्यतीत करावे हीच त्याची अगदी साधारण इच्छा होती. तीन महिने पुरेसे अन्न, पांघरायला कापड आणि डोक्यावर छत एवढे जरी मिळाले तरी टोचणारी थंड हवा आणि विनाकारण त्रास देणारे पोलीस यांच्यापासून त्याची सुटका होणार होती. सध्याच्या घडीला तुरुंग हाच त्याच्यासाठी उत्कृष्ठ पर्याय होता... ही त्याची छोटीशी इच्छा.

अनेक वर्षापासून ब्लेकवेल तुरुंग  सोपिचे हिवाळ्यातील घर होते. न्यू यॉर्क मधील सधन लोक आपल्या हिवाळी  सुट्या घालवण्यासाठी फ्लोरिडा किंवा भूमध्य समुद्रावरील सागर किनार्यावर  जायचे. त्याचप्रमाणे सोपीने सुद्धा आपल्या सुट्टीसाठी तुरुंग असलेल्या बेटाची निवड केली होती.

आणि  आता सुट्टीच्या दिवसांच्या तयारीला लागायची  वेळ आली होती. तीन मोठमोठाली वर्तमानपत्रे जी चौकातील बगीच्यात झोपताना तो पांघरून किंवा अंथरून म्हणून वापरायचा आता तीसुद्धा थंडीपासून सोपिला वाचवण्यास असमर्थ होती, म्हणून तो बेटावरील तुरुंगाचा विचार गांभीर्याने करायला लागला.

याचा अर्थ असा नव्हता कि न्यू योर्क शहरात सोपिला अन्न आणि निवारा देणाऱ्या ओळखीतील लोकांची वानवा होती. त्याच्या ओळखीतील लोकांकडे आळीपाळीने जाऊन तो आपल्या गरजा भागवू शकला असता परंतु त्याला ब्लकवेलचा तुरुंग  इतर पर्यायांपेक्षा जास्त सोयीस्कर वाटायचा. त्याला असे वाटण्याची काही कारणे होती.

सोपी तसा स्वाभिमानी व्यक्ती होता. जर तो शहरातील आपल्या ओळखीकडे राहायला गेला असता तर तिथे त्याला आपल्या इच्छेविरुद्ध काही कामे करावी लागली असती. ओळखीतील लोकांनी त्याला राहण्यासाठी पैसे मागितले नसते तरी या न त्या प्रकारे त्याच्याकडून राहायचा मोबदला त्यांनी वसूल केला असता, जसे कि त्यांनी सोपिला आंघोळ करायला सांगितली असती, किंवा काय करतोस? कुठे राहतोस? आता काय करायचं ठरवल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली असती किंवा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल विचारणा सुद्धा केली असती.

अशा गोष्टी करण्यासाठी त्याचे स्वाभिमानी हृद्य त्याला परवानगी देत नव्हते. त्याकारणे तुरुंगात जाणे त्याला सोपे वाटायचे. तुरुंगात राहण्याचे काही नियम जरी असले तरी ते नियम सभ्य व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळा-ढवळ करत नाही हे सोपी पूर्ण जाणून होता.

त्याचा तुरुंगात जाण्याचा निर्णय पक्का झाला आणि त्वरेने तो आपल्या कामाला लागला.

तुरुंगात जाण्याचे अनेक सोपे मार्ग त्याला ठावूक होते. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला आणि आनंद देणारा मार्ग म्हणजे एखाद्या महाग आणि चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन भरपेट खायचे. खाऊन झाल्यावर बिलाचे पैसे चुकते करायला पैसेच नाहीत म्हणून सांगायचे. तेंव्हा पोलिसांना बोलावण्यात येईल आणि त्याला पकडून नेतील. हे सगळे अगदी शांततेच्या मार्गाने होणार याची त्याला खात्री होती. पोलिसांनी अटक केल्यावर त्याने कलेल्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायाधीशांसमोर उभे केल्या जाईल. आणि बाकीचे सोपस्कार न्यायाधीश महोदय नंतर स्वतः पार पाडतील.

असा निश्चय करून तो  ब्रोडवे आणि फिप्थ अवेन्यू नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील  मेडिसन चौकातील बाकड्यावरून उठला. विस्तीर्ण पसरलेल्या चौकाला पार करून उत्तरेकडील ब्रोडवे रस्त्यावरून तो चालू लागला. थोड्यावेळातच  एका मोठ्या रोषणाई केलेल्या रेस्टॉरंट समोर तो उभा होता.

सोपीला विश्वास होता कि कमरेपर्यंत तो बर्यापैकी सभ्य माणूस वाटत होता कारण चेहरा स्वच्छ धुतलेला होता. चढवलेला कोटहि बऱ्यापैकी धुतलेला होता. रेस्टॉरंटच्या आतील टेबलावर पोचेपर्यंत त्याला कोणी हटकले नाही म्हणजे झाले! आणि  एकदा जेवणाच्या टेबलावर तो बसला म्हणजे त्याचे काम फत्ते झाले कारण टेबलाच्यावर त्याचा शरीराचा जो भाग दिसले तो व्यवस्थित होता. मग तो सांगेल ते जेवण वेटर त्याला आणून देईल याची त्याला खात्री होती.

आपण काय काय खावे यावर तो विचार करायला लागला. रेस्टॉरंट च्या मेनुतील झाडून पुसून सगळे पदार्थ त्याच्या नजरेसमोरून सरकत होते. जेवणाची किंमत खूप काही जास्त नव्हती आणि त्यालाही रेस्टॉरंटच्या लोकांनी बिलाची रक्कम  न दिल्यावर  खूप चिडू नये असेच वाटत होते कारण  पुढील तीन महिन्याच्या सुट्यांची सुरुवात उत्कृष्ट जेवणाने करावी आणि आपण  सुखाने आपल्या हिवाळ्यातील घरी जावे अशी आणि फक्त इतकीच त्याची साधीशी इच्छा होती.... त्यासाठीच हा प्रपंच.

परंतु जसा त्याने आपला  पाय रेस्टॉरंटच्या दारातून आत टाकला तेंव्हाच मुख्य वेटरचे लक्ष त्याच्या फाटलेल्या जोड्याकडे  आणि उसवलेल्या प्यांट कडे गेले. क्षणाचाही विलंब न करता सोपिला तेथून बाहेर हाकलण्यात आले.

सोपी परत ब्रोडवे रस्त्यावर चालू लागला. हा साधा आणि सरळ उपाय निष्फळ ठरला होता. एवढ्या सहजतेणे आणि सुखाने हवे ते  मिळणार नाही असे त्याला वाटले. दुसरा कुठला तरी पर्यायी मार्ग शोधावा लागेल याची जाणीव झाली.

पुढे सिक्स्थ अवेन्यू चौकात पोचल्यावर त्याला कोपर्यातील एक दुकान दिसले. दुकानासमोरील दर्शनी भिंतीवर एक भलीमोठी काचेची खिडकी होती जी जगमगत्या दिव्यांनी लखलखत होती. सोपीने एक दगड घेतला आणि त्या खिडकीच्या दिशेने भिरकावला. काच फुटल्याचा आवाज झाला. लोकांची गर्दी झाली. धावत येणाऱ्या लोकांमध्ये एक पोलीससुद्धा होता. सोपी निश्चल उभा होता आणि पोलिसाकडे बघून हसत होता.

“दगड मारणारा माणूस कुठे आहे?” पोलिसाकडून विचारणा झाली.

“तुम्हाला हा दगड मीच मारला असे वाटत नाही का?” सोपी उत्तरला. सोपी खूपच खुशीत दिसत होता. त्याला जे पाहिजे होते ते स्वतःहून तिथे चालत आले होते आणि आता त्यालाच विचारत होते.

परंतु पोलिसाने सोपिकडे अजिबात लक्ष दिले नाही. पोलिसाच्या मतानुसार जो व्यक्ती दगड मारेल तो उगाच कशाला त्याठिकाणी थांबेल. दगड मारणारे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पळ काढतील. पोलिसाला एक माणूस रस्त्याच्या पलीकडे धावताना दिसला आणि पोलीस त्याला पकडायला म्हणून धावत निघून गेला. आणि सोपी, खजील मनाने व हळू पावलांनी चालायला लागला. त्याला दोनदा अपयश आले होते.

रस्त्याच्या पुढच्या बाजूला आणखी एक रेस्टॉरंट त्याला लागले. हे रेस्टॉरंट ब्रोडवे एवढे श्रीमंत नव्हते. आपल्या फाटक्या कपड्यांनी आणि जोड्यांनी तो बिनदिक्कत इथे जावू शकत होता. जेवायला येणारे लोकही साधारण वाटत होते आणि जेवणहि स्वस्त होते. सोपी आत गेला. त्याने जेवण मागवले. भरपेट जेवल्यावर पैसे चुकते करतेवेळी तो म्हणाला,

 "पैसे! अहो माझे आणि तुम्ही जो शब्द म्हणताय 'पैसे' त्याचे  खूप दिवासंपासुंचे वैर आहे."

वेटरकडे बघत तो पुढे बोलला, 

“तुम्ही लवकर पोलिसांना बोलवा आणि मला त्यांच्या हवाली करा, उगाच माझ्यासारख्या सभ्य माणसाला ताटकळत ठेवू नका.” सोपीने आज्ञा दिली.

“तुमच्यासाठी आम्ही पोलिसाना बोलावण्याचा त्रास घेणार नाही.” तिथला वेटर सोपिकडे खवचट बघत उत्तरला. 

त्याने दुसर्या एका वेटरला बोलावले आणि म्हटले, " तुमच्यासारख्यांचा आम्ही खास पाहुणचार करतो!"

दोन्ही वेटरनि  मिळून, सोपिच्या डाव्या कानाखाली आवाज काढले आणि त्याला बाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडलेला सोपी हळूहळू, शांतपणे उभा झाला. आपले कपड्यांवरची धूळ झटकली. तुरुंगात जाणे तर आता त्याला दिवास्वप्न वाटायला लागले होते... तुरुंग अजूनही फार लांब होता... त्याचा तो अवतार बघून जवळच उभा असलेला पोलीसवाला हसतो आणि निघून जातो.

जवळपास अर्धा मैल  चालत  गेल्यावर सोपीने आणखी एक प्रयत्न करायचा विचार केला. यावेळी आपला प्रयत्न यशस्वी होईल याची त्याला खात्रीच होती. तिथे एका दुकानाच्या खिडकीजवळ सुंदर,सभ्य दिसणारी स्त्री उभी होती. अर्थातच इतक्या सभ्य स्त्रीशी कुण्या अनोळखी पुरुषाने आगाऊ बोलल्यावर ती स्त्री रागावेल. तिची छेड काढत आहे असे समजून नक्कीच ती पोलिसांची मदत मागेल. असे झाल्याबरोबरच पोलिसाचा तो उबदार तळहात सोपिच्या मनगटाला पकडेल ज्या  हव्याहव्याश्या स्पर्शासाठी  सोपि एवढा आटापिटा करत आहे आणि एकदाचा तो आनंदि होईल. मग लवकरच सोपी बेटावरील सुट्यांच्या दिवसांसाठी रवाना होईल.

तो तिच्या जवळ जातो. नजरेच्या कोपऱ्यातून पोलीस आपल्याला बघतोय याची खात्री करतो. ती तरुण स्त्री दोन-चार पावले मागे सरकते. सोपी तिच्या आणखी जवळ जातो आणि अगदी तिला खेटून उभा राहतो. सोपी तिची छेड काढण्यासाठी तिला म्हणतो, “गुड इव्हिनिंग बेडेलीया! माझ्यासोबत खेळायला माझ्याघरी येतेस का?”

त्याच्या या हरकतीकडे पोलीस  बघतच असतो. त्या स्त्रीने पोलिसाला फक्त इशारा करायची देर आणि सोपीचे बेटावरील सुट्यांचे तिकीट पक्के...सोपिला तर आताच थंडीच्या दिवसात तुरुंगातील उब जाणवत होती...पण

ती स्त्री सरळ सोपिकडे चेहरा करत, त्याचा हात नाजूकपणे आपल्या हातात घेत बोलली, “अरे माईक नक्कीच येईल तुझ्याकडे पण माझ्यासाठी खाण्यापिण्याची सोय करशील तरच...आता इथे नको पण लवकरच भेटू  तुझ्या घरी  कारण आता तो पोलीसवाला आपल्याकडे बघतोय.”

तिने त्याचा पकडलेला हात तसाच हातात ठेवला आणि  ते दोघेही पोल्संच्या जवळून निघून गेले. सोपिला आता काळजी वाटायला लागली. तुरुंगात जायचा त्याचा मनसुबा पूर्ण होईल का नाही याबद्दल तोही आता साशंक व्हायला लागला.

पुढच्या चौकात तिच्या हातातून आपली सुटका करून सोपी धूम पळत निघाला.

थोडे अंतर धावत गेल्यावर धाप लागलेला सोपी थांबला. तो जिथे थांबला होता तो रस्त्याचा भाग नाट्यगृहांमुळे गजबजलेला होता. तसेही शहराच्या या भागात रस्त्यावर वेगळीच चमक असायची आणि प्रफुल्लीत चेहेर्यांचे लोक भेटायचे. त्या हिवाळ्यातील रम्य सायंकाळी चेहऱ्यावर प्रसन्न स्मित ठेवून, उंची वस्त्रे घालून श्रीमंत बायका-मानसाची ये-जा सुरु होती.

मात्र सोपिला वेगळ्याच प्रकारची धास्ती होती ती म्हणजे त्याला कुठलाच पोलीस आज अटक करणार नाही याच भीतीने तो अस्वस्थ झाला. त्याला काहीतरी करणे जरुरी होते म्हणून तो एका नाट्यगृहाच्या बाहेर जिथे पोलीस उभा होता त्याच ठिकाणी मुद्दाम गेला. आपण  काहीतरी विचित्र आणि अनपेक्षित केल्याशिवाय आपला मनसुबा पूर्ण होणार नाही याची त्याला आता जाणीव झाली होती.

अचानकच सोपी नरड्याच्या शिरा होतील तेवढ्या ताणून ओरडायला लागला, तो  भेसूर गायला  लागला, नाचायला   लागला... जणू तो  अट्टल बेवडा आहे  आणि या श्रीमंत आणि सभ्य लोकांना त्रास देतोय.

आणि पोलिसाने...सोपिकडे निखालस दुर्लक्ष केले आणि आपल्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला तो पोलीस म्हणाला,
 “हा त्याच कॉलेजमधील मुलगा आहे जे आज सामना जिंकले... त्यामुळे आमच्या वरीष्ठाकडूनच आम्हाला आदेश आहेत कि आजच्या दिवशी या मुलांकडे दुर्लक्ष करावे... कारण ते फक्त ओरडतील परंतु कुणाला इजा करणार नाहीत.”
सोपी ओरडायच थांबला. आज कोणताच पोलीस त्याला अटक करणार नाही का? आता तर बेटावरील तुरुंग त्याला स्वर्गाइतकाच अप्राप्य वाटायला लागला. त्याने अंगावर चढवलेला कोट ठीक केला त्यासरशी त्याला हवेतील वाढता गारवा जाणवला. ‘

नंतर सोपिचे लक्ष दुकानात वर्तमानपत्र घेणाऱ्या एका माणसाकडे गेले. तो माणूस उभा होता आणि त्याचे लक्ष पूर्ण वर्तमानपत्रांकडे होते. बाजूलाच त्या  माणसाने छत्री  ठेवली होती. सोपी सरळ दुकानात गेला. ती छत्री उचलली आणि अगदी बिनधास्तपणे हळू पावले टाकत तो चालू लागला. छत्रीवाला माणूस लगेचच त्याच्या पाठी धावत आला आणि सोपिला म्हणाला,
“हि माझी छत्री आहे.”
त्यावर सोपी बोलला, “अच्छा!! हि तुमची छत्री आहे  तर  मग  मी  चोरली, जा पोलिसांना बोलवा. तो तिकडे एक पोलीस उभाच आहे. त्याला बोलवा आणि सांगा कि मी चोर आहे म्हणून.”

सोपिचे बोलणे एकूण तो माणूस हळू हळू चालायला लागला. सोपिनेही आपल्या पायांची गती आणखी कमी केली. सोपिला त्यावेळी आतून वाटत होते कि त्याचा हा प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरेल. पोलीस दोघांकडेही शंकेच्या नजरेने बघत होता.

“मी--” छत्रीवर हक्क सांगणारा माणूस चाचरत बोलायला लागला, “—कस आहे! अंSSS तुम्हाला तर माहीतच आहे  कि आजकाल...असुद्या.. जर हि तुमची छत्री असेल तर तुम्ही घ्या.. त्याच काय आज सकाळीच मला हि एका रेस्टॉरंट च्या बाहेर सापडली.. जावू द्या तुमचीच आहे अस म्हणताय तुंम्ही तर तुमचीच असेल न!!! बरय.. येतो.”

“हो!हो! हि माझीच आहे” रागाने फुरफुरत, नाकपुड्या फुगवत सोपी ओरडला.

तो माणूस पटकन तिथून निसटला. पोलीस एका वृद्ध बाईला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत होता आणि सोपी असहाय होऊन पुढे चालायला लागला. निराश होऊन त्याने फेकता येईल तेवढ्या दूर त्या छत्रीला भिरकावले. तो प्रत्येकवेळी असफल होत होता. पोलीस जणू त्याला आज राजा समजत होती जसा कि त्याच्या हातून कुठली चूक घडतच नाहीय.

सोपी शहराच्या पूर्वेकडील एका सुनसान सडकेवरून चालत होता. इथून त्याने त्याच्या घरी म्हणजे मेडिसन चौकातील बागेच्या बाकाकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळण घेतले. तो चालू लागला पण...

रस्त्याच्या एका शांत कोपर्यावर सोपी अचानक थांबला. त्याला थांबावं वाटल. ते एक खूप खूप जुने चर्च होते. चर्चच्या एका खिडकीच्या रंगीत काचेतून मंद प्रकाश पडत होता. त्याच खिडकीतून सुमधुर संगीताची नाजूक लय सोपिच्या कानावर पडली आणि तो मंत्रमुग्ध झाला. ती एक अतिरम्य वेळ होती. आकाशात चंद्र तरुण होता. सोपी सायंकाळच्या पक्षांची उंच आकाशातील गाणी एकू शकत होता... एव्हढी शांतता.... क्वचितच येणाऱ्या जाणार्यांच्या आवाज व्हायचा...  पण तीथे अतीव शांत आणि प्रसन्न वाटायला लागले होते.

चर्च मधून सोपिला खूप दिवसापासून ठाऊक असलेल्या प्रार्थनेच्या सुरावटी ऐकायला आल्या. त्याला आपल्या जुन्या दिवसाची आठवण झाली.. ते मंतरलेले दिवस जेंव्हा त्याच्या आयुष्यात आई चे प्रेम, प्रेमाचा नाजुकपणा...मित्रांची सोबत,  स्वप्नाची साथ आणि स्वच्छ विचार व स्वच्छ कपडे होते ... त्याला आठवले ते सगळे सुंदर दिवस ...

सोपीचे हृद्य अशाच कुठल्यातरी अनुभवाची वट बघत होते. तो योग्यवेळी या चर्च जवळ पोचला होता. तिथे त्याला वेगळीच अनुभूती होत होती आणि त्याचे अंतकरण त्या शांत जाणीवेने बदलून जात होते. पहिल्यांदा आपल्या भरकटलेल्या आयुष्याबाबत तो गंभीर झाला.. आतापर्यंत वाया घालवलेले मूल्यवान दिवस, फालतू इच्छा, मेलेल्या आशा आणि मनाची कोमेजून गेलेली अवस्था त्याला प्रकर्षाने जाणवत होती.

आणि चर्चच्या या एकट्या शांत कोपऱ्यात सोपीने ठरवले कि आजपासून हे लाचार जगणे सोडायचे... परिस्थितीशी लढायचे व या चिखलात, निराशेत गुरफटलेल्या आयुष्याला बदलून नव्याने जगायला सुरुवात करायची.

तो अजूनही तरुण असल्याने त्याच्याकडे आयुष्य सुंदर करण्याची संधी होती. आपले अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागायचा त्याने निश्चय केला. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याला नोकरी द्यायचे वचन दिले होते. आता त्या व्यक्तीला  शोधून ती नोकरी करायची असे सोपीने ठरवले. तो भविष्यात कुणीतरी बनेल असा त्याला विश्वास वाटत होता. त्या शांत संगीताने आणि प्रार्थनेच्या सुरांनी त्याला बदलून टाकले होते. तो आता—

तेव्हड्यात त्याच्या खांद्यावर एक हात येवून आदळला. मोठ्या जबड्याचा न्यू योर्क पोलीस त्याच्याकडे बघत म्हणाला,
“ असल्या भाल्त्यावेळी तू इथे काय करतो  आहेस?”
“काहीच नाही” सोपी उत्तरला.
“तुझ्या या काहीच नाहीवर मी विश्वास ठेवेल असे तुला वाटतय का?” पोलीस म्हणाला.

नव्या उर्जेने आणि अति-उत्साहाने सोपी त्या पोलीसाशी वाद घालायला लागला. पोलिसांशी वाद घालणे कधीही, कुणालाही परवडत नाही.

“माझ्या सोबत चल.” पोलीस त्याला पकडून घेऊन गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच न्यायाधीशांनी सोपिला त्याच्या शुल्लक गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावली, 

“तीन महिन्यासाठी तुला बेटावरील तुरुंगात ठेवण्यात येईल”























शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

त्या डोळ्यांचा रंग कोणता...?


७/१०  विज्ञान कॉलोनी, डॉ. हिणवटकरांचा पाच हजार स्क्वेअर फूट पसरलेला विस्तीर्ण बंगला... रात्री ठीक १०.३०  वाजता, शांत रात्रीच्या पदराखाली घड्याळाचे श्वास टिक-टिक करत होते. तेंव्हा बंगल्याच्या एकलकोंड्या खिडकीजवळ रामराव चुळबुळायला लागला. तो बांगल्याच्या आवारात शिरून, खिडकीजवळ लपून बसला होता. त्याला वाट पाहत  बसल्याला दोन तास झाले. तसा तो मागील दोन दिवसांपासूनच बंगल्यावर नजर ठेवून होता.. आणि त्याचा अपघात होण्याआधी एकदा चोरीचा प्रयत्न याच बंगल्यात केल्याचे त्याला अंधुकसे आठवते .. सहा महिन्यापूर्वी त्याने या बंगल्याची आतासारखीच टेहळणी केली होती .. पण चोरी करण्यापूर्वीच त्याचा अपघात झाला  आणि बंगल्यात चोरी करण्याचा त्याचा मनसुबा अर्धवटच राहिला. आज तर तो मोहीम फत्ते करायच्या हिसेबानेच पूर्ण तयारीनिशी आला होता. घरात शिरण्याची वेळ व्हायची होती म्हणून त्याने परत आजच्या कामगिरीची एकदा उजळणी करून घेतली....
              डॉक्टर हीनवटकर, एक नावाजलेले, अविवाहित वैज्ञानिक... एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटेच राहतात...कुठलाच नौकर नाही कि सोबती नाही...डॉक्टर म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारा वक्तशीर माणूस. कुठेही वेळेच्या दोन पाच मिनिटे आधीच पोहचतील. त्याचं आयुष्य त्यांनी संपूर्णता विज्ञानाला अर्पण केले. ठीक सकाळी आठ वाजता प्रयोगशाळेत जातात तर थेट सायंकाळी ८ ला बाजारातून रोजची खरेदी करून परत येतात. जेवण वगैरे आटपून रात्री १०.३० वाजता परत प्रयोगशाळेत जातात आणि पाहटे ४ ला  बंगल्यावर हजर. कशी बशी दोन-तीन तासांची झोप घेवून, लवकरच तयार होवून पुन्हा सकाळी ८ ला प्रयोगशाळेसाठी रवाना होतात. मागील एका वर्षापासून त्यांचा हा दिनक्रम ठरलेला... क्वचित कुठे व्याख्यान द्यायला जावे लागले तर तेवढा बदल. सतत काम करणारे, व्यग्र आणि कधीही न थकणारे असे हे व्यक्तिमत्व सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. एकटा माणूस एवढे श्रम न थकता कसा करू शकतो हा प्रश्न सगळ्यांना पडायचा.
              रामराव विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला तो मोटारीच्या आवाजाने. डॉक्टर आपली मोटार घेवून प्रयोगशाळेत निघून गेले. रामराव शांत बसून होता...एकदम आताच आत शिरायचे नाही...त्याने खिडकीतून आतील अंदाज घेतला.. खिडकीच्या काचेतून त्याने बघितले कि आतील दिवा मालवलेला नव्हता... त्यासरशी क्षणभर शंकेने डोके वर काढले... तो थांबला... आधीच मंद घेत असलेला श्वास धरून त्याने किलकिल्या डोळ्यांनी आत बघितले. कसलीच हालचाल नव्हती... मग निश्चिंत झाला. आत जायच्या आधी त्याने एकदा स्वतःजवळील धारदार चाकू चाचपडून बघितला...चाकूचा स्पर्श त्याला हिम्मत देवून गेला. त्याचा हा आवडता चाकू होता. असाच चाकू अपघातापूर्वी त्याच्याकडे होता पण तो अपघातामध्ये  कुठेतरी हरवला होता. कुठे तेच नेमके त्याला आठवत नव्हते. त्याने अपघातानंतर दवाखान्यातून बाहेर पडल्याबरोबर कुठले काम केले असेल तर अपघातापूर्वी हरवलेल्या चाकुसारखाच दुसरा नवीन चाकू विकत घेतला होता. त्याच चमकते धारदार पाते, अनुकुचीदार टोक, त्याच्या राकट हाताला साजेशी मजबूत मुठ त्या चाकुच्या सौंदर्याला खुलवत होती. हातात पकडल्यावर त्या चाकूचे ‘भयानक सौंदर्य’ त्याला आश्वस्त करत असे. 
कसलीच हालचाल नसल्याने आत कोणी नसेल याची खात्री झाली. चुकून दिवा सुरूच राहिला असेल असे त्याला वाटले . काहीवेळातच त्याच्या तरबेज हाताने खिडकीतून आत जाण्यासाठी वाट मोकळी केली. खिडकीचे स्क्रू अगदी शिताफिने काढून टाकले. शरीराला मांजरीसारखे चोरून तो खिडकीतून आत शिरला.. आतील चोपड्या टाईल्सवर त्याचा पाय पडताच त्या थंड स्पर्शाने त्याला शिरशिरी आली...ती शिरशिरी याआधीही अनुभवल्याचे त्याला वाटत होते. आपले दोन्ही पाय घराच्या आत घेतले  आणि ताठ उभा होवून तो मागे वळून पाहतो तर ती खिडकीसुद्धा ओळखीची वाटत होती. याचे त्याला थोडे नवल वाटले, परंतु  त्याचा खिडक्या तोडून चोरी करण्याचा अनुभव एवढा जास्त होता कि जवळपास प्रत्येक प्रकारच्या खिडक्यांना त्याने तोडले होते...म्हणून आपल्याला हे ओळखीचे वाटत आहे. असा विचार येताच तो स्वताशीच हसला... हसल्याबरोबरच त्याच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. त्याचा अपघात झाल्यापासून असला प्रकार नेहमीच व्हायचा म्हणून त्याच्या डोक्यातील झांजेचे त्याला जास्त नवल वाटले नाही. पण तेंव्हाच त्याची नेणीव अचानक चाळवल्या गेली. त्याला काहीतरी आठवल्यासारखे झाले...काय आठवले?... तर खिडकीच्या डाव्या बाजुला एक कपाट आहे आणि त्या कपाटाचे पाय कमीजास्त आहेत... हे भलतच आपल्याला काय आठवत आहे. स्वताच्या स्मरणशक्ती बाबत, तो संभ्रमित  झाला. जे आपल्याला आठवल्या  सारख वाटतय ते खर कि खोट  बघण्यासाठी त्याने कपाटाला हलकासा धक्का दिला तर...तर  कपाट खरोखरच दुडक्या चालीत  डुगडूगायला  लागले. आपल्याला काहीतरी भास होतोय पण या विचीत्र गोष्टीचे त्याला भय सुद्धा वाटायला लागले म्हणून जास्त विचार न करता तो कामाला लागला.

              तो कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटले कि कपाट उघडायला खूप प्रयत्न करावे लागतील परंतु काय आश्चर्य अगदी पहिल्याच प्रयत्नात त्याने कपाट सहज उघडले. जणू त्याला ठावूक होते कि या  भल्या मोठ्या कपाटाच्या कुलपाला एवढ्या सहजतेने कसे उघडायचे. त्याचा कपाटात शोध सुरु झाला. त्यात अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. पण त्याची अनुभवी नजर चोरकप्प्याला शोधत होती. आधीच माहित असल्यासारखा त्याचा हात चोरकप्प्याशी गेला आणि त्यातील नोटांचे बंडल त्याने आपल्या खिशात कोंबले. ते रुपये त्याला पुरेसे वाटले नाहीत म्हणून आणखी शोध घ्यायला लागला. त्याला कपाटाच्या खालच्या खणात एक चाकू दिसला. तो चाकू पाहून रामराव जरा चमकलाच. कारण त्याच्याकडे असलेला चाकू अगदी सारखाच होता. कपाटात चाकू असावा यात जास्त नवल नाही पण मघापासून त्याला जे विचित्र जाणवत होत त्याचा विचार करता कपाटातील चाकू अगदी त्याच्याच जवळील चाकू सारखा निघावा हे जरा विशेष वाटत होते...असो. हे फालतू विचार करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा  जे-जे चोरण्यालायक वाटत होते ते-ते गोळा करू लागला. महागड्या वस्तू, त्याच्या उपयोगाच्या वस्तू वगैरे-वगैरे शोधण्यात एवढा गुंग झाला कि वेळेचे भान राहिलेच नाही....
आपल्याच धुंधीत घरभर वावरत,  पाहिजे  त्या  वस्तू  गोळा  करत, नविन  वस्तू दिसली कि तिची हातात आधी  निवडलेल्या वस्तूशी तुलना करत, आणि कधी ती बदलत तर कधी नवीन वस्तूला नाकारत त्याच काम सुरु होते. या अशी चोरी करायला त्याला खूप आवडे. निवांत विचार करून वस्तूला पारखून नंतरच ती चोरायची. याचसाठी तो रात्री कुणी नसलेल्या घरातच आपला डल्ला टाकायचा. दुकानात गेल्यावर सहसा लोक खरेदी करताना जशी आवड-निवड करतात तशीच तो इथेही वस्तूना पारखून घेत होता, फक्त इथे रामरावला वस्तूंचा मोबदला पैसे म्हणून द्यायची गरज नव्हती....पण आज त्याच दैव वेगळे ठरणार होते. आज त्याला आपल्या याच नाही तर आतापर्यंतच्या सगळ्या चोरींचा मोबदला द्यावा लागणार होता....रुपयांच्या जागी स्वताची ओळख खर्च करून. या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेला रामराव चोरीची मझा घेत होता........ आणि अचानक ...
अचानक त्याला समोर डॉक्टर उभे दिसले. त्याला कळलेच नाही डॉक्टर घरात कधी आले? नेमका कितीवेळ झाला? डॉक्टर आले तेंव्हा कसाकाय कुठलाच आवाज आला नाही? डॉक्टर तर बाहेर गेले तेंव्हा मोटार घेवून गेले होते, त्या मोटारीचा सुद्धा आवाज नाही आला?! डॉक्टरांनी झोपायच्या वेळीची कपडे घातली होती  म्हणजे ते  घरात येवून आपल्या समोरून  बेडरूम मध्ये कसे काय गेले?  आणि कधी कपडे बदललेत? मग आपल्याला काहीच कस जाणवल नाही? अशा प्रश्नाच्या भुंग्यांनी त्याच्या डोक्याला परत झिणझिण्या आल्या. डॉक्टरांना समोर बघून रामराव जागीच थिजला होता....पण क्षणभरच.....लगेच स्वताला सावरत त्याचा सराईत  हात चाकुकडे गेला... चाकूवर पकड घट्ट केली  आणि तो वार करण्यासाठी तयार झाला. तोपर्यंत डॉक्टर आपल्याकडे, विशेषता डोळ्यांमध्ये  खोलवर निरखून बघत आहेत हे त्याला जाणवले...त्यांच्या रहस्यमयी नजरेने रामरावच्या अंगावर काटा आला. त्याला प्रचंड असुरक्षित वाटायला लागले. त्याच्या चेहेऱ्यावर राग आणि भीती या दोन्ही भावनांच्या छटा आलटून-पालटून दिसत होता. शरीरातील रक्त डोळ्यांमध्ये आणि हातांमध्ये धावायला लागले. हातची चाकुवरील पकड अजून मजबूत करत तो वार करायला थोडासा जागचा हललाच कि,
“थांब रामराव, तीच चूक पुन्हा करू नकोस.” डॉक्टर आपल्यावरील हल्ला वाचवण्यासाठी थोडे मागे सरकत म्हणाले.
“....म्हणजे!?” रामराव डॉक्टरांच्या वाक्याने चकित होवून, चाकुसह वर उचललेला हात तसाच मधे थांबवत ओठातल्या  ओठात गारठला. आपल्याला डॉक्टर ओळखतात....? नावानिशी ओळखतात....?
“सांगतो.” डॉक्टर रामरावच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघून बोलायला लागले, “सहा महिन्यापूर्वी तू आला होतास, चोरी करायला, असाच चाकू घेवून...आणि आजच्याच सारखा मी त्यादिवशीही तुझ्या पुढे अचानकच आलो. तू खूप घाबरलास आणि  माझ्यावर चाकूने वार केलेस. तुझ्या त्या चाकूच्या घावांनी मी रक्तबंबाळ होवून खाली कोसळलो आणि मेलो...तू माझा खून केला होतास.”
“ क्काय?” डॉक्टर प्राण वाचवण्यासाठी काहीतरी भलतच बरळत आहेस असे त्याला वाटले.
 “हो रामराव, तू मला ठार केलेस पण तू पळून जायच्या आधीच इथे  माझा मित्र आला. मला रक्ताच्या थारोळ्यात बघून त्याला लगेच सगळा प्रकार लक्षात आला आणि मग त्याने तुला तुझ्याच चाकूने ठार केले... खरतर तुला जीवाने मारायचे नव्हते पण परिस्थिती अशी होती कि माझ्या मित्राकडे दुसरा पर्याय नव्हता.. कारण त्यावेळी तुला आम्हा दोघांच एक खूप मोठ गुपित कळल होते. कदाचित ते गुपित बाहेर गेले असते तर मला कायद्याने खूप मोठी शिक्षा सुद्धा सुनावली असती. म्हणून तुला ठार मारणे अतिशय म्हत्वाचे होते..”
भीती,विस्मय,जिज्ञासा... अशा प्रसंगावेळी असतील नसतील या सगळ्या भावनांच्या छटांचा रंगमंच रामरावच्या चेहऱ्यावर आपला खेळ दाखवू लागला....चेहऱ्यावर आणि विशेषता डोळ्यातही.

“अहो,तुमाले काय येड लागल काय? मी जिता हाय,तुमी जिते हा. दोन दिवसापासून पाहून रायलो तुमाले अन तुमी म्हणता कि म्या तुमाले मारल...तुमी मंग भूत होय का?”
“रामराव, मी सांगेल ते तुला कळेल कि नाही ठावूक नाही पण की सांगतो ते ऐकून घे. मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. मी आता जरी जिवंत आहे पण मी मेलो होतो. आणि तू सुद्धा मेला होतास. तू खोटा रामराव आहेस...एक क्लोन आहेस...खरा रामराव तर माझ्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मी पुरून टाकलाय.”
रामराव थोडा बुचकळ्यात पडला...त्याला थोड थोड समजायला लागल होत आणि आठवायला सुद्धा...
“तुला ठार मारल्यानंतर तुझ्या प्रेताला माझ्या मित्राने गुपचूप मोटारीत टाकून, लोकांच्या नजरेतून वाचवून   प्रयोगशाळेत नेले. तुला माहित नसेल माणूस मेल्यानंतरही काही  वेळासाठी मेंदूतील पेशी, आम्ही त्याला न्युरोंस म्हणतो, त्या जिवंत राहतात...डोक्यातील त्या पेशींमध्ये आपल्या गत आयुष्यातील आठवणी साठवल्या असतात. आणि आज जैवतंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे कि मेंदूतील त्या सगळ्या चांगल्या-वाईट आठवणी आपल्याला वाचता येतात आणि पाहिजे तर पुसून सुद्धा टाकता येतात. मग  तुझ्या मेंदूतील त्या पेशीमधील सगळी माहिती माझ्या मित्राने एका चुंबकीय चकतीवर काढून घेतली. त्या चकतीला सीलबंद करून प्रयोगशाळेतील लॉकर मध्ये ठेवून दिले कारण पुढच्या कामासाठी ती गोष्ट अतिशय आवश्यक होती. तुझ्या मृत शरिराचा माझ्या मित्राने खूप बारकाईने अभ्यास केला. तेंव्हा उजव्या हातावर तुझे रामराव हे नाव गोंदवलेले दिसले त्यामुळेच मघाशी मी तुला त्या नावाने हाक मारली...” 
रामराव आपल्या उजव्या हाताकडे बघायला लागला--
“आता ते तिथे नसेल कारण गोंदलेली गोष्ट जन्मजात डी.एन.ए. मध्ये नसते...डी.एन.ए. म्हणजे  माणसाचे किंवा कुठल्याही प्राण्याचे शरीर कसे बनवल्या गेले हे त्याच्या डी.एन.ए. वरून समजते. पेशि मधल्या डी.एन.ए. साखळी मुळेच शरीरातील अनेक अवयव कृत्रिमरीत्या पाहिजे तशा बनवल्या जावू शकतात. तुझ्या शरीरातून डी.एन.ए.चा नमुना घेऊन त्यालाही जपून ठेवले. अशाप्रकारे  प्रयोगशाळेतील सर्व काम आटोपल्यावर तुझे प्रेत परत बंगल्यात आणले आणि मागच्या आवारात पुरून टाकले. तुला शंका असेल तर मी तुला ती जागा दाखवतो. तुझी तूच खात्री करुन घे.” एवढे बोलून डॉक्टर रामरावच्या प्रतिक्रियेची वाट बघायला लागले. पण  रामाराव तर  सुन्न झाला होता. त्याला हसावं कि रडावं कळत नव्हते. त्याचा कसानुसा झालेला चेहराच सांगत होता कि हा सगळा प्रकार त्याला भुताटकी वाटतसारखा होता. हतबल होऊन तो पुढे डॉक्टरांचे बोलणे ऐकू लागला...
“... दुसऱ्या दिवसापासून माझ्या मित्राचे खरे काम सुरु झाले ते म्हणजे तुझा क्लोन बनवायला त्याने सुरुवात केली. जवळपास एका आठवड्याच्या आत तुझा लहान बाळा एवढा क्लोन तयार झाला. कृत्रिम गर्भपेटीत तुझे शरीर आकार घेत होते. तुझ्या एका एका अवयवाला पाहिजे तसे बनवायला खूप श्रम पडले. या आठ दिवसातच तुझ्या एवढ्या वयाचा क्लोन तयार करणे गरजेचे होते. परंतु माझ्या मित्रासाठी ती काही खूप मोठी गोष्ट नव्हती. त्याचा अनुभव यावेळी खूप मददगार ठरत होता. त्याला क्लोनचे  वय झपाट्याने वाढवण्याच्या विद्युत-रासायनिक-चुम्म्बकीय पद्धतीचा शोध लागला होता. कृत्रिम गर्भ पेटी अगदी आईच्या गर्भासारखीच असते. त्यात तेच द्रव्य असतात जे आईच्या गर्भात बाळाला वाढवण्यासाठी मदत करतात. आधीच तुझ्या शरीरातून ती हार्मोन्स काढून घेतली होती जी वय वाढायला कारणीभूत ठरतात. ती हार्मोन्स तुझ्या छोट्या क्लोन मध्ये सुई वाटे सोडल्यानंतर जवळपास ३ दिवस ठरलेल्या वेळी  छोट्या क्लोन मधून विद्युत प्रवाह सोडण्यात आला आणि क्लोंनची वाढ झपाट्याने झाली... वाढलेला क्लोन तुझ्या वयाचा जरी होता तरी तसा क्लोन म्हणजे कोरी पाटीच असते...म्हणून चुंबकीय चकतीवर साठवून ठेवलेल्या तुझ्या आठवणी क्लोन च्या मेंदूला परत केल्या. आता तो फक्त शरीराने रामाराव असलेला क्लोन नव्हता तर डोक्याने आणि  विचाराने सुद्धा रामराव झाला होता. हे करत असताना फक्त त्या रात्री माझ्या बंगल्यात जे घडले होते ते तुझ्या आठवणीतून पुसून टाकले. त्या आठवणी पुसणे गरजेच्या होत्या अन्यथा तुझा क्लोन बनवणे निष्फळ ठरले असते. माझ्या मित्राचे गुपित आणि तुझ्या खुनाचा आळ या विवंचनेतून सुटण्याचा तो एकच मार्ग होता. परंतु त्या रात्रीच्या आठवणी तुझ्या मेंदूतून पूर्णत: पुसल्या गेल्या असतील  याबद्दल मला खात्री नाही.”
रामाराव चमकला आणि मघापासून हा बंगला आणि यातील वस्तू आपल्या परिचयाच्या कशा वाटतायत याच उत्तर त्याला मिळाल्यासारख वाटले. मघापासून शांतपणे असलेला रामराव मोठ्या हिमतीने बोलला,
“म्हंजी, म्या इथ दुसऱ्यांदा आलोय..पण त्या अपघाताच काय?”
 “सांगतो, सगळ सांगतो... तुझा पूर्ण विकसित क्लोन तयार झाल्यानंतर नंतर तुला म्हणजे तुझ्या क्लोनला बेशुद्ध असतानाच रात्रीला गुपचूप नजीकच्या सरकारी दवाखान्याजवळ माझ्या मित्राने सोडून दिले. पण त्याआधी मुद्दाम तुझ्या डोक्यावर एक घाव दिला जेणेकरून तुझा अपघात झाला हे पटाव... आणि पुढच सगळ तुझ तुलाच ठावूक आहे..”
 “तुमी सांगता हे पटत नाही मले! पुरावा द्या.”
“पुरावा!!!...ठीक आहे....मला सांग तुझ्या डोळ्यांचा रंग कोणता?”
“कोणता म्हणजे? काळा हाय!”
“तुला पुरावा पाहिजेच ना. तर जरा कपाटाजवळील आरशात बघ!”
रामराव आरशाकडे वळतो आणि हळू हळू पाय टाकत पुढे सरकतो..आजच्या रात्री आणखी काय वाढून ठेवलय म्हणून अगदी डोळ्यांच्या शिरा ताणून स्वताला आरशात बघतो.... त्याला विश्वासच बसत नाही. हि भुताटकी तर नाही,,, हा चेहरा तर आपलाच आहे पण... हे डोळे!!.. हे नक्कीच आपले नाहीत... कारण त्याचे डोळे हिरव्यागर्द पाचुसारखे चमकत होते.. त्या डोळ्यांतून हिरव्या रक्ताचा पारा तरळला...


डॉक्टर त्याला डोळ्यांच्या रंगाच गुपित सांगतात,
“स्वतःला सांभाळ रामराव...  जेंव्हा एखादी भावना आपण अत्युच्च पातळीवर अनुभवत असतो तेंव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह सुद्धा वाढत असतो तेंव्हा आपल्या डोळ्यातील बुब्बुळावर त्याचा फरक पडतो. आपले डोळे लाल होतात किंवा पाणावतात परंतु माझ्या बनवलेल्या क्लोन चे डोळे अशावेळी हिरवे..आणि तेही हिरव्याजर्द चमकत्या पानसर्पा सारखे होतात... हा माझ्या प्रयोगातील दोष म्हण किंवा गुण....पण एक खरे रामराव कि तू क्लोन आहेस क्लोन!!! आणि--” डॉक्टर पुढे बोलायचे थांबतात कारण...
रामरावच्या अंगाला दरदरून घाम सुटतो...त्याचे डोळे आणखी चमकायला लागतात. तो चवताळतो...त्याला असह्य वाटायला लागते..भांबावल्यागत होतो... चीड,राग,संताप आणि अनावर क्रोध.... आपसूकच हात चाकुवर घट्ट.. डॉक्टरांकडे धाव... छातीवर सपासप वार... किंकाळी... तगमग.. रक्ताच थारोळ...
थोड्यावेळाने भानावर आल्यानंतर त्याला चुकी कळते.  भावनेच्या भरात त्याने काय केले हे खरतर त्यालाच कळले नव्हते... तो स्वताला सावरतच होता, तोच मुख्य दाराजवळ पावलांचा आवाज येतो. रामरावला तिथून निघायचे असते. तो खिडकीकडे लगबगीने जातो. हातातील चाकू आणि स्वताचा तोल सावरत पुढे पाय टाकणार तोच तिथल्या सगळ्या गोंधळामुळे बाजूच्या कपाटाला त्याचा धक्का लागतो.. आणि काही कळायच्या आत ते भलेमोठे कपाट त्याच्या अंगावर कलंडू लागते. स्वताला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण उजवा पाय कपाटाखाली यतो आणि तो विव्हळतो. पाय एवढा फसला असतो कि रामराव जागचा हलु  सुद्धा शकत नाही.  
कपाट पडल्याच्या आवाजाने दारावरील माणूसही सावध झाला असेल. आता आणखी काय-काय घडेल त्याला काहीच सुचत नव्हते... रामरावला खात्री असते कि दारावर आलेला डॉक्टरांचा तोच मित्र असेल.. ज्याचं गुपित आपल्याला माहित पडले होते. आता तो परत आपल्याला ठार करेल कि काय!! दाराच्या कचकच आवाजावरून कळले कि दार अतिशय सावधगिरीने दार उघडल्या गेले... थोड्यावेळाने हळूहळू अंधारातून एक आकृती आकार घ्यायला लागते... अगदी सावध पावलाने समोर आलेली आकृती आपला चेहरा न्याहाळत आहे.. ती आकृती आणखी पुढे येते आणि रामरावच्या हिरव्या डोळ्यांना उजागर होते...आणि काय आश्चर्य ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नसून साक्षात डॉक्टरच असतात...हो शंकाच नाही डॉक्टर हीनवटकरच...!! एक नजर रामराव जमिनीकडील डॉक्टरांच्या प्रेताकडे बघतो तर दुसऱ्या नजरेत जिवंत डॉक्टरांना बघतो... त्याला वेड लागेल असे वाटते.. त्याला ग्लानी येते आणी तो बेशुद्ध होण्यापूर्वी जिवंत डॉक्टरांच्या डोळ्यात शोधत असतो... जिवंत डॉक्टर म्हणजे खरे कि खोटे??... त्याच्या डोळ्यांचा रंग  कुठला??... काळा कि हिरवा... हिरवा कि काळा?

लेखक: ज्ञानेश्वर गजानन गटकर
      अमरावती. मोबा. ९०११७७१८११
      ई-मेल : dggatkar@gmail.com

           

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...